सध्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले रामदुर्ग हे ब्रिटिश भारतातील इ.स. १७४२ ते १९४८ या काळात तोफ सलामींचा मान नसलेले लहान संस्थान होते. ४६८ चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या रामदुर्ग संस्थानाची १९०१ सालची लोकसंख्या ३८ हजार होती. कोल्हापूरच्या ब्रिटिश पोलिटिकल एजंटच्या देखरेखीखाली संस्थानचा कारभार चालत होता. शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील रामदुर्ग आणि नरगुंड येथे बांधलेले किल्ले औरंगजेबाने १६९२मध्ये घेतले. १५ वर्षांनी किल्लेदार सुरू याचा सेवक रामराव दादोजी भावे याच्या प्रयत्नांमुळे ते किल्ले परत मराठय़ांकडे आले. वृद्ध किल्लेदार सुरूने मृत्यूसमयी रामरावकडेच किल्ला सोपविला. पुढे छत्रपती संभाजी (कोल्हापूर) याने रामरावाला किल्लेदार घोषित करून त्याला पंतसचिवपद दिले. सातारा आणि कोल्हापूरचे छत्रपतीपद वेगवेगळे झाल्यावर रामदुर्ग आणि नरगुंडची मालकी सातारा म्हणजेच पर्यायाने पेशव्यांकडे आली. १७७८ साली हे दोन्ही किल्ले म्हैसूरच्या हैदरअलीने घेतले. हैदरने भाव्यांकडून काही खंडणी घेऊन त्यांची सरंजामदारी चालूच ठेवली. पुढे टिपू सुलतान भाव्यांकडे अधिकाधिक खंडणी मागू लागल्यावर त्यांनी नकार दिला आणि टिपूने भावे कुटुंबाला म्हैसुरात अटकेत ठेवले. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नेतृत्वाखाली अँग्लो-मराठा संयुक्त फौजेने १७९९ साली टिपूच्या विरुद्ध केलेल्या मोहिमेत टिपूच्या पराभवानंतर रामराव कैदेतून मुक्त होऊन त्यांना रामदुर्गच्या राजेपदाची सनद मिळाली. इ.स. १८०० ते १८१० या काळात ब्रिटिशांनी बापूराव रानडे याला रामदुर्गचा राजप्रतिनिधी (रिजंट) म्हणून नेमले. पेशवाईच्या अस्तानंतर नरगुंडचे राज्य रामदुर्गमध्ये विलीन झाले. रामराव भावेंच्या राजेपदाच्या कारकिर्दीनंतर नारायणराव भावे, राणी राधाबाई, रामराव द्वितीय, योगीराज द्वितीय, व्यंकटराव आणि रामराव तृतीय यांची कारकीर्द झाली. रामराव तृतीयने रामदुर्ग संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन केले. सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com तयार कपडय़ांचा उद्योग स्वर आले दुरुनी.. किती हृदयस्पर्शी शब्द. मनाला सुखद अनुभव देणारी भावना. मोहून टाकते ती महान संगीतकार त्रयीचा परिसस्पर्श झालेल्या या गीताच्या निर्मितीची कहाणी. प्रथम संगीतकारांनी चाल बांधून नोटेशन्स गीतकारांकडे पाठवली आणि त्याबरहुकूम गीतरचना झाली. ब्रॅण्डचेही असेच असते. आपल्या मनात, मेंदूत सुखावणाऱ्या भावना घटकांचे वास्तव्य होत असते. त्यांना दाद मिळणारी परिस्थिती मिळताच नकळतच सुखद प्रचीती येते. यालाच आपण ब्रॅण्ड अनुभव म्हणतो. वस्त्रनिर्मिती कला जरी मानवास प्राचीन काळापासून अवगत असली तरी आधुनिक उद्योग म्हणून याची ओळख गेली दोन शतके आहे. आपल्या आवडीचे कापड घेऊन टेलर्सकडे देणे हे पूर्वापार चालू आहे. मात्र गेल्या चार-पाच दशकांत रेडीमेड गारमेंट्सना ग्राहकराजाची उत्तरोत्तर पसंती लाभत आहे हे अधोरेखित करावेसे वाटते. आपल्या वस्त्रोद्योगाने चार दशकांपूर्वी वृत्तपत्रांबरोबरच तत्कालीन प्रमुख माध्यम रेडिओवरही जाहिराती केल्या. वृत्तपत्रे, कॅटलॉग, बॅनर्स, दृक्श्राव्य माध्यमातही कार्यक्रम प्रायोजित करूनही बघितले. रेडीमेड गारमेंट उद्योगास बहार येऊ लागल्यावर त्यांच्या जाहिराती जास्त प्रमाणात दिसू लागल्या. कालांतराने बालकांकडे पालक जरा जास्तच लक्ष देऊ लागले. आजी-आजोबांचे लाडही वाढू लागले. मुलांचे कपडे हा बाजारपेठेतला एक वेगळा भाग म्हणून विकसित झाला. मुली तसेच स्त्रियांचे विभागही आपल्या आगळ्या वैशिष्टय़ांसह पुढे आले. या गटाची खरेदी करण्याची क्षमता खूप जास्त असल्याने त्यांच्या जाहिराती जास्त प्रमाणात दिसतात. हे सर्व जरी असले तरी या उद्योगाचा एकंदर मोठा आवाका बघता जाहिरातींवरचा खर्च तसा फारसा नव्हता व नाही असेच म्हणावे लागते. पूर्वीच्या काळी कापड घेऊन शिवण्याची अथवा शिवण्यास देण्याची पद्धत रूढ होती. यात बराच बदल झालेला दिसला तरी अजूनही ती चालू आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्या उत्पादकाचे कापड आहे हे कळून येते. त्यांना आलेल्या अनुभूतीमुळे त्यांचा ब्रॅण्डचा अनुभव उचंबळून येतो. म्हणूनच काय जणू. पोपलिन्स, केम्ब्रिक्स, शर्टिग, सूटिंग्ज अथवा पंजाबी सुट्ससाठीच्या आजी-माजी ब्रॅण्डचे नाव कानावर पडताच त्या त्या ब्रॅण्डच्या आठवणींना उजाळा मिळतो अगदी या संस्मरणीय गीतांच्या ओळींसारख्या .. स्वर आले दुरुनी..जुळल्या सगळ्या त्या आठवणी !! सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org