‘हे माझे शरीर आहे, हे माझे मन आहे’ याचे भान माणसात वयाच्या एक वर्षांपासून विकसित होऊ लागते. असे आत्मभान तपासण्याची मानसशास्त्रात एक चाचणी आहे. लहान मुलाच्या चेहऱ्यावर रंगीत टिकली लावून त्याला आरसा दाखवला, तर आरशात पाहून- ही टिकली आपल्या चेहऱ्यावर आहे हे समजल्याने चेहऱ्यावरील टिकलीवर बोट नेणे, हे आपले शरीर आरशापेक्षा वेगळे आहे याचे भान असल्याचे लक्षण आहे. एक वर्षांपेक्षा लहान मुले हे करू शकत नाहीत. १५ ते १८ महिने वय असलेल्या २५ टक्के मुलांना हे भान असते, तर दोन वर्षांच्या ७० टक्के मुलांना हे भान आलेले असते. अन्य प्राण्यांवरदेखील ही चाचणी शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यासाठी त्यांना बेशुद्ध करून चेहऱ्यावर अशी टिकली लावून शुद्धीवर आल्यानंतर आरसा दाखवला जातो. पूर्ण वाढ झालेले चिम्पांझी, गोरिला, पेंग्विन आणि भारतीय हत्ती आरशात पाहून चेहऱ्यावर जेथे टिकली असते, तेथे स्पर्श करू लागतात. अन्य प्राणी वा पक्षी यांना हे भान नसते.

हे भान नसले तरी प्राण्यांना शरीराचे भान असते. त्यांना शरीरातील संवेदना जाणवत असतात. ते शरीर खाजवतात. काही त्रास वाटत असेल तर मांजरे औषधी वनस्पती खातात. अन्य सर्व प्राणी सतत क्षणस्थ असतात. ते बाह्य वातावरणाविषयी माणसापेक्षा अधिक सजग असतात. मात्र माणसाच्या मेंदूत जी व्यवस्थापकीय कार्ये चालतात, त्यासाठी आवश्यक असणारा मेंदूचा विकास अन्य प्राण्यांत झालेला नसतो. त्यामुळे अन्य प्राणी त्यांचा प्रतिसाद निवडू शकत नाहीत. त्यांचे वर्तन चाकोरीबद्ध असते. माणूस त्याच्या भविष्याची कल्पना करू शकतो. अशी कल्पनाशक्ती अन्य प्राण्यांत नसते. त्यामुळे अन्य प्राणी नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकले नाहीत. मला ही मूल्ये महत्त्वाची वाटतात, आयुष्याचा विकास या दिशेने करायचा आहे, असे ठरवून तसे  प्रयत्न करण्यासाठी आवश्यक असलेले आत्मभान अन्य प्राण्यांत नसते.

माणसात असे आत्मभान विकसित करायला साक्षीध्यान आणि समुपदेशन उपयुक्त ठरते. समुपदेशनामध्ये असे प्रश्न विचारून स्वतविषयी विचार करायला प्रवृत्त केले जाते. ध्यानाच्या सरावाने मेंदूतील व्यवस्थापकीय कार्ये करणारे भाग विकसित होत असल्याने स्वतच्या ‘सिग्नेचर स्ट्रेंग्थ’ समजू लागतात आणि त्यांचा उपयोग होणारे काम निवडता येते.

डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com