उरण : आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी करंजा येथील कोंढरीमधील शेतकरी व मच्छीमार ग्रामस्थांनी करंजा टर्मिनल या खासगी बंदराच्या विरोधात द्वारबंद आंदोलनासाठी कोंढरी ते टर्मिनल असा मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांच्या मध्यस्थीने बंदर व्यवस्थापनाकडून बैठकीचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन १२ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे.
जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कंपनीत तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, शेतकरी व मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या, स्थानिक कामगार व बाहेरील कामगार यांच्या पगारातील तफावत दूर करा, कंपनीकडून ग्रामस्थांना दिलेल्या नागरी सुविधांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बंदराचे द्वारबंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालत व घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला होता.
कोंढरी गावातील ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व प्रशासन यांची पोलिसांनी चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे पोलिसांनी मोर्चा काढू नये बंदराच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याची सूचना केली होती तसे लेखी पत्र कंपनी कडून देण्यात आले आहे. त्यानुसार १२ एप्रिलला बंदराच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याने अखेरीस ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा करीत आंदोलन मागे घेतले.