थंडीमध्ये आपल्याला अंथरुणातून बरेच निश्चयपूर्वक उठावे लागते. प्रभातफेरी म्हणजे मॉर्निग वॉक करणाऱ्यांकरिता तर थंड वारे आणि निसर्गसान्निध्य हे निश्चयाची परीक्षा पाहतात. मग गरम चहाचा कप आणि कोपऱ्यावर पेटवलेली शेकोटी ही आपल्याला आकर्षित करते. या शेकोटीमध्ये कोणी तरी कागदे, थोडीशी लाकडे वगैरे टाकतो आणि आपण ऊब घेतो. हिवाळ्यात पहाटे, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री अशी दृश्ये आजूबाजूला पाहायला मिळत असतात. पण अशा अनेक शेकोटय़ा ठिकठिकाणी पेटवल्या, तर त्यामुळे प्रदूषणात वाढ होते, हे मात्र आपल्या ध्यानात येत नाही. उदाहरणार्थ, अशी शेकोटी बागेजवळ असेल, तर तिच्यात झाडांच्या सुकलेल्या पानांचा अंतर्भाव असतो. ही पाने जळताना भरपूर धूर होतो. ओल्या पानाचा आणि ओल्या लाकडाचा धूर तर आणखी जास्त होतो. सुकलेल्या पानांचा धूर कमी असतो, परंतु हलक्या पानाच्या कणांचे जळत्या कणांमध्ये रूपांतर होऊन ते ज्वाळेबरोबर सर्वत्र पसरतात. आपण हमरस्त्यावरून जात असू, तर तिथे ट्रकचालक मंडळी शेकोटी करताना दिसतात. या मंडळींना शेकोटीत जाळण्यासाठी आजूबाजूला काही मिळाले नाही, तर चक्क गाडीच्या खराब झालेल्या टायरचे तुकडे जाळतात. त्यांचा धूर दाट काळा होतो. टायरमधील गंधकामुळे अत्यंत विषारी अशा सल्फर ऑक्साइडच्या धुराने आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होते. ही आग लावायला अनेकदा ते त्यांच्याकडचे इंजिनचे तेल वापरतात, त्यामुळेही प्रदूषण होते. कपडे, कागद, लाकडी फर्निचर, प्लास्टिकच्या वायर्स, प्लास्टिकच्या वस्तू अशा सर्व कचऱ्याची शेकोटी केली जाते. या सर्व वस्तूंमधून निघणारा धूर हा श्वसनासाठी घातक असतो. अनेकदा गृहसंकुलाची पहारेकरी मंडळी तेथील टाकाऊ लाकडी फर्निचरमधील वॉटरप्रूफ प्लायवूड एका घमेल्यात पेटवलेल्या शेकोटीत टाकताना दिसतात. अनेकदा त्यामधील फिनॉल किंवा इतर सेंद्रिय रसायने जळण्यामुळे होणारे प्रदूषण तर अतिघातक आहे. म्हणून दिसेल तिथे शेकोटीला थांबवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे वायुप्रदूषणाला आळा घालता येईल! - विद्याधर वालावलकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org