उरण परिसरातील गोदामात असलेल्या आयात-निर्यात मालाच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात वाहनचालक, गोदामातील कंटेनर हाताळणी करणाऱ्यांची तस्करांशी असलेले संबंध उघड झाले आहेत. सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील पंजाब कॉनवेअरमधील गोदामातून रक्तचंदनाच्या कंटेनरची चोरी झाल्याची घटना उघड आल्याने पुन्हा एकदा या वाढत्या घटनांमुळे बंदरातील व्यवसायावरच प्रश्न निर्माण झाला आहे.
बंदरातून निर्यात करण्यात येणारा माल प्रथम सीएफएस (गोदामात) आणला जातो.त्याची सीमा शुल्क विभागाकडून तपासणी केली जाते. त्यानंतर मालाची आयात व निर्यात केली जाते. मागील वर्षेभरात जगातील विविध देशांतून मागविण्यात आलेला माल गोदामातून बाहेर पडल्यानंतर मालकाच्या गोदामापर्यंत पोहचविला जात असताना त्याची रस्त्यात चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी उरण तसेच न्हावा शेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत.
यात कोटय़वधी रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोरीच्या अनेक घटनांमध्ये ज्या कंटेनरमधून मालाची चोरी झाली असेल त्याचे सिल तुटलेले नसते ते जागीच असते, असेही निदर्शनात आलेले आहे.
७ डिसेंबरला पंजाब कॉनवेअरमधून एक कोटी ७ लाख ७३ हजार रुपयांच्या रक्त चंदनासह ८० हजार रुपये किमतीचा कंटेनर चोरीला गेला होता. या प्रकरणी विशाल साळे (२५) याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. व्ही. थोरात हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या ५० पेक्षा घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यापैकी कंटेनरसह माल चोरीच्या ३२ घटनांपैकी २४ घटनांचा तपास पोलिसांनी लावला आहे. तर ट्रेलर्स चोरीच्या १० पैकी ५ प्रकरणांत पोलिसांना यश आले आहे. त्याच प्रमाणे या घटनांना आळा घालण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाने मालाचे वजन, कंटेनरचे स्कॅनिंग, ट्रान्सपोर्टरकडून वाहनचालकांची माहिती घेणे, वाहनाला जीपीएस सुविधा पुरविल्यास चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.