पनवेल : कळंबोली येथे ट्रेलरच्या चाकाखाली झोपलेल्या व्यक्तीला चिरडून ठार केल्याची घटना सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर आणि गाडी रस्त्याकडेला उभी करुन झोपणा-या चालकांच्या सूरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

परराज्य व जिल्ह्यातून कळंबोली, उरण व तळोजात येणारे ट्रक व ट्रेलरचालक शक्यतो वाहन रस्त्याकडेला लावून झोपतात. चालकांच्या विश्रामासाठी स्वतंत्र साेय सरकारी यंत्रणेने अद्याप केली नाही. या परिसरात २५ हजारांहून अधिक जड व अवजड वाहने थांबलेली असतात. चोरांच्या भितीने वाहनातील सामान आणि वाहनाचे भाग चोरीस जाऊ नये यासाठी हे चालक वाहन उभ्या केलेल्या ठिकाणी झोपतात. सोमवारी दुपारी कळंबोली येथील पार्किंग क्रमांक ५ व गल्ली क्रमांक ३ येथे ३० वर्षीय शाम माने हा ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून ठार झालेल्या अवस्थेत आढळला. मित्राच्या गाडीत शाम झोपला होता. मात्र काही वेळाने शाम यांना गरम होऊ लागल्याने ते जवळच्या ट्रेलरच्या सावलीखाली झोपले होते. ट्रेलर सूरु झाला आणि ट्रेलरच्या मागील चाकाखाली शाम हा जागीच ठार झाला. जत जिल्ह्यातील शाम मूळ रहिवाशी होता. या घटनेबाबत कळंबोली पोलीसांनी हलगर्जीने ट्रेलर चालविणा-या चालक महम्मद अरिफ अहमद याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : शेवटी पोलिसांनीच पुढाकार घेत अनधिकृत फेरीवाल्यांवर रात्री तीन वाजेपर्यंत केली कारवाई, मनपा सोबतीला 

हेही वाचा… रेवस जेट्टी रखडल्याने करंजा-रेवस रो रो सेवेची प्रवाशांना प्रतीक्षाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार महिन्यांपासून वाहनतळ कार्यान्वित करण्यासाठी मुहूर्त मिळेना… तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनतळ बांधून तयार आहे. या वाहनतळामध्ये चालकांसाठी विश्रामाची सोय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे. परंतू हे वाहनतळ अद्याप कार्यान्वित करण्यात आले नाही. २४ जूनला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे तळोजातील उद्योजकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी येथे आले होते. त्यांनी वाहनतळ पुढील महिन्यात सूरु करु असे आश्वासन दिले होते. अजूनही चार महिने उलटले तरी वाहनतळ अद्याप सूरु होऊ शकले नाही. राज्यात अनेक प्रकल्पांचे काम पुर्ण होऊन देखील मुहूर्त मिळत नसल्याने कार्यान्वित करण्यापासून रखडले आहेत.