डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.डिझेल हे इंधन रंगहीन असू शकते, पण साधारणपणे हे इंधन पिवळ्या ते खाकी रंगाचे असते. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी मिळणाऱ्या खनिज तेलाचे स्वरूप बदलते. उदा. रशियातून मिळणाऱ्या खनिज तेलापासून मिळणारे डिझेल पाण्यासारखे असते. गल्फच्या आखातात मिळणाऱ्या काळ्या तेलातून खाकी रंगाचे डिझेल अवतरते. आपल्याकडे ओ.एन.जी.सी. ही उत्खनन कंपनी जे खनिज तेल उपसते त्यापासून पिवळसर रंगाचे मिळते. त्यातच अलीकडे हवेचे प्रदूषण टळावे म्हणून डिझेल तेलातून सल्फर या मूलद्रव्याचा अंश निपटून काढला जातो व त्यामुळे डिझेल रंगहीन दिसते. रंग ही काही डिझेलची गुणवत्ता ठरविणारी कसोटी नव्हे.डिझेल हे इंधन काहीसे जाडसर असते. पेट्रोलचे इंधन ‘स्पार्क इग्निशन’ पद्धतीने म्हणजे ठिणगी टाकून पेटविले जाते, मात्र डिझेल इंजिन हे ‘कम्प्रेशन इग्निशन’ पद्धतीने कार्य करते. याचा अर्थ, डिझेल हे इंधन इंजिनाच्या नळकांडय़ातून अतिदाबाखाली पेट घेते. तिथे ठिणगी पाडणाऱ्या प्लगची गरज नसते. डिझेलमधील सल्फरचा अंश काढण्यासाठी डिहायड्रो डीसल्फरायझेशन ही खर्चीक यंत्रणा वापरतात. वास्तविक, गंधक हे मूलद्रव्य इंजिनातील दाब शोषणारे पूरक रसायन (एडिटिव्ह) असते. ते कमी केल्याने इंधनाची वंगणीयता कमी होते, ती भरून काढण्यासाठी डिझेल तेलात फॅटी अॅसिड मिथाइल इथर (एफ.ए.एम.इ.) हे जैविक तेल १०% पर्यंत मिसळावे लागते.डिझेल तेलात असलेली हायड्रोकार्बन रसायने १३०० सें. ते ३६०० सें.पर्यंत उकळतात व त्या कसोटीचा इंजिनाच्या कार्याशी संबंध असतो. डिझेलमध्ये मेणाचा अंश असतो व त्यामुळे त्याचा ओतनिबदू मर्यादित राखावा लागतो. या इंधनाचा जाडसरपणा त्याची वाहकता मोजून ठरविला जातो.जोसेफ तुस्कानो (मुंबई) - मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.orgमनमोराचा पिसारा - झोंबतो गारवानिसर्गाचं आणि आपल्या मूडचं नातं विलक्षण असतं. कोणे एके काळी, म्हणजे अगदी एक राजा आपल्या आवडत्या नि नावडत्या राणीसह राज्य करीत असे त्याच्याही पूर्वी, आपल्या शरीराचं, बदलत्या मूडचं आणि निसर्गाचं नातं अतूट होतं. नातं कसलं, आपण एकसंध होतो, निसर्गाचं एक्स्टेन्शन होतो. पुढे शेतकी, वैज्ञानिक, औद्योगिक इत्यादी प्रगती करताना ते नातं तुटलं. आता कृत्रिम थंडावा आणि रात्रीचा दिवस आपण करतो. मूड बदलायला निसर्गच हवा, असं काही नाही. मात्र निसर्गाचा ताल आणि लयीबरोबर असलेल्या तन्मयतेच्या खुणा कलेच्या आविष्कारात सहज गवसतात. अभिजात संगीतकलेनं तर प्रहर आणि ऋ तू यांच्या रेशीमगाठीच सुरांशी बांधलेल्या आहेत. अशाच निसर्गाचा आणि (शृंगारिक) मूडचा ‘लयभारी’ अवतार लावण्यांमधून हमखास खुलतो. त्यातल्या ठसठशीत लावण्या अर्थात आशाताईंच्या, ‘मुक्कामाला ऱ्हावा पावनं..’ आणि ‘झोंबतो गारवा..’ दोन्ही लावण्या म्हणजे आलीय लहर तर करून टाक कहर असं सुचवणाऱ्या दिलखेचक अदा आहेत. या लावण्यांमधला शृंगार हमखास चोरटा आणि बाहेरख्याली. म्हणजे असली मौका साधून ‘तो’ घरी अवचित आलाय, घरधनी गेलेत परगावाला. कजाग सासू आणि चोंबडी नणंदही आसपास नाहीत आणि तो बेरकी दीर तर गेलाय उंडारायला. माझा चंदनी पलंग आणि त्यावरल्या रेशमी उशा नि लोकरी शाल खुणावत्येय आपणा दोघांना. चांदवेळ झालीय आणि अंगाला हा मोठा वाराच झोंबतोय.. अंबाडय़ातली मोगरीची फुलं कशी आसुसली आहेत बघ, कुसकरून घ्यायला.. कारण तुझी रसरशीत जवानी, नजरेनंच खुणावण्याची माषुक अदा आणि पीळदार बाहूंचं फुरफुरणं.. आता राहवत नाही रे मला.. अंगावरची गोड शिरशिरी आणि उरातला अंगार विझवायला तूच हवास.. असं, शृंगाराचं बेधडक उत्तेजक रूप या लावण्यांमधून उसळून सांडतं. उत्तेजक की उत्तान, असं वाटावं इतका मोकळेपणा या लावण्यांत लखलखतो. मित्रा, या लावण्या ऐकून आपणही त्याच रंगील्या मूडमध्ये वावरतो, कारण आपल्यालाही वारा झोंबतोय ना! पण मित्रा, या लावण्या ऐकल्या नि मनात ‘ति’च्याविषयी कणव वाटली. असला कसला हा तिचा मठ्ठ प्रियकर! सगळं सगळं सांगावं लागतं, हे कर, असं कर! जरा घे कानोसा माझ्या दिलाचा आणि डोकावू दे मला तुझ्या मनात.. झालंच तर.. बरंच काही कर. आजूबाजूच्या साळकाया माळकायादेखील ‘हिला थंडी वाजत्येय..’ असं परत परत सांगतात, तरी हा ढिम्म.. आणि हीच तर गंमत आहे! शृंगार मनात असतो, तोवरच! डॉ.राजेंद्र बर्वे - drrajendrabarve@gmail.comप्रबोधन पर्व : राजसत्ता आणि धर्म..- राजारामशास्त्रींची मते‘ ‘ज्या धर्मास राजसत्ता अनुकूल नाही, त्या धर्मास उतरती कळा लागते,’ - असा एक सिद्धांत होऊ पहातो, पण हा सिद्धांत होईल की सिद्धांताभास होईल? यहुदी धर्मास किंवा पारशी धर्मास आज राजसत्ता अनुकूल नाही; तरी त्या धर्मास आज उतरती कळा लागलेली मानता येईल काय? जसे यहुद्यांचे, तसे पारश्यांचेही आज भगीरथ प्रयत्न चालले आहेत, त्यात त्यास यशही येत आहे, हे जो कोणी चौकशी करील किंवा डोळे उघडून पाहील, त्यास सहज दिसून येणार आहे.. मुसलमानांच्या धर्मास तरी राजसत्ता अनुकूल आहे काय? नाही. मुसलमानी धर्मास उतरती कळा लागलेली मानता येईल काय? नाही. मुसलमानी धर्मास उतरती कळा लागलेली जे म्हणतील त्यांची छाती उफराठी म्हणावी लागणार नाही काय? काथोलिक धर्मास राजसत्ता अनुकूल आहे काय? नाही. आज जी राजसभा* येथे आहे, तिचे काथोलिक धर्माशी मूळचेच हाडवैर आहे, तरी काथोलिक धर्मास निदान िहदुस्थानात तरी उतरती कळा लागलेली दिसत नाही. असे का? अमेरिकन मिशन किंवा गंगारूपी रमाबाईच्या अफाट कामास राजसत्तेचा अनुकूलपणा असल्यास तो कोणत्या प्रकारचा हे कोणास सांगता येईल काय? शंकराचार्याचा अद्वैत सिद्धांत जो आज इतका पसरला आहे, त्यास आज राजाश्रय आहे काय? पूर्वी तरी कधी होता काय? शरीफ महंमद यांच्यासारखे खोजे गृहस्थ शंकराचार्याच्या अद्वैत सिद्धांताच्या पायी आपले तन मन धन अíपतात, ते त्यास राजाश्रय आहे, म्हणून की काय? सारांश राजसत्ता, राजाश्रय यांच्या अभावाचा धर्माच्या उतरत्या कळेशी संबंध नाही. ‘राजाश्रय ज्या धर्मास नाही, त्या धर्मास उतरती कळा लागते,’ हा सिद्धांताभास होय. हा सिद्धांत म्हणता येत नाही.’’ * राजारामशास्त्री भागवत (जन्म ११ नोव्हेंबर १८५१, मृत्यू ४ जानेवारी १९०८) यांच्या काळातील ब्रिटिश राज्यकर्ते अर्थातच प्रॉटेस्टंट होते.