पनवेल : पनवेल तालुक्यातील गावांचे रूपांतर विकसनशील शहरामध्ये होत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यापुढे तालुक्यातील सहा हजार हेक्टरवरील भातशेती नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी पर्याय म्हणून नवी मुंबईनंतर पनवेलचा शहर म्हणून विकास केला जात आहे. निवासी व औद्योगिक वापरासाठी पालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना विकासक होण्याची संधी मिळाली असली तरी पारंपरिक शेतीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांना प्रारूप आराखड्याबद्दल हरकती व सूचना नोंद करण्यासाठी पालिकेने ८ सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. दहा वर्षांपूर्वी १५ हजार हेक्टरवर भातशेती केली जात होती. यंदा सहा हजार हेक्टरवर भातपीक घेतले आहे. पनवेल महापालिकेने आगामी २० वर्षांत वाढत्या लोकसंख्येचा अंदाज धरून शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला असून यातील १२ हजार हेक्टर शेतजमिनीपैकी ७० टक्के जमिनींवर निवासी क्षेत्राचे आरक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: भक्कम इमारतीही पुनर्विकास सापळ्यात; घणसोली परिसरात माफियांचे पेव, खासगी संस्थांच्या अहवालावर इमारती धोकादायक ठरवण्याचे प्रकार

पालिका क्षेत्रातील १८ गावांवर या आराखड्याचा थेट प्रभाव पडणार असल्याने याचे सामाजिक व राजकीय दीर्घ परिणाम येथील ग्रामस्थांवर होणार आहेत. १२ हजार हेक्टर शेतजमिनींचे राखणदार असलेल्या शेतकऱ्यांना पनवेलच्या विकासात स्वत:चे राहणीमान उंचावण्याचीही संधी मिळेल, पण पारंपरिक शेती काही वर्षांत पनवेलमधून हद्दपार होणार आहे.

पनवेल तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी पनवेल महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ ११० चौरस किलोमीटर. त्याव्यतिरिक्त तालुक्यात नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (नैना) ४० गावांमधील ४५ चौरस किलोमीटर क्षेत्रात विकास आराखडा होत असून तेथेही सध्या मोठ्या प्रमाणात आठ हजार कोटी रुपयांची रस्ते व पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू होणार आहेत.

हेही वाचा : नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध पाणीपुरवठा; पाण्याच्या दोन हजार नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट

यंदा ६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातपीक घेतल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शरद गीते यांनी दिली. पनवेल पालिका क्षेत्रातील ६० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि नगररचनाकार विभागाच्या प्रमुख ज्योती कवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी भविष्यातील २० वर्षे कोणत्या प्रकारे विकास केला जाईल याचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला. यामध्ये पनवेल तालुक्यातील उत्तरेकडील गावांचा समावेश मोठ्या संख्येने आहे. या परिसरातील १५ गावांमधील शेतजमिनींवर निवासी क्षेत्र जाहीर करून शेतकऱ्यांना विकासाची संधी पालिकेने दिली.

या गावांमधील शेतजमिनींवर विकास बीड, आडिवली, रोहिंजण, धानसर, धरणकॅम्प, धरणगाव, पिसार्वे, तुर्भे, नागझरी, तळोजा मजकूर, घोट, कोयनावेळे, करवले बुद्रुक या गावांसह पूर्वेकडील काळुंद्रे, देवीचापाडा, पाले खुर्द, पडघे, वळवली या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा : पनवेल: ६२९ ठिकाणी आरक्षण, २९ गावांच्या विकासासाठी पनवेल महापालिकेचा पहिला प्रारूप विकास आराखडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना विकासक होण्याची संधी

या परिसरातील शेतकऱ्यांना पालिकेची परवानगी घेऊन यापुढे इमारत बांधकाम करून विकासक होण्याची संधी मिळेल. शेतजमिनींवर इमारत बांधल्यानंतर चौरस फुटाने सदनिका बांधून विक्री करता येईल. यासाठी लागणाऱ्या बांधकाम परवानगी व इतर परवानग्या घेऊन शेतकरी विकासक होतील.