कुतूहल
स्वसंरक्षणार्थ काहीही!
मुंग्यांच्या डंखांमध्ये असलेलं फॉर्मिक आम्ल हे रसायन मधमाशीच्या डंखामध्येही असतं. पण त्याचबरोबर मधमाशी आपल्या डंखामध्ये मेलिटीन या तीव्र अल्कधर्मी रसायनाचा वापर करते. त्यामुळे मधमाशीच्या डंखाची तीव्रता जास्त असते. आणि कधी कधी तर मधमाशीच्या डंखांमुळे शरीरावर अॅलर्जीही उठते.
अशा प्रकारे अनेक प्राणी स्वसंरक्षणार्थ आपल्या शरीरातल्या रसायनांचा सढळपणे वापर करीत असतात. काही छोटे कीटक तर शत्रूवर चढाई करून जाण्यासाठी आपल्या शरीरातून एक वायुरूपी रसायन सोडतात. हे रसायन थोडंसं जाडसर आणि चिकट असतं. त्यामुळे शत्रुकीटकाचे तोंड किंवा हातपाय चिकटले जातात आणि तो जायबंदी होतो. आफ्रिकेत आढळणारी स्पिटिंग कोब्रा नावाची सापाची एक जात आहे. स्पिटिंग म्हणजे थुंकणे! स्पिटिंग कोब्रा त्याच्यापासून जवळजवळ अडीच ते तीन मीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या डोळ्यात थुंकीचा नेमका फवारा मारू शकतो. हा थुंकणारा साप आपल्या थुंकीद्वारे फॉस्फोलिपेसेस ए-२ हे रसायन शत्रूच्या डोळ्यात थुंकतो. या रसायनामुळे पेशींच्या आवरणावर परिणाम होतो डोळ्यांची विलक्षण जळजळ होते आणि कधी कधी प्राणी आंधळाही होतो.
सापाशी जन्मजात शत्रुत्व असलेला प्राणी म्हणजे मुंगूस. काही ठरावीक जातीची मुंगुसं आपल्या शेवटी जवळ असलेल्या पिशवीतून काळ्या-पांढऱ्या रसायनाचा फवारा सोडतात. हे रसायन म्हणजे मिथाईल किंवा ब्युटाईल थायोलसारखं गंधकाचा अंश असलेलं रसायन असतं. या रसायनाला कुजकं लसूण आणि जळणारा रबर अशा मिश्रणासारखा दरुगध येतो. हे रसायन शरीरातून सोडण्याआधी मुंगूस आपल्या शत्रूला तशी सूचना देतं. पाय आपटून किंवा गुरगुरून आपण तो भयानक वास सोडत असल्याची सूचना देऊनही शत्रू पक्ष बधला नाही तर मुंगूस स्वसंरक्षणाचं आपलं हत्यार बाहेर काढतं. स्पिटिंग कोब्राप्रमाणेच मुंगूस त्याच्यापासून चार मीटर अंतरावर असलेल्या प्राण्यावर या रसायनाचा अचूक मारा करू शकतं. ज्या वाटेवर हे रसायन मारलं असेल तिथला तो विशिष्ट वास पुढे कित्येक दिवस तसाच राहतो.

डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला मार्क्सवादाची जोड
‘‘मी मार्क्सवाद-लेनिनवादाचा अथवा कम्युनिझमचा अनुयायी आहे. याचा अर्थ असा नव्हे की, मी या अगर त्या देशाची कार्यपद्धती अनुसरीत आहे. उलट, इतिहासाने आवश्यक व बिनचूक ठरविलेल्या अशा समाजाची पुनर्रचना करणाऱ्या एका कार्यपद्धतीचा अवलंब मी करीत आहे; इतकाच त्याचा अर्थ होय.. साम्राज्यवादी भांडवलदारांकडून होणारी भारताची लूट अजिबात बंद करणे, त्यांच्या नोकरशाहीची देशातून हकालपट्टी करणे, त्यांची लष्करशाहीवर आधारलेली राजवट उलथून टाकणे हीच आमच्या कामगार व शेतकरी वर्गाच्या क्रांतिकारक लढय़ाची उद्दिष्टय़े आहेत. सर्व प्रकारचे शोषण बंद करणे हीच आमच्या स्वातंत्र्याच्या मागणीची स्पष्ट व्याख्या आहे.. मार्क्सवाद-लेनिनवादाची योग्य विचारसरणी व तिच्या जोडीला योग्य आचरण ही जोडगोळी जवळ नसेल तर तुम्हाला मक्तेदारी भांडवलशाहीची मगरमिठी सोडविता येणार नाही, तिच्या राजसत्तेची मिठी सोडविता येणार नाही, लोकशाही व समाजवादाची प्राप्ती करून घेता येणार नाही.’’ – कॉ. श्री. अ. डांगे मार्क्सवाद-लेनिनवादाचा सद्यकालीन, एतद्देशीय उद्दिष्ट मार्ग सांगतात म्हणतात –  ‘‘राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीच्या प्रचलित व्याख्या ऐतखाऊ वर्गाने बनविलेल्या आहेत. त्यांना देश, राष्ट्र म्हणजे देशातील लोक, कामगारवर्ग, तंत्रज्ञ हे अभिप्रेत नसून नफे कमाविण्याची साधने, कच्चा माल आणि पिळवणुकीकरिता गरीब कष्टकरी वर्ग हेच अभिप्रेत आहे.. ऐतखाऊ लुटारूंपासून आणि साम्राज्यवादी आक्रमकांपासून देशाला वाचविणे आणि ‘सुजलाम् सुफलाम्’ बनविणे हाच कामगारवर्गाचा ‘राष्ट्रवाद’ आहे.. समाजाची संपत्ती ज्या ठिकाणी संचित झाली आहे ती उत्पादनसाधने आज भांडवलदारांच्या खाजगी मालकीची आहेत. म्हणून बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे समाजाच्या दु:खाचे, सर्व आपत्तीचे मूळ जी खाजगी मालमत्ता, ती ज्या भांडवलशाहीच्या मालकीची आहे ती भांडवलशाही नष्ट करण्यासाठी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला मार्क्सवादाची जोड देऊन भांडवलदारी समाजपद्धती नष्ट करणे हेच बुद्धजन व आपण सर्वासमोरील कार्य आहे.’’

