मांस-मटण भाजताना त्याचा रंग का बदलतो? बरं त्याचा जो रंग बदललेला असेल, तोच रंग कायम राहत नाही. जसजसं ते भाजत जावं, त्याप्रमाणे त्याच्या छटाही बदलत जातात. असं का बरं व्हावं? मांसाचा रंग बदलतो म्हणजे त्यात काही रासायनिक अभिक्रिया होत असावी हे नक्की! या अभिक्रियेला ‘मिलार्डची अभिक्रिया’ म्हणतात. ही अभिक्रिया सर्वप्रथम फ्रेंच शास्त्रज्ञ लुईस कॅमिल मिलार्ड यांनी अभ्यासली. जसजसं मांसाचं तापमान वाढत जातं, तसतसं मांसातील अमिनो आम्ल मांसातीलच शर्करेच्या रेणूंशी संयोग पावायला लागतं. त्यामुळे त्याच्या चवीबरोबर रंगही बदलतो. या वेळी पाणी मात्र अगदी कमी असायला हवं. ही अभिक्रिया फक्त मांसाच्या बाबतीतच होते असं नाही. बिस्किटं, टोस्ट करताना, कांदा भाजताना हीच अभिक्रिया होत असते. पदार्थ उकडण्यापेक्षा भाजताना, तळताना, बेकिंग करताना ही अभिक्रिया होते. पदार्थाचं तापमान वाढलं की, त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या उरल्यासुरल्या पाण्याची वाफ होते. पदार्थ भाजताना चर्र्र.. आवाज येतो ना, तो त्याचाच. हीच वेळ असते मिलार्ड अभिक्रियेची. अमिनो आम्लाची शर्करेसोबत अभिक्रिया होते. यात तयार झालेल्या नवीन पदार्थाचे वास दरवळू लागतात. त्यांचे रंग दिसू लागतात. तापमान अजून वाढलं की या पदार्थातही अभिक्रिया होतात. आता नव्यानं तयार झालेल्या पदार्थाचे रंग दिसू लागतात. ही क्रिया उष्णता देईपर्यंत चालू असते. यात ‘मेलॅनॉइडिन्स’ हा सोनेरी-तपकिरी रंगाचा पदार्थ तयार होतो. त्याचाच सोनेरी-तपकिरी रंग खरपूस भाजलेल्या पदार्थाला येतो. पदार्थात असलेले इतर घटकही यात भाग घेतात. त्या घटकांनुसार आपल्याला परिणाम दिसतो. म्हणजे कार्बनचे अणू कमी असलेली शर्करा असेल किंवा लायसिनसारखे अमिनो आम्ल असेल तर ही अभिक्रिया लवकर होते. गंधक गटाबरोबर सिस्टीन असेल तर एक विशिष्ट दरवळ येतो, पण सोनेरी-तपकिरी रंग तितकासा येत नाही (उदा. कांदा). यातली विशेष गोष्ट म्हणजे, सस्तन प्राण्यांचे मांस भाजताना मिलार्डची अभिक्रिया होते, पण पक्षी (कोंबडी, बदक, इ.), मासे, खेकडे, कोळंबी यांचं मांस भाजताना मिलार्डची अभिक्रिया जवळपास होत नाही, कारण त्यात साखरेचं प्रमाण नगण्य असतं. मनमोराचा पिसारा: संहाराची (मानवी?) भावनादुसऱ्या सहस्रकाच्या मावळतीवर सूर्य असताना (९/११च्या आधी) भारतामधल्या ‘धरमशाला’ येथे दलाई लामांच्या पुढाकाराने ‘डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स’ नावानं एका सेमिनारचं आयोजन केलं होतं. १९८७ पासून अमेरिकेतील ‘माइण्ड अॅण्ड लाइफ’ संस्थेनं दलाई लामा यांच्याबरोबर अशाच प्रकारे सेमिनार भरविले होते. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या माणसांनी कोणत्या प्रकारचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास केला याचा धांडोळा घेण्यासाठी अनेकविध विद्वान शास्त्रज्ञांच्या चर्चा घडवल्या. अर्थात, सर्व सेमिनारमध्ये केवळ ‘मानव मन विज्ञान’वर ऊहापोह. सैद्धान्तिक चर्चा आणि विद्वतवाद होते. गंमत म्हणजे हे विज्ञानशास्त्रज्ञ केवळ मानसशास्त्राचे अभ्यासक नव्हते. अणुविज्ञान, मज्जाशास्त्र (न्युरोसायको फिजिऑलॉजिस्ट), गणित आणि मनोविकारशास्त्र अशा बहुविध विज्ञानशाखांमधील संशोधक आणि विचारवंत होते. इतकंच नव्हे तर (तिबेटन) बुद्धधर्म स्वीकारलेला प्रसिद्ध रिचर्ड गेर हा हॉलीवूड अभिनेता होता. यथावकाश डॅनियल गोलमन यांनी या सर्व सेमिनारांचा इतिवृत्तांत ग्रंथरूपात प्रसिद्ध केला.या मालिकेतील ‘डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स’ या विषयावरील पुस्तक अधिक प्रसिद्ध पावलं. मुळात, या सर्व सेमिनारना बुद्धविचारांच्या विशाल (बोधी) वृक्षाची शीतल सावली लाभली आहे. एक-दोन वाक्यात सांगायचं तर, आधुनिक पदार्थ-अणुविज्ञान, न्युरॉलॉजी, गणित, रसायनशास्त्र यांच्या संदर्भात बुद्धविचार नेमकं कोणतं तत्त्वज्ञान मांडतं याचा हा अभ्यास आहे.या अत्याधुनिक जगात बुद्धविचारांचं महत्त्व आणि आधुनिक विज्ञानामधील त्यांची उपयुक्तता आणि विशुद्ध संशोधनाच्या विस्तारलेल्या दिशा यांची सांगड घालण्याचा हा विद्वत प्रयत्न होता.आमच्या पुराणात-वेदात सर्व काही कधीच सांगितलेलं आहे अशा अभिनिवेशाचा स्पर्शही इथं आढळत नाही. केवळ विज्ञानामागील मूलतत्त्वज्ञान, धर्माधिष्ठित विचार (ख्रिस्ती, युहदी, इस्लाम, हिंदू) यांचं विश्लेषण आणि टीकात्मक विचार ‘डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स’मध्ये आढळतात.डिस्ट्रक्शन अथवा विध्वंस म्हटलं की इतिहासाच्या साक्षीनं, तैमूरलंग, चंगीज खानपासून हिटलर, इदी अमीन ते ओसामा अशा अनेक क्रूरकम्र्याची हिंसक कृत्यं आठवतात. अनेक लढाया आणि विश्वयुद्धातील मानवानं माणसांचा आणि माणुसकीचा केलेला संहार आठवतो.ही सगळी ‘कृत्यं’ आहेत. प्रत्यक्षात केलेला हिंसा-आचार आहे. अशा नरसंहाराचं आर्थिक, राजकीय, धार्मिक, वांशिक दृष्टीनं विश्लेषण करता येते. त्याचप्रमाणे अशा विध्वंसाकरता वापरलेल्या तीक्ष्ण नखांपासून ते अणुबॉम्ब यांची साक्ष काढली जाते.प्रस्तुत पुस्तकामध्ये अशा प्रत्यक्ष व्यवहारामागच्या विध्वंसक भावना (कृत्य नव्हेत) कोणत्या याचं मानसशास्त्रीय आणि बुद्धविचारप्रणीत विश्लेषण आहे.केवळ विध्वंसक भावना नव्हे तर मानवी इतिहासात आणि उत्क्रांतीमध्ये भावनांचे स्थान कोणतं? मानवी मेंदूमधील भावनांची अनुभूती इतर प्राण्यांमधील स्वसंरक्षक अथवा भक्षणासाठी लागणाऱ्या भावना यांचा अन्योन्य संबंध काय, याचं सत्ताशास्त्रीय विवेचन आहे. विध्वंसक भावना सरसकट अयोग्य की काही ठिकाणी उपयुक्त असाही विचार केलेला आहे. सहेतुक, स्वसंरक्षणात्मक अथवा समष्टीसाठी केलेला हिंसाचार हा उदात्त मानायचा की सरसकट सर्वच प्रकारची हिंसा मानव विघातक मानायची यावर चर्चा आहे.