गेल्या वर्षीपेक्षा मोरबेची पाणीपातळी कमी; धरण भरण्यासाठी ४ हजार ४००मिमी पावसाची गरज

नवी मुंबई राज्यात तीव्र पाणीटंचाई असताना नवी मुंबईकरांना मुबलक पाणी मिळत आहे. सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या धरणात आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा आताची पाणीपातळी तीन मीटरने कमी झाली असून यावर्षी पाऊस लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यावर्षी ४ हजार ४०० मि.मी पावसाची गरज आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन आवश्यक असून नागरिकांनीही पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

नवी मुंबई महापालिकाक्षेत्राला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. सलग दोन वर्ष मोरबे धरण भरले आहे. यंदाही चांगला पाऊस झाल्यास धरण भरेल. मात्र गेल्या वर्षी ३ जूनलाच पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र पावसाळा लांबणीवर पडणार असल्याचा आंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे १७ जूननंतर पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. २०१७ मध्येही मोरबे धरण परिसरात ८ जूनला तर नवी मुंबई शहरात १ जूनला पावसाने सुरुवात केली होती. गेल्या वर्षी ३ जूनलाच पावसाचे आगमन झाले होते. मोरबे धरण ८८ मीटर पातळीला भरते. धरण पूर्ण भरल्यानंतर १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. सलग दोन्ही वर्षी धरण भरले होते. गेल्यावर्षीपेक्षा धरणातील पाण्याची पातळी तीन मीटरने कमी आहे. त्यामुळे  भविष्याचा विचार करता सुयोग्य साठा शिल्लक असावा याबाबत योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी दिली.

मोरबे धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याबाबत आढावा घेण्यात येणार असून ‘मोरबे’तून दररोज उचलण्यात  येणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे प्रमाण कमी करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

-डॉ. रामास्वामी एन., आयुक्त

मोरबे धरणातील पाण्याची स्थिती

७६.२२ मीटर

२८ मे  २०१८ :

पाणीपातळी :९१.०७२ दशलक्षघन मीटर

पाणीसाठा : ७३.०८ मीटर

२८ मे २०१९ :  पाणीपातळी :

पाणीसाठा : ६९.९४२ दशलक्षघन मीटर