मनमोराचा पिसारा
ढूंढ रही है शम्मा
उर्दू शेरोशायरीपासून फिल्मी हिंदी गाण्यामध्ये प्रेमिका म्हणजे हुस्न अथवा सौंदर्याचा आविष्कार, तर माशुक इष्काचं प्रतिनिधित्व करतो. स्त्रीने सुंदर असावं आणि तिच्या लावण्यावर फिदा झालेल्या आशिकानं आपल्या इष्काचा इजहार करावा, हा स्टॅण्डर्ड फॉर्म आहे.
त्यामुळे पुरुषाच्या देखणेपणाचं वर्णन करणारी गाणी जास्त नाहीत. त्याचं सौंदर्य शौर्य, पराक्रम आणि तिखी नजर यांत अडकून राहतं. ‘हसता हुआ नुराती चेहरा, काली जुल्फें रंग सुनहरा’ हे एलपींच्या ‘पारसमणी’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातल्या गाण्याने पन्नाशी गाठली असावी.
त्याचमुळे पुरुषाच्या राजबिंडय़ा रूपाचं मदमस्त वर्णन करणारं गाणं ऐकलं की ‘अनुशेष’ भरल्याचा आनंद होतो. या ‘झॉन्र’मधलं तसंच एक मदमस्त गाणं आशाताईनं ‘फिर वही दिल लाया हूँ’ या सिनेमासाठी अर्थातच ओपी नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनात म्हटलंय.
या गाण्यातली नायिका (आशा पारेख) नायकाच्या (जॉय मुखर्जी अरेरे!) ‘हुस्न’चं मदहोश वर्णन करते.
गाण्याचा बाज असा नायकाच्याभाळलेल्या नायिकेचा असला तरी सांकेतिक प्रतीकांचे छान मॉडिफिकेशन आढळतं.
‘खुद ढूंढ रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवाने की’ असं म्हणून नायिका आपण केवळ हुस्नवाले नसून इष्कबाजी ही आपली जहागिरी असं जाहीर करते.
गाण्यातल्या नायकाच्या राजसपणाचं वर्णन मजरूह सुलतानपुरीनं दिमाखात केलंय. त्याच्या येण्याची चाहूल लागली की बसंत नकळत फुलतो.
नायकाच्या ओठावरचं रुबाबदार स्मित आणि डोळ्यामधले खटय़ाळ भाव श्वासातली मोहब्बतीची खुशबू यानं तिला पुरतं घायाळ केलंय. त्याच्या येण्यानं, असण्यानं मी पूर्णपणे बदलून गेले आहे. त्याचं चित्र डोळ्यांनी पाहिलं खरं, पण ते चितारलं मात्र माझ्या हृदयावर. असा हा माझा हिरो अजून मला तरी अंजाना आहे. कोण बरं असेल हा मर्द?
त्याची दृष्टभेट झाली, चुटपुरता सहवास लाभला, पण वाटलं की याची माझी ‘कहानी’ जनम जनम की असावी, असा हा माझा ‘सोलमेट’!
गंमत म्हणजे सिनेमाचे फिल्मी संदर्भ काढून टाकले तरी या गाण्यातले बोल मनाला पटतात. कधीतरी होतं असं की, एखादी व्यक्ती भेटते घटका दोन घटका. थोडी बातचीत, नजरेत गुफ्तगू आणि वाटतं, या व्यक्तीनं कायमचं असावं आपल्यासमवेत, याच्याशी जुळावे प्रेमाचे, मैत्रीचे नातेसंबंध. त्याच्या केवळ असण्यानं आपल्या मनाचं सुनेपण नष्ट होतं आणि हृदयाच्या अवकाशात लख्ख प्रकाश पडतो..
झालंय कधी असं तुझं? नसेल झालं तर होऊ दे कधीतरी.. मनाला हुरहुर लागेल.. लागू दे ना.. अरे असे मस्त क्षण नसले तर उरतं काय? प्रेमाशिवाय असलेलं अळणी आयुष्य!!
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com