उरण : शहरातील वाहतूक कोंडीतही दिवसभराची भर पडली आहे. सध्या सकाळी सहा वाजल्यापासून उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका येथे प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे पहाटे प्रवास करणारे वाहनचालक आणि नागरिक ही त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे भर पाऊस आणि कडक उन्हात होऊ लागलेल्या सातत्याच्या कोंडीमुळे नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.

उरण शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. नगर परिषदेने शहरात सम, विषम तारखांचे व नो पार्किंगचे फलक बसविले आहेत. मात्र अशा फलकांनंतर वाहनांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही उरण नगर परिषदेने शा प्रकारचे फलक बसविले होते. मात्र त्याची अनेक वर्षे अंमलबजावणी न झाल्याने कोंडीत भर पडली आहे. तर बहुतांशी ठिकाणी ‘नो पार्किंग’च्या फलकाशेजारीच मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करून ठेवली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’ होणार की कारवाई होणार, अशी शंका उरणकरांकडून व्यक्त केली जात आहे.

उरण शहर व परिसरातील लोकवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे उरण शहरातील रस्ते वाहनांच्या तुलनेत अपुरे पडू लागले आहेत. मात्र त्यातही चारचाकी व दुचाकी वाहन चालकांच्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे शहरातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उरणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस व उरण नगर परिषद यांच्यात समन्वय होणे आवश्यक आहे. तरच ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यात यश येईल.वाहतूक विभागाजवळ मनुष्यबळ नसल्याने ही समस्या वाढू लागली आहे. मात्र पोलीस आणि नगर परिषद यांनी सयुक्तिक कारवाई सुरू केल्यास समस्या दूर होऊ शकते, असे मत उरणमधील सामाजिक कार्यकर्ते महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. तर उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उरण नगर परिषदेने जनजागृती म्हणून एक शॉर्ट फिल्म प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे नागरिक ‘स्वयम् शिस्त’ पाळतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या फिल्मबद्दल शहरातील नागरिकांकडून अनेक मते व्यक्त केली जात आहेत.

नगर परिषद आपली जबाबदारी नागरिकांवर झटकत असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यंत्रणा राबवावी, कोंडीला कारणीभूत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि त्यानंतर नागरिकांचे सहकार्य मागावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे.शहरातील वाहतूक कोंडी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उरणच्या वाहतूक पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी उरणच्या जनतेने सहकार्य करावे असे आवाहन उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी केले आहे.

वाढत्या उरण शहर आणि परिसरामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहरात येणारी जड व मोठया प्रवासी वाहनांना मुख्य बाजारा ऐवजी बाजारपेठ वगळून इतर मार्गाने ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एकदिशा मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी सुरक्षा साधने वापरून नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यात दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करावे. चालकांनी नियम न पाळता वाहन चालविल्यास त्यानंतर कारवाई करण्यात येईल असे संकेत उरणच्या वाहतूक विभागाने दिली आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पर्यायी बाह्यवळण मार्गाच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे सिडको कडून उभारण्यात येणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे उरणच्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळणार असला तरी या मार्गाचे काम पूर्ण कधी होणार याची निश्चिती नाही.

कोंडीवरील उतारा रखडला :

उरण शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकची भर पडत आहे. त्यामुळे या कोंडीवर महत्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास)मार्गाची प्रतीक्षा कायम आहे. उरणकरांची ही प्रतीक्षा केव्हा संपणार असा सवाल वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या उरणकर नागरिकाकडून केला जात आहे.