नवी मुंबई – मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणारा नगररचना विभाग, प्रभावी असणारे मलनिस्सारण खाते तसेच स्थापत्य विभागात मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रशासकीय प्रमुखांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात असल्याची चर्चा एकीकडे रंगली असतानाच यावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. यापुढे स्थापत्य तसेच नगररचना विभागात नियुक्त्या करताना अभियंत्यांची लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेच्या प्रश्न आणि उत्तरपत्रिकांच्या रितसर नोंदी ठेवून त्यात उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांनाच योग्य पद्धतीने नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेतील सर्व विभागीय कामकाज सुरळीतपणे चालावे या उद्देशाने विविध बदल, उपाययोजना लागू करण्यात येत असतात. अशातच बदलत्या शासकीय कार्यपद्धतीनुसार महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुसूत्रतेने आणि सर्वसमावेशक न्यायप्रक्रियेनुसार व्हाव्यात, यासाठी आयुक्तांच्या आदेशाने ‘नागरी सेवा मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ‘नियुक्तीसाठी परीक्षा नियम २०२५’ घेण्यात येणार आहे. याअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातील अधिकाऱ्यांना नगररचना विभागात बदली अथवा नियुक्तीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिका ओळखली जाते. मागील सहा वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट अस्तित्वात आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात मोक्याची पदे पटकावण्यासाठी काही ठराविक अधिकारी आणि अभियंते मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा होती. मागील अडीच-तीन वर्षात तर मंत्रालयापासून राज्याच्या वेगवेग‌ळ्या भागात कार्यरत असलेल्या प्रभावी नेत्यांचे दूरध्वनी आणि दबाव या नियुक्त्यांमध्ये वाढले असल्याचेही सांगितले जात होते.

नवी मुंबई महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर पु्नर्विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नगररचना विभागात नियुक्तीसाठी तर चढादर सांगितला जात असल्याचीही कुजबुज होती. या विभागात नगररचना संचालकांपाठोपाठ सगळ्यांचे अधिकार मिळावे यासाठी एका वरिष्ठ अभियंत्यांने आणलेल्या एका नेत्याचा दबाव महापालिकेत सातत्याने चर्चेत येत होता. या दबावाच्या नियुक्त्यांवर उपाय म्हणुन महापालिका आयुक्तांनी आता थेट लेखी परिक्षांचा तोडगा पुढे आणल्याचे सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नवा निर्णय ?

महापालिकेच्या स्थापत्य आणि नगररचना विभागांना शासनाची मान्यता प्राप्त असून, विभागांतील पदसंख्या निश्चित आहे. स्थापत्य अभियंते सध्या सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि मलनिःस्सारण, मालमत्ता आणि नगररचना विभागांमध्ये कार्यरत आहेत. या अभियंत्यांना नगररचना विभागात बदलीसाठी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान हा निर्णय प्रशासकीय गुणवत्ता वाढवण्यासाठी घेतला असल्याचे महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.