नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) सध्या जांभळांची मोठी आवक सुरू असून, परिसरातील खेड्यांतून आणि आदिवासी भागांतून मोठ्या प्रमाणात हे फळ बाजारात दाखल होत आहे. महाराष्ट्रातील बदलापूर, खोपोली, कर्जतसह गुजरातहूनही जांभळांची आवक होत असून, प्रतिदिन दोन ते तीन गाड्यांमधून रसाळ जांभळे विक्रीसाठी येत आहेत. सध्या प्रतिकिलो दर ३५० ते ५५० रुपयांदरम्यान आहे.

जांभळाचा हंगाम मे अखेरीस सुरू होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत टिकतो. त्यामुळे हा हंगाम केवळ दीड ते दोन महिन्यांचा असून, रसिकांनी वेळेत या चविष्ट फळाचा आस्वाद घ्यावा, असा सल्ला व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.

कोकण, विदर्भ, रायगड, नाशिक, गडचिरोलीसारख्या भागांतील आदिवासी कुटुंबे या हंगामात जांभळाचे संकलन करतात. काही ठिकाणी महिला बचत गट या प्रक्रियेत सहभागी असून, फळ संकलनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व टप्प्यांत स्थानिकांना रोजगार मिळतो. यातून आदिवासी कुटुंबांना हंगामी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. अनेक भागांत जांभळावर प्रक्रिया करून रस, पावडर, जॅम, जेली इत्यादी उत्पादने तयार केली जात आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर प्रक्रिया केंद्रांनाही चालना मिळत आहे.

पावसाळ्याच्या आगमनानंतर जांभळाची उपलब्धता झपाट्याने कमी होते. त्यामुळे जांभळाचा आस्वाद घेण्यासाठी हे काहीच दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. बाजारात सध्या चांगल्या प्रतीची जांभळे मिळत असल्याने ग्राहकांनी ही संधी न चुकवता खरेदी करून आरोग्यदायी चव अनुभवावी, असा सल्ला एपीएमसीतील फळ व्यापारी महेश बाळसराफ यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्यवर्धक गुणधर्म

जांभूळ हे मधुमेह नियंत्रित ठेवणारे, पचन सुधारणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फळ मानले जाते. व्हिटॅमिन सी, फायबर व अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत असल्यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ जांभळाच्या नियमित सेवनाचा सल्ला देतात.