नवी मुंबई:- नवी मुंबई मनपा जल पुरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्ती साठी दोन दिवस जल पुरवठा खंडित केला आहे.मात्र दुरुस्ती रखडल्याने आता पुन्हा उद्यादेखील रहिवाश्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य सोसावे लागणार आहे.घरात पाण्याचा थेंब देखील नसल्याने महिला वर्ग अचानक भर रात्री घरातील हंडे बादल्या कमरेवर घेवून नवी मुंबई शहरातील उद्यान आणि मैदानांमध्ये पाण्यासाठी जीव धोक्यात घालून कुंपण ओलांडून पाणी नेत आहेत. वाढत्या तापमानातील काहिलीने नागरिक हैराण झाले असताना या वातावरणात तहान भागवण्यासाठी विकतचे पाणी अनेकांनी घेतले.

पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.

मात्र घरात पाण्याचा एकही थेंब नसल्याने अखेर नागरिकांनी हंडे बादल्या मिळेल ते साहित्य घेवून पाण्याच्या शोधत वणवण हिंडत होते.अशीच गर्दी कोपरखैरणे येथील सेक्टर पाच ते आठच्या उद्यानात उसळल्याने पाण्याची तात्पुरत्या टंचाईने नागरिकांचे अत्यंत हाल झाले.राज्यातील दुसरी स्वमालकीचे धरण अशी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या नवी मुंबई शहराची पाण्याअभावी  चांगलेच हाल झाले.जलवाहिनी आणि पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीसाठी तीन दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.गृह संकुलामध्ये पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ नवी मुंबई शहरातील जनतेवर आली आहे.अद्यापि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा उद्या सायंकाळ पर्यंत होणार नसल्याने पाण्यासाठी आणखी हाल सोसावे लागणार आहे.