हिंदू-मुस्लीम एकतेचे कट्टर समर्थक असणाऱ्या अबुल कलाम आजाद यांनी भारतीय मुस्लिीमांना कडव्या, कट्टर मुल्ला-मौलवींच्या प्रभावातून मुक्त करून आधुनिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नाने लाखो भारतीय मुस्लीम भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ब्रिटिशांच्या विरोधात जोडले गेले. प्रसिद्ध भारतीय मुस्लीम विद्वान म्हणून गणले गेलेले अबुल कलाम हे लेखक, कवी, पत्रकार आणि स्वतंत्रता सेनानी होते. महात्मा गांधींच्या सिद्धांतांचे समर्थन करणाऱ्या अबुल कलामांनी निराळ्या मुस्लीम राष्ट्राची मागणी करणाऱ्यांना विरोध केला. मौलाना आजाद यांचे वडील मोहम्मद खैरुद्दीन हे कोलकातात राहणारे एक अफगाण विद्वान होते. १८५७च्या स्वातंत्र्य समराच्या काळात सौदी अरेबियात स्थलांतरित झाले. तिथेच त्यांचा विवाह होऊन मक्का येथे त्यांचा पुत्र म्हणजेच मौलाना अबुल कलाम आजादचा जन्म १८८८ मध्ये झाला. त्यांची आई अरब घराण्यातली. पुढे हे कुटुंब १८९० मध्ये भारतात येऊन कोलकातात स्थायिक झाले. मौलाना आज्मादांचे वडील कोलकातात एक प्रसिद्ध उलेमा म्हणजे इस्लामिक विद्वान म्हणून विख्यात होते. त्यामुळे मौलाना आज्मादांचे प्राथमिक शिक्षण इस्लामी पद्धतीने झाले. लहानपणीच ते तत्त्वज्ञान, इतिहास आणि गणिताच्या अभ्यासाबरोबरच इंग्रजी, उर्दू, फारसी, हिंदी, अरबी या भाषांमध्ये पारंगत झाले. अबुल कलाम यांचे शिक्षण जरी धर्मपंडिताचे, मौलवीचे झाले तरी त्यांनी पुढे ते काम न करता हिंदू क्रांतिकारींबरोबर स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांनी १९१२ मध्ये ‘अल हिलाल’ हे उर्दू भाषिक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकात ते ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध जहाल शब्दांत टीका करीत आणि भारतीय राष्ट्रवादाच्या प्रचारात्मक लिखाण करीत. थोडय़ाच काळात अल हिलाल हे भारतीय क्रांतिकारकांचे मुखपत्र बनले. ब्रिटिश सरकारने अल हिलालवर बंदी आणून अबुल कलामांना रांचीच्या तुरुंगात वर्षभर कैदेत ठेवले. या काळात त्यांचा परिचय अरिवद घोष आणि श्यामसुंदर चक्रवर्ती या दोन महान क्रांतिकारकांशी झाला. रांचीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर मौलाना आज्मादांनी गांधीजींबरोबर ब्रिटिश सरकारविरोधात खिलाफत चळवळीत भाग घेतला. - सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com