नगरांची, शहरांची फिरस्ती करता करता वर्ष सरले. आता थांबायला हवे! आता थांबताना, वाचकांनी वर्षभरात मेलद्वारे आणि फोन करून पाठविलेल्या प्रतिक्रियांचा हा मागोवा.

राहुल पिटके, लंडन- तुमचे लंडनविषयी लेख वाचल्यावरच मला मी राहत असलेले लंडन खरे कळले. प्राचार्य एन. एस. कुलूर, कल्याण- भारतीय शहरे आणि संस्कृतीविषयी लिहिण्याची आवश्यकता आहे. सुजाता गुप्ते, ठाणे- आपल्या या सदरातले सर्व लेख आवडले. विजयसिंह पाटणकर, मुंबई- कमी शब्दांत अफाट, दुर्मीळ माहिती देण्याची आपली लेखनशैली अवर्णनीय. स्मिता पटवर्धन, सांगली- युरोपातील यात्रांविषयी माहिती लिहावी. मेलरी रॉड्रग्ज, मुंबई- याविषयी पुस्तक हवे. सुलभा बर्वे, मुलुंड- माहिती नावीन्यपूर्ण. एन.एम. आव्हाड, नाशिक- थोडक्या शब्दांत भरपूर माहिती. डॉ. कैलास कमोद, नाशिक – क्लिओपात्राची माहिती नावीन्यपूर्ण. डॉ. मनीष बापये, नाशिक – दुर्मीळ माहिती. चंद्रकांत कवठकर, अंधेरी- प्रबोधन पर्वाविषयी माहिती उद्बोधक. यशोधन देशपांडे, फिलाडेल्फिया अमेरिका – माहिती नावीन्यपूर्ण आणि उद्बोधक, परंतु अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाविषयी लिहावयास हवे होते. संजीव साने, ठाणे- थोडक्या शब्दांत पूर्ण माहिती देण्याची वर्णनशैली. भास्कर खरे- तुर्की अस्मिता आणि केमाल पाशाविषयी माहिती आवडली. फादर जोसेफ ऑगस्टीन, नागपूर- तिन्ही धर्माचे तीर्थस्थान असलेल्या जेरुसलेम शहराचा इतिहास, भूतकाळ आणि वर्तमान आपण थोडय़ा शब्दांत उत्तम रीतीने उभा केला आहे. मिलिंद पटवर्धन, भांडुप – मनोरंजक आणि ज्ञानवर्धक लेख, कमी शब्दांत लिहिण्याची आपली हातोटी आवडली. नील देवस्थळी, दादर- मुंबई शहराचा इतिहास लिहावा. श्रेया देशपांडे, नाशिक- पुणे शहराच्या स्थापनेविषयी लेख लिहावा. ऋता कुलकर्णी, टोरँटो, कॅनडा- कॅनेडियन शहरांविषयी लेखांची वाट पाहत आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

निरोप घेताना..

मराठी विज्ञान परिषद चालवीत असलेल्या लोकसत्तामधील ‘कुतूहल’ सदराच्या अकराव्या वर्षांसाठी ‘वनस्पती’ हा विषय निवडला गेला. त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. हे सदर वाचकांना कसे भावले? त्यांच्या प्रतिक्रिया, पत्रव्यवहार यांचा मर्यादित शब्दांत ऊहापोह करणार आहे.

सदर लिखाणासाठी वनस्पती अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक आणि वनस्पतीप्रेमींचे उत्तम सहकार्य लाभले. काही वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर काहींनी दूरध्वनी, ई-मेल करून तसेच पत्राद्वारेही अभिनंदन आणि शुभेच्छा कळवल्या. क्वचित काही वाचकांनी वनस्पती लागवड व देखभाल या संबंधी वैयक्तिक अडचणीसाठी मार्गदर्शन व्हावे. असे लिहिले.

‘वृक्षायुर्वेद’ हा ग्रंथ सुरपाल ऋषींनी लिहिल्याची माहिती प्रा. धीरज कदम, नाशिक यांनी केली. अशोक वृक्षाचे शास्त्रीय नाव बदलावे असे श्री. सदा डुंबरे यांनी सुचवले. खरे तर ही एक तांत्रिक बाब असून फक्त विशेष आंतराष्ट्रीय संस्थाच हे काम करू शकते. श्री. नंदन कलबाग यांनी काही तपशिलांबद्दल आक्षेप दर्शविले आणि सुधारणा व्हाव्यात अशी सूचना केली. बी रुजण्यासाठी किमान १० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, त्याऐवजी १०० अंश सेल्सिअस असे छापले गेले. कुंभी वृक्षाच्या माहितीमध्ये योग्य लेखकाचे नाव छापले गेले नाही. या गोष्टींची नोंद घेतली.

परदेशी वृक्षांची लागवड विचारांती व्हावी ही सूचना योग्य असली तरी काही वृक्ष जेव्हा भारतात आणले गेले तेव्हा सामाजिक वनीकरण हा त्यामागील हेतू होता. ‘एपिफायलम’ या वनस्पतीच्या वर्णनात खोडे पानसदृश होतात, हे वाक्य आले नाही, ही गोष्ट एका वाचकाने जाणवून दिली; म्हणजेच सदरे लक्षपूर्वक वाचली जाऊन त्यावर विचार होत होता.

वनस्पतीसंबंधी विविध विषयांवर माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न वाचकांना आवडला असे अनेकांनी कळविले. विशेष करून शुक्रवारी येणाऱ्या परिचित आणि अपरिचित वनस्पती शास्त्रज्ञांची माहिती दिल्यामुळे, सदर वाचकांच्या विशेष आवडीचे ठरले. एका वाचकाने शास्त्रज्ञांची माहिती एकत्र करून पुस्तक छापण्याचे ठरवले आहे. ही आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते.

वनस्पती आपल्याशिवाय जगू शकतात. पण आपण वनस्पतीशिवाय जगू शकत नाही. या वाक्यातच वनस्पतींची महती लक्षात येते,  ही जाणीव सर्वत्र दृढ होत आहे याचा आनंद आहे.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org