स्निग्ध पदार्थामुळं वजन वाढू नये म्हणून बरीच जणं आहारातून स्निग्ध पदार्थ हद्दपार करतात. याचबरोबर तेलामुळं कोलेस्टेरॉलचं शरीरातील प्रमाण वाढू शकतं, अशीही भीती असते. कोलेस्टेरॉलचं वाढणारं प्रमाण हे हृदय रोग्यांना धोकादायक असतं. या गोष्टींचा फायदा घेऊन जाहिरात केली जाते की ही तेलं कोलेस्टेरॉल मुक्त आहेत.
खरं तर कोणत्याच तेलात (वनस्पतीजन्य) कोलेस्टेरॉल नसतं. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत असणारा एक महत्त्वाचा घटक आहे, पण तो आहारात असलाच पाहिजे असं नाही; कारण तो शरीरातच निर्माण होतो. शरीरात अनेक हार्मोन्स, पित्त व ‘ड’ जीवनसत्त्व यांची निर्मिती करण्यास तो मदत करतो. अन्नातून मिळणारं कोलेस्टेरॉल फक्त प्राणिजन्य (उदा. मांस, मासे, अंडी वगरे) पदार्थातून मिळतं. तूप, लोणी, वनस्पती तूप आहारात वापरल्यानं शरीरात कोलेस्टेरॉल निर्माण व्हायला मदत होते. सर्वसाधारण अन्नातून फक्त १/३ कोलेस्टेरॉल मिळतो आणि बाकी राहिलेलं २/३ कोलेस्टेरॉल आपल्या शरीरातच तयार होतं.
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा स्टिरॉल गटातील रक्तात न मिसळणारा पदार्थ आहे; पण जेव्हा त्यांचा प्रथिनांशी संयोग होतो, तेव्हा एक एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि दुसरा एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, अशी दोन प्रकारची कोलेस्टेरॉल तयार होतात. एचडीएलमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त व स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कमी, तर एलडीएचमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी आणि स्निग्ध पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. एचडीएल रक्तमार्फत यकृतात गेल्यानंतर त्यातील कोलेस्टेरॉलचं पित्ताम्लात रूपांतर होतं. ही पित्ताम्लं कालांतरानं मोठय़ा आतडय़ातून मलाबरोबर उत्सर्जित होतात. अशाप्रकारे एचडीएल शरीरातील जास्त झालेलं कोलेस्टेरॉल यकृताद्वारे विसर्जन करायला मदत करतो. म्हणून एचडीएल हे शरीराला उपकारक आहे. याउलट एलडीएल शरीरात कोलेस्टेरॉल साठविण्यास मदत करतो. रक्तवाहिन्यात कोलेस्टेरॉलचा थर जमून रक्त  वाहिन्यास अडथळा उत्पन्न होतो, म्हणून एलडीएल शरीराला हानिकारक आहे.
मोनोअसंपृक्त मेदाम्लं (टवाअ)  युक्त तेलामुळं हानिकारक एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास, तर उपकारक एचडीएल कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत होते.

मनमोराचा पिसारा: घरी कामधेनू
सर्वसामान्य माणसाच्या मनातली आत्मशक्ती जागृत व्हावी म्हणून संतमहात्म्यांनी अभंग, श्लोक, प्रवचनांद्वारे संदेश दिले. तथागत बुद्धांनी ‘अत्तदीपो भव’ म्हणून आपल्या अंतरंगातील प्रेरणेचा दीप प्रज्वलित कर असं म्हणून आपल्या बोधीचा सारांश दोन शब्दांत व्यक्त केला. त्यानंतरही आपापल्या मनातल्या प्रेरणाजागृतीला ‘विवेक’ असं नाव देऊन महात्मा फुलेंपासून गाडगेबाबांपर्यंत लोकांमध्ये आत्मशक्तीची जाणीव निर्माण केली.
या आत्मशक्तीची चालना मिळवून स्वत:च्या जीवनाला अंतर्बाह्य़ बदलता येतं. समाजामधल्या दुष्ट चालीरीती नष्ट करता येतात, असा ओजस्वी संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्यामुळे भारतीय विचारपरंपरेतली आत्मजागृती म्हणजे ‘मोक्ष’प्राप्तीची वाटचाल अशा कोत्या समजुतीला छेद जातो.
प्रत्येक व्यक्तीमधल्या उपजत सामर्थ्यांच्या जाणिवेची समाजपरिवर्तनाशी नाळ जोडता येते, अशी ठाम भूमिका घेण्यामध्ये समर्थ रामदास अग्रेसर होते.
समर्थानी मांडलेल्या मनामधल्या या सुप्तशक्तीचा इतका सांगोपांग आणि प्रेरक विचार क्वचित आढळतो. मनाच्या श्लोकांचं वाचन करताना कधी कधी असं वाटतं की, अत्यंत तेज:पुंज शरीरयष्टी धारण केलेले स्वामी आपल्यापुढे निश्चल उभे आहेत. स्पष्ट शब्दोच्चार आणि खणखणीत वाणीनं आपल्याला काही सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्यामधून प्रत्येक शब्दाचा आणि शब्दामागील त्यांच्या हेतूचा अर्थ स्पष्ट होतो आहे. अतिशय प्रत्ययकारी असा अनुभव येतो.
