शेती म्हटले म्हणजे शहरापासून दूर स्वच्छ, शुद्ध व मोकळ्या हवेतील व्यवसाय असे साहजिकपणे वाटते. शेतीच्या चारी बाजूंना झाडी व हिरवाई असल्यामुळे प्राणवायूची मुबलकता असते. कार्बनडायॉक्साइड वायू मोठय़ा प्रमाणात शोषला जात असल्यामुळे त्याचे हवेतील प्रमाण मर्यादेबाहेर वाढत नाही. हवेत आद्र्रता निर्माण होत असल्याने सुखद गारवा असतो. अशा आल्हाददायक वातावरणात शारीरिक श्रम करून थकवा फारसा येत नाही. उलट असे काम एक प्रकारचा व्यायामच ठरते.
मात्र तरीही शेतीत ज्ञसनसंस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. विशेषत: धान्य साठवण्याचे गोदाम बंदिस्त असते. तिथे खेळती हवा कमी असते. आत पंखे नसतात. धान्याचे कण, धान्यावर चिकटलेले धूलिकण, तंतू, बुरशी, काही जिवाणू हवेत उडत असतात. तंतूंमुळे ज्ञासनलिकेच्या आतील स्तराला चरे उठतात व जखमा होतात. तसेच त्वचेलाही चरे पडतात. त्वचेत तंतू रुतून बसतात व त्यामुळे खाज येऊन त्वचारोग होतो. गोदामात मारलेल्या कीटकनाशकांशी संपर्क येऊन अधिहर्षता (अ‍ॅलर्जी) निर्माण होऊन ज्ञसनसंस्थेचे, त्वचेचे संसर्गजन्य रोग होतात व दुष्परिणाम दिसू लागतात.
धान्य हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञसनसंस्थेचे रोग जास्त आढळतात. झोडपणी करताना धान्यावरचे कण हवेतून ज्ञासनलिकेत जातात. नुसत्या झोडपण्याच्या ठिकाणच्या जमिनीवरची तंतुमय धूळ असते असे नाही तर धान्याला चिकटलेल्या व टरफलाला लागलेल्या धूलिकणांमुळेही त्रास होतो. धान्य उन्हात संपूर्ण न वाळवता साठवले तर त्यातील काही रसायनांचे बाष्पीभवन होते, धान्य तापते व त्याचा भुगा होतो. धान्याच्या वेष्टनामधून हे कण बाहेर पडतात. धान्याला लागलेल्या टोच व अन्य कीटकांनी धान्य पोखरून खाल्ल्यावर उरलेल्या टरफलांचे कण/भुगा ज्ञासावाटे फुफ्फुसात जातो. घशात हे कण अडकल्यामुळे घसा कोरडा होतो व खोकला होतो. ज्ञासनलिकेतही हे कण चिकटतात. त्यामुळे कोरडा खोकला सतत होतो. डोळे लाल होऊन त्यातून सारखे पाणी येते.
-डॉ. शशिकांत प्रधान , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..   –    ज्येष्ठ अनुभव
मी शक्यतोवर बस किंवा आगगाडीने प्रवास करतो. मुंबईतही सकाळी सात-साडेसातला गर्दी नसते. त्या दिवशी मंगळवार होता आणि म्हणून सिद्धिविनायकाचा दिवस आणि बस बऱ्यापैकी भरलेली होती. हा विघ्नहर्ता नक्कीच; परंतु त्या दिवशी तो सुखकर्ता नसतो. स्त्रियांच्या आरक्षित जागा भरलेल्या, कारण त्या जास्त धार्मिक. तरी दोन सिंगल सिटा रिकाम्या होत्या. पुरुषांच्या एका रिकाम्या बाकडय़ावर एक जरा विशाल स्त्री बसली होती. कारण ती रिकामी सीट तिला पुरली नसती. तिच्या हातात एक मोठी पिशवी होती आणि तिच्या पर्समधला भ्रमणध्वनी खणाणत होता. स्त्रियांच्या कोठल्याही प्रकारच्या कपडय़ांना खिसे नसतात. अपवाद एकच तो म्हणजे जीन्सचा; पण त्या एवढय़ा घट्ट असतात की मोबाइल काढायचा झाला तर त्यांना उठून उभे राहावे लागते. तर खणाणणारा मोबाइल पर्समधून काढणे समुद्रमंथनाहून अवघड, कारण पर्सला मात्र अनेक खिसे असतात. मोबाइल काढण्याच्या नादात अनेक वस्तू बाहेर पडल्या, त्या ती उचलत होती आणि त्यामुळे बरीच जागा तिने व्यापली होती. तेव्हा तिच्या शेजारची माझी आधीपासूनची सीट मी सोडली आणि नाइलाजाने ज्येष्ठ नागरिकांच्या बाकडय़ाकडे गेलो, तर तिथे कॉलेजला निघालेल्या दोन पोरी कॉलेजविश्वाबद्दल अपरिमित बोलत होत्या. मी शेजारी उभा राहून एकदा-दोनदा खाकरलो, तेव्हा माझ्याकडे कपाळाला आठय़ा पाडून म्हणाल्या, what is your problem?
तेवढय़ात कंडक्टर आला आणि म्हणाला, काