पनवेल : खारघरमध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पूर्ववत झाला. वीज नाही म्हणून पाणी नाही. विजेची उपकरणे तर नाहीतच, पण मोबाइल, लॅपटॉप, उद्वाहन ठप्प पडल्याने नागरिकांच्या हालाला पारावार उरला नाही.
खारघर येथील सेंट्रल पार्कसमोरील रस्त्याकडेला वीज वाहिन्यांच्या डक्टमधून मंगळवारी दुपारी धूर येऊ लागला. बिघाड झाल्याची माहिती महावितरण कंपनीला मिळाली. पण नेमके काय झाले आहे, हे समजायलासुद्धा उशीर झाला. आग कशी लागली याचे उत्तर अद्यापही २४ तासांनंतर महावितरण कंपनीचे अभियंते ठामपणे देऊ शकत नाहीत. डक्टमधून एकाच वेळी दहा वीजवाहिन्या जळण्याची ही पहिलीच घटना आहे. अशी कोणतीही घटना घडणार नाही असे ठरवूनच एकाच डक्टरमधून या सर्व वीजवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या डक्टमध्ये आगीसारखी आपत्ती आल्यास पुढील परिसरात वीज कशी पोहोचवायची याचे कोणतेही पर्यायी नियोजन महावितरणच्या अभियंत्यांनी केलेच नसल्याने २२ तास दीड लाख लोकवस्तीचा परिसर विजेविना होता. याचा सर्वात मोठा परिणाम घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला, मुलांना, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागला.
विजेविना पाणीपुरवठा बंद होता. पाण्याशिवाय स्वयंपाक, पिण्यासाठी पाणी आणि भांडी धुण्यासाठी काय नियोजन करावे, असा प्रश्न गृहिणींना पडला होता. अक्षरशः पाण्याच्या दुकानातील बाटल्यांना पावसाळ्यात महत्त्व आले होते. मागील महिनाभरापासून ‘स्वप्नपूर्ती’ सोसायटीत सोमवार ते बुधवार पाणी अवघे काही मिनिटेच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या वीज समस्येमुळे पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अजून शनिवार उजाडेल अशी भीती नागरिक व्यक्त करीत होते. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वीज न आल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. बुधवारी सकाळी पाण्याविना अंघोळ आदी आन्हिकांशिवायच अनेकांनी कार्यालयाची वाट धरल्याचे निम्या खारघरचे चित्र होते.
एकाच डक्टमधून सर्व वीजवाहिन्या
महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात अभियंते, मजूर वर्ग ही वीज व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी सातत्याने काम करत होते. वीजवाहिनी जळाल्याने आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण डक्टमध्ये पसरले आणि बिघाडाचे निश्चित ठिकाण समजण्यासाठी अभियंत्यांना वेळ लागला. वाहिन्यांसाठीचा डक्ट काँक्रीटचा असल्याने त्यामध्ये सळई तोडण्यासाठी ब्रेकर व जेसीबीची मदत घ्यावी लागली. नेमकी आग कुठे लागली हे शोधणारी एआय यंत्रणा महावितरण कंपनीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे तोडकाम झाल्यानंतर ३ ते ४ मीटर लांबीच्या दहा वीजवाहिन्या एकाच ठिकाणी जळाल्याचे अनेक तासांनी समजले. बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत दोन वाहिन्यांना जोडून काही ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर इतर वाहिन्यांचे जोडकाम सुरू होते.