आणखी एक वैशिष्टय़ लक्षात येतं.
समर्थ म्हणतात,
घरी कामधेनू ताक मागे।
हरीबोध सांडूनि वेवाद लागे।।
करी सार चिंतामणी काचखंडे।
तया मागता देत आहे उदंडे।। ६३।।
म्हणजे मनातली ऊर्जा ही केवळ शक्ती नव्हे, तर आपल्या इच्छित ध्येयाकडे वाटचाल करायला सामथ्र्य देणारी प्रेरणा आहे.
मनामध्ये ‘कामधेनू’ आहे. तुझी सर्व स्वप्नं नि आकांक्षा पूर्ण होतील इतके मनोबल तुझ्यात सामावलेलं आहे. असं असताना दरिद्रीपणानं भीक मागत हिंडू नकोस. कोणापुढे दयेची याचना करू नकोस. भलत्या वादविवादात म्हणजे शंकाकुशंकाच्या वाटे जाऊ नकोस.
आपल्या सामर्थ्यांची जाणीव नसणारी माणसंच दरिद्री ठरतात, असा निर्वाळा समर्थ देतात. गरिबी आणि दारिद्रय़ ही सांपत्तिक नसून मानसिक असते, असा विश्वास ते आपल्या मनात निर्माण करतात. हाच तो हरिबोध. हरिबोध म्हणजे ‘हरी हरी म्हणत बसा’ असं नाही. मनातल्या या सामर्थ्यांला स्वामी रामदास चिंतामणी म्हणतात. चिंतामणीकडे काचेचा खडा म्हणून पाहू नकोस. तुला हवं ते मिळवण्याची ऊर्जा घेऊन तू जन्माला आला आहेस.
समर्थाच्या श्लोकांचं पाठांतर कधी जमलं नाही म्हणून मार बसला, पण त्या श्लोकांच्या चिंतन, मननातून जीवनाचा अर्थ उमगला..

प्रबोधन पर्व: समाजक्रांतीची बीजे शिक्षक वर्गाच्या हाती
‘‘ब्राह्मणी ग्रंथांनी आमची मूळची नैसर्गिक संस्कृती विकृत करून टाकली. या आत्मनिष्ट स्वार्थी पुरोहितशाहीचा बिमोड करून त्या ठिकाणी स्वाभाविक, नैसर्गिक मूल्यांची संस्थापना करणे मी माझे कर्तव्य समजतो.. आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृश्यता निवारण्यासारख्या सुधारणांच्या चिठ्ठया हिंदुधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वण्र्य व्यवस्थेचा रांजण जर दुरुस्त झाला नाही तर तो रांजणच फोडून टाकणे महत्त्वाचे.. देशाच्या बलसंवर्धनासाठी तरुणांच्या मनात चुकीच्या का असेना; ज्या कल्पना खेळत असतील त्यापुढे धनसंपत्तीची काय किंमत आहे?.. खेळण्याच्या गंजिफ्याच्या पत्त्यातील राजा-राणी होऊन बसण्यात काय अर्थ आहे?.. आम्ही सारे एक झालो तर आम्हाला गुलाम म्हणून वागविण्याची कोणात शक्ती आहे?.. राजकारण प्रखर संघर्षांचे क्षेत्र आहे. येथे हळवे मन ठेवून चालत नाही.. आज जरी प्रतिष्ठित शिष्टांचा तांडा आपली कुचेष्टा करीत असला तरी याची कदर भविष्याचा इतिहास करणारच आहे.’’
अशा प्रकारे स्वतंत्र भारताची पहिले कृषिमंत्रीपद भूषवलेले डॉ. पंजाबराव देशमुख इतिहास बदलण्याची गरज सांगताना क्रांतीची आवश्यकता अधोरेखित करताना म्हणतात –
 ‘‘देवधर्म व अध्यात्मावर माझा मुळीच विश्वास नाही. मनुष्याची निर्मिती कोणत्याही ईश्वराने, कोणत्याही आत्म्याने केली नसून ते सरळ सरळ उत्क्रांतीक्रमाचे फळ आहे.. स्वत:च्या पराक्रमावर विश्वास असल्याशिवाय जगातील कोणत्याही जमातीचे कल्याण झाले नाही. केवढीही बलाढय़ सत्ता असो तिच्या कपाळाला कपाळ घासून तुम्ही तुमचे भवितव्य उजळू शकत नाही.. समाजक्रांतीची बीजे पेरणे आणि जुनी मूल्ये टाकून देऊन नवीन मूल्यांना खतपणाी घालणे व त्यांची जोपासना करणे शिक्षक वर्गाच्या हाती आहे.. कोणत्याही समाजक्रांतीकारकाने आपल्या अज्ञ जमातीपासून स्वत:ला अलग पाडून घेतले तर तो समाजासाठी काही करू शकत नाही. म्हणून त्याने त्यांच्यातच राहून त्यांना न कळत परिवर्तन घडवून आणायचे असते.’’