जन्माने ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेल्या कॅप्टन जव्र्हिस यांनी आपल्या आयुष्याची जवळपास चाळीस वर्षे भारतात व्यतीत केली. या काळात त्यांनी गणित, भूमिती या विषयांवरची पुस्तके मराठीत भाषांतरित केली, तसेच या विषयांवर मराठीत नवीन पुस्तके लिहिली आणि त्यांची छपाई करून घेतली. त्यांचे मराठी भाषेला दिलेले हे योगदान स्तिमित करणारे आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘शिक्षामाला’ या ग्रंथावरून तर त्याच्या मराठी भाषाभिमानाच्या अनेक गोष्टी जाणवतात. जव्र्हिसने हा ग्रंथ लिहिताना भास्कराचार्याच्या लीलावतीचाही अभ्यास केला होता! हे या पुस्तकाच्या आरंभी ‘यावत् तावत्’च्या केलेल्या उल्लेखावरून दिसून येते. गणित-भूमितीसारख्या शास्त्रीय पुस्तकांत मराठीतील नवे पारिभाषिक शब्द योजून गणितावर पुस्तके लिहिणारा कॅप्टन जव्र्हिस हा पहिलाच माणूस! त्या काळी शास्त्रीय विषयांत मराठी पारिभाषिक शब्द नव्हते. काही ठिकाणी नाइलाज म्हणून जव्र्हिस यांनी इंग्रजीतील मूळ शब्दच कायम ठेवले. जसे ‘लाग्रतम’ (लॉगॅरिदम). जव्र्हिसनी गणिताखेरीज ‘विद्य्ोचे लाभ, उद्देश आणि संतोष’ हे सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना अर्पण केलेले पुस्तक लिहिले. जव्र्हिस यांची अधिकतर पुस्तके १८२६ ते १८४० या कालखंडात लिहिली गेली आहेत. जव्र्हिस यांनी मराठी भाषेत विविध विषयांवर पुस्तक निर्मितीचे जे प्रचंड काम केलं, त्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी मुंबईतील लोकांनी तीन हजार रुपयांचं चांदीचं तबक त्यांना बक्षिस देण्याचं ठरवलं. मुंबईतील चोवीस प्रतिष्ठित गृहस्थांनी हे तबक स्वीकारण्याची जव्र्हिसना पत्राद्वारे विनंती केली. या पत्रावर फ्रामजी कावसजी, जमशेटजी जिजीभाय, जहांगीर नरवानजी, जगन्नाथ शंकरशेट, सदाशिव छत्रे वगरेंच्या सह्य़ा होत्या. हे पत्र मिळाल्यावर, सरकारने जर हे तबक स्वीकारण्यास परवानगी दिली तरच आपण त्याचा स्वीकार करू, असे त्यांनी उत्तर दिले. ते पत्र जव्र्हिस यांनी मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर माल्कमकडे दिले. माल्कमने ते पत्र लंडनला कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे पाठविले. परंतु गव्हर्नरची परवानगी असूनही डायरेक्टर्सनी ते बक्षीस जव्र्हिसना स्वीकारण्यास परवानगी दिली नाही. पुढे १८५१ साली जव्र्हिस रजा घेऊन इंग्लंडला गेले पण काही महिन्यांतच आजारी पडून त्यांचे बुलोन येथे निधन झाले. sunitpotnis@rediffmail.com