नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे गावातील एका आडोशाच्या जागेवर असलेल्या पडक्या घरात गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला होता. तेच लोक छोट्या मोठ्या चोऱ्याही परिसरात करीत होते. चिंचोळ्या गल्ल्या आणि लपण्यास मुबलक जागा असल्याने पोलिसांना अनेकदा त्यांनी गुंगारा दिला होता. त्यामुळे आज या परिसर पूर्ण स्वच्छ करून पडल्या घरातची दारे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेत पोलिसांनी स्थानिक नगारिकांची मदत घेतली. जेणेकरून जनसंवाद वाढावा . 

कोपरखैरणे सेक्टर १९ गावठाण भागातील जोशी आळीत एक पदके घर असून त्यासमोरील अंगणात दाट झाडी झुडपे वाढलेली आहेत. या ठिकाणाहून अनेकदा पोलिसांनी गर्दुल्ले आणि चोरटे पकडलेले आहेत. मात्र गेल्या काही दिवसा पासून उघड्या खिडकीतुन हात घालून मोबाईल, व इतर हाती लागेल त्या वस्तूंची चोरी होणे, उघड्या दरवाजातून गुपचूप घरात प्रवेश करीत वस्तू पळवणे या सोबत भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ होत होती.

हेही वाचा…कोकण रेल्वे प्रवासात दरवाजात उभे राहून मोबाईल हातात ठेवणे महाग पडले

विशेष म्हणजे या घरात गेल्या काही आठवड्यापासून काही जण रात्री वास्तव्य करत असल्याचे आसपासच्या लोकांच्या लक्षात आले होते. याबाबत पोलिसांना कळवल्यावर पोलीस कारवाईसाठी आले असता परिसरात लपून बसण्यास अनेक जागा असल्याने पोलिसांना सहज ते गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. ही परिस्थिती पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिवसा या ठिकाणी भेट देत परिसराची पाहणी केली. त्यावेळी लपण्यास मुबलक जागा, रात्री मुक्काम करीत पार्ट्या करत असलेल्या घरातून पळून जाण्यास असणाऱ्या अनेक वाटा, शेजारीच दोन तीन पत्रे टाकून केलेला आडोसा हे सर्व पाहणीत समोर आले.

हेही वाचा…कळंबोली लोखंड बाजारातील गोदाम फोडून २६ लाखांचा माल मुंबईला विकणाऱ्याला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे सोमवारी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीम त्यांनी मनपा स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पार पाडली . मोठ्या प्रमाणात माजलेली झुडपे तोडून टाकण्यात आली. पडक्या घराच्या खिडक्या व दारे बंदिस्त केली गेली, उपयोगात नसलेली काही पत्र्यांची शेड काढून टाकण्यात आली. सदर मोहिमेत वासुदेव वेटा , आत्माराम पाटील विद्यानंद पाटील आदी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक उपस्थित होते. मोहिमेत सर्वांचा सहभाग असल्याने पोलिसांच्या समवेत संवाद वाढू शकेल या उद्देशाने ही मोहीम जनसहभागातून पार पाडण्यात आली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.