मुंबई : सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून बदल्यांबाबतचा निर्णय घेतला.

वल्सा नायर-सिंह यांची गृहनिर्माण, मनीषा म्हैसकर (मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाबरोबरच मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभार), प्रदीप व्यास (आदिवासी विकास), प्रवीण दराडे (पर्यावरण), हर्षदिप कांबळे (उद्योग), मिलिंद म्हैसकर (उत्पादन शुल्क व नागरी उड्डयण), संजय खंदारे (आरोग्य), अश्विनी जोशी (वैद्यकीय शिक्षण), सौरभ विजय (पर्यटन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तुकाराम मुंढे यांचीही (आयुक्त, आरोग्य ) बदली करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

  अशोक शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विपीन शर्मा यांची, तर पी.अनबलगन यांची महानिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.