२६ जानेवारीला- म्हणजे प्रजासत्ताकदिनी आनंद आणि देशप्रेम प्रकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सर्व कार्यक्रमांत आपण मोठय़ा उत्साहाने सहभागी होतो. तिरंगी मंडप, तिरंगी पताका अशी सजावट सर्वत्र केलेली दिसते. मात्र, बहुतेकदा सजावटीची ही साधने प्लास्टिकपासून बनलेली असतात. खरे तर प्रजासत्ताक दिनाच्या आठवडाभर आधीपासूनच दुकानांमध्ये, विशेषत: सिग्नलवरील विक्रेत्यांकडे प्लास्टिकपासून बनलेले लहान-मोठे भारतीय तिरंगी झेंडे विकायला सुरुवात होते. आपल्यापैकी बरेच जण ते झेंडे विकत घेत असतील. प्रजासत्ताक दिनापर्यंत, चार-पाच दिवस आपण झेंडा गाडीमध्ये वा घरी मिरवतो खरे, पण नंतर या झेंडय़ांचे रूपांतर प्लास्टिकच्या कचऱ्यात होत असते. प्रजासत्ताक दिनाआधीचे दोन दिवस तर मंतरलेले असतात. जवानांची परेड, लाल किल्ल्यावरचे भाषण, शाळा-महाविद्यालयांमधील ध्वजवंदन आणि इतरत्र होणारे कार्यक्रम यांच्या तयारीची लगबग सुरू असते. यांत सहभागी होण्यासाठी निघताना आपण सहजपणे प्लास्टिकचे झेंडे खरेदी करतो. काही वेळा पिनने शर्टावर टोचतो. मात्र आदल्या दिवशी अगदी उत्साहाने खरेदी केलेल्या, अभिमानाने मिरवलेल्या या प्लास्टिकच्या झेंडय़ांचे दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या कचऱ्यात रूपांतर झालेले आपण दरवर्षीच पाहतो. हा कचरा एका शहरात काही टनांमध्ये भरतो. विशेषत: हा कचरा आकाराने छोटा असल्याने तो गोळा होत नाही आणि सर्वत्र पसरत जातो. कागदाचे झेंडे हा यावर मर्यादित पर्याय आहे. परंतु कागद बनवण्यासाठी झाडांचा बळी द्यावा लागतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. फक्त प्लास्टिकचे झेंडेच नाहीत, तर प्लास्टिकच्या वेगवेगळ्या लहानसहान वस्तूंच्या वापराबद्दलही आपल्याला विचार करावा लागेल. कमी किंमत, छोटा आकार, कमी वजन यामुळे प्लास्टिकची वेष्टने, पेन, पिशव्या, छोटय़ा भेटवस्तू, पानसुपारी किंवा गोड पदार्थाची छोटी पाकिटे या सर्वाना स्वस्त प्लास्टिकच्या स्वरूपात आपण विशेष काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरकारने गांभीर्यपूर्वक केलेल्या ‘प्लास्टिक झेंडा न वापरण्याच्या’ आदेशाचे पालन करायचे ठरवू या. ही माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या. स्वस्त प्लास्टिक उपयोगावर योग्यरीत्या व्यवस्थापन करणे हा उत्तम उपाय आहे. - विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org