धर्मशास्त्रामधून घालून दिलेल्या आज्ञा-सूचना-वचनानुसार समाजात नीतिमूल्यांचा प्रसार, प्रचार होतो. विशिष्ट आचरणाला धर्मसंमती मिळते. याचा अर्थ विध्वंसक भावना याचा अभ्यास आणि विश्लेषण धार्मिक नीतिशास्त्राला वगळून करता येणार नाही. धर्मानी हिंसेला बंधनं घातली की प्रोत्साहन दिलं? त्यामागच्या भावना कोणत्या? मानसशास्त्रीय विवेचनातून अत्याधुनिक संशोधन आणि मानववंशमानसशास्त्रीय परिशीलन आणि निरीक्षणातून भावना या विषयाचा सखोल अभ्यास करता येतो. अर्थात संपूर्ण पुस्तकावर दलाई लामांची टिपण्णी आणि खुसखुशीत प्रश्न आणि विश्लेषण याची महिरप आहे. तिबेटन अथवा बुद्धतंत्र यावर दलाई लामांचे विचार अतिशय सुभगपणे मांडलेले आहेत. बुद्ध तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अनिवार्य आहे.डॉ.राजेंद्र बर्वे प्रबोधन पर्व: चरित्र, चारित्र्य आणि साहित्य‘‘‘सुंदर’ आणि ‘मोहक’ यांच्यातला फरक न कळल्याने पुष्कळ वेळा गोंधळ असतो. मराठीत आज निर्माण होणारे पुष्कळसे साहित्य ‘सुंदर’ नसून ‘मोहक’ आहे. म्हणून ते मनाला मोह पाडीत असते. गुलामगिरीत खोल ढकलीत असते. ‘सुंदर’पणामुळे याच्या उलट कृती होत असतात. तुम्हांला टूथपावडरची माहिती आहेच.. जाहिरातदार जाहिरात देताना टूथपावडर व दात यांचा संबंध आहे असे न भासवता टूथपावडर व मोहक चेहऱ्याची स्त्री यांचा संबंध वाचकांच्या मनावर बिंबवीत असतो. अशा प्रकारचे बरेचसे मोहक मराठी वाङ्मय आज निर्माण होत आहे व त्यालाच सुंदर वाङ्मय म्हणण्याची प्रथा पडत आहे. माणसाला सौंदर्याची जी प्रतीती होते ती भिन्नही असू शकेल. समुद्र-तीरावर सुंदर मासा दिसला तर रवींद्रनाथांसारखा कवी व खलाशी हे दोघेही आनंदाने ‘अहाहा किती सुंदर’ म्हणून उद्गार काढतील, पण दोघांच्या ‘सुंदरपणातील’ भाव एकच नव्हेत..’’सुंदरता आणि मोहकता यातील फरक सांगत स. ज. भागवत चरित्र आणि चारित्र्य यांच्या सीमारेषा अशा अधोरेखित करतात-‘‘एखादा माणूस चांगला साधू असू शकेल किंवा एखादा माणूस साहित्यिक असू शकेल. महात्मा गांधींच्यासारख्या सत्पुरुषांच्या ठायी दोहोंचाही संगम झालेलासुद्धा आढळेल. याच्या उलट काही लोकांना आपल्या मनात उद्भवणारे सुंदर विचार कृतीत आणता येत नसतील पण साहित्यात उतरवता येत असतील तर ते दुर्बल म्हणूनही त्यांना हवे तर क्षम्य मानता येईल. पण साहित्यिकांत याहून एक निराळा असा पंथही आहे. आम्ही हलकट आहोत म्हणूनच आमचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे असे ते कंठरवाने ओरडून सांगत असतात. पण मनुष्य अशा दुहेरी भूमिका करू शकत असेल असे मला वाटत नाही.. चारित्र्यवान माणूस आपले चरित्रही चांगले घडवू शकेल किंवा साहित्यही निर्मू शकेल. पण आमचे चारित्र्य चांगले नाही म्हणूनच आमचे साहित्य श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक हे बरोबर असू शकतील असे निदान माझ्या मनाला तरी पटत नाही. जीवनाचा अंतिम पुरुषार्थ सत्याचा शोध हा आहे. मग तो सुंदरामुळे साध्य होवो, वा शिवामुळे प्राप्त होवो.’’