नवी मुंबई : नवी मुंबईतील कोळीवाड्यात परंपरागत चालत आलेल्या नारळी पौर्णिमेला कोळीगीतांच्या तालावर थिरकत मिरवणूक काढून दर्याराजाला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात होणाऱ्या विकासामुळे तसेच प्रदूषणाने मासेमारीवर परिणाम जाणवत असला तरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा उत्साह, संचार आजही कायम राहिलेला आहे. ‘सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा’ अशी गाणी म्हणत ढोल ताशाच्या तालावर थिरकत नवी मुंबईतील आगरी कोळी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक देखील काढली आहे.

नवी मुंबईतील दिवाळे गाव, बेलापूर, करावे, सारसोळे वाशी गाव, जुहूगाव, बोनकोडे, कोपेरखैरणे, तळवली गाव, दिवा गाव, ऐरोली गाव, नेरुळ गाव या गावांमध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दिवाळे गाव व सारसोळे गावात नारळी पौर्णिमेचा वेगळाच थाट पहावयास मिळतो. नवी मुंबई शहरातून साधारणतः ८००-९०० होड्या मासेमारीकरिता पाण्यात उतरतात. यामध्ये दिवाळे गावात सर्वाधिक ४०० होड्या मासेमारी करित आहेत. त्यानंतर सारसोळे, वाशी जेट्टीचा नंबर लागतो. वर्षभर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व आपला सांभाळ करणाऱ्या दर्या राजाला नारळ अर्पण पूजा करून नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

हेही वाचा : रात्रीच्या वेळी शहर प्रदूषित वातावरणाच्या विळख्यात; कोपरखैरणे, वाशी रहिवासी क्षेत्रात रात्री हवेत धुलीकणाचे साम्राज्य

नवी मुंबई शहर हे खाडी किनारी वसले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांचा शेती आणि पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र नवीन शहर वसवण्यासाठी येथील शेतजमीन संपादित केल्याने येथील शेतकरी भूमिहीन झाले. मात्र येथील खाडी शाबूत असल्याने मासेमारीचा व्यवसाय आजही सुरू आहे. येथील खाडीत प्रदूषणाचा फटका बसत असल्याने मासळीचा दुष्काळ पडत आहे. असे असले तरी येथील आगरी कोळी बांधव हार न मानता पुढच्या वर्षी जाळ्याला म्हावरा मिळूदे असे साकडे घालत पौर्णिमेला दर्याराजाची यथासांग पूजा करून नारळ अर्पण करतात. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील खाडी किनारी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. आठवडाभर आधीच नागरिकांची नियोजनाची तयारी सुरू होती. कोळी बांधवांनी आपल्या होड्यांना रंगरंगोटी करून सर्व कोळीवाडे व जेट्टीना पताका लावून सजवले होते.

दिवाळे व सारसोळे गावात सर्वत्र धामधूम सुरू होती. ‘सण आयला गो नारळी पुनवेचा’ या कोळीगीताने उत्सवाची धामधूम सुरू झाली. सकाळी गावातून कोळीबांधवांनी पालखीची मिरवणूक काढली. कोळी समाजातील पुरूष, महिला आणि लहान मुले पारंपारिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनतर कोळीगीताचे, नृत्यांचे मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले. कोळीवड्यात पारंपरिक वाद्य वाजवून आंनद द्विगुणित करण्यात आला. कोळीनृत्यात लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विविध नृत्य सादर केली. जेटीवर पालखी आल्यावर आरती घेऊन या पालखी सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या होड्या नारळ खाडीमध्ये सोडण्यासाठी रवाना झाल्या.

हेही वाचा : वीज ग्राहकांचा ऑनलाईन बिल भरण्याचा वाढता कल, जुलै महिन्यात ५६३ कोटी रुपयांची देयके ऑनलाईन

वर्षभर आपला उदर निर्वाह करणाऱ्या व आपला सांभाळ करणाऱ्या दर्याराजाला नारळ देऊन पूजा केली. तसेच या दिवशी सर्व आगरी कोळी बांधव यांनी होड्यांची विधिवत पूजा करून मासेमारीसाठी आपल्या होड्या दर्यात उतरविल्या व खाडीमध्ये दर्याराजाला नारळ अर्पण केला. यावेळी पालखी सोहळ्यामध्ये बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे माजी, माजी नगरसेवक सुरज पाटील, रूपाली भगत, नगरसेविका सुजाताताई सुरज पाटील, गणेश भगत , नामदेव भगत, रतन मांडवे, मनोज मेहेर आदी उपस्थित होते. उलव्यामधील लांगेश्वर जेट्टीमध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असून सायंकाळी पारंपरिक कोळीगीतांवर थिरकत मिरवणूक काढण्यात आली. या उलवे नोडमधील जेट्टीवरून साधारणतः ६०-७० होड्यांमधून मासेमारी केली जाते, अशी माहिती उलवेचे अमर म्हात्रे यांनी दिली आहे.

हेही वाचा : उरण पनवेल रस्त्यावर मोकाट गुरांचा अघोषित रास्ता रोको, गुरे आणि प्रवाशांना अपघाताचा धोका

‘आज उत्साहाचा सण जरी असला तरी रासायनिक प्रदूषणामुळे येथील खाडीत मासळीचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे ज्या दिवशी नवी मुंबईतील खाडीतील प्रदूषण कमी होईल त्या दिवशी खरी नारळी पौर्णिमा साजरी होईल. त्यामुळे येथील लोक प्रतिनिधींनी या विरोधात सातत्याने आवाज उठवला पाहिजे’, असे सारसोळे कोळीवाडा येथील कोलवाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी म्हटले आहे.