उरण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने बुधवारी करंजा मधील शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन उरण तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. यावेळी उरणचे तहसीलदार,एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,गटविकास अधिकारी,सिडको हेटवणे पाणी पुरवठा अधिकारी व चाणजे ग्रामविकास अधिकारी  यांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन देत सर्व अधिकारी मोर्चाला सामोरे आल्याने तहसिल कार्यालयावरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या मालकीचे,कोण म्हणतोय देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाही,बोल रे बोल हल्ला बोल,प्रशासनावर हल्ला बोल,ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, आदी जोरदार घोषणा देत हा मोर्चा उरणच्या एस. टी. बस स्थानक ते चारफाटा,पालवी हॉस्पिटल,बालई मार्ग, खिडकोली नाका,गांधी चौक ते उरण तहसील कार्यलय असा मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा >>> गृहिणींना मसाला बनविण्यासाठी दिलासा; घाऊक बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर ५०-१००रुपयांनी उतरले 

मागील अनेक वर्षांपासून करंजा ग्रामस्थांना २८ दिवसातून एकदा तासभर पाणी येत असल्याने या विरोधात करंजातील सात पाड्यातील ग्रामस्थ कॉ. भूषण पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आणि पाण्यासाठी एकच मागणी,हवे पिण्याचे पाणी असा एल्गार करीत बुधवारी १ मार्चला उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

यशस्वी मोर्चा* :डोक्यावर हंडा घेत काढलेल्या करंजा येथील महिलांच्या मोर्चाला यश आले असून तातडीने ग्रामपंचायती कडून १० पाण्याचे टँकर सुरू करणे,पाण्यासाठी येथील गावात दहा बोरिंग मारणे,एमआयडीसी च्या जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्यावर कारवाई,एमआयडीसी कडून ११०० तर सिडकोच्या हेटवणे योजनेतून १५० युनिट पाणी पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना राबवूनही करंजा येथील ३० हजाराच्या लोकवस्तीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढतच चालली आहे. १५ दिवसातून एकदा तासभर येणारे पाणी २१ दिवसावरून आता २८ दिवसांवर पोहचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासन, एमआयडीसी,लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात असंतोष पसरला आहे.त्यातच येथील अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याचा फटका द्रोणागिरी हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना बसत होता.  उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीत अनेक दशकापासून करंजा सात पाड्यात अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या आहे.

हेही वाचा >>> जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध आदिवासी महिलेचे बेमुदत उपोषण; आदिवासींची जमीन बिगर आदिवासींच्या नावे

ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद,राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून करंजा परिसरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. असे असतांना ही करंजा येथील अनियमित व अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. यामध्ये ग्रामस्थांच्या पर्यंत पाणीच पोहचत नाही. ते मध्येच फस्त होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या गावांना एमआयडीसीच्या रानसई धरणातून व नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून आशा दोन योजनांतून पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यामुळे होणाऱ्या अनेक साथीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ग्रामस्थांच्या बैठकीला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर यावेळी कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,महिला नेत्या हेमलता पाटील,कुसुम ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा, संदीप पाटील,मनोहर कोळीअरविंद घरत,प्रदीप नाखवा,कमला म्हात्रे,.देविदास थळी, सरस्वती कोळी व सात गावातील गाव अध्यक्ष ही उपस्थित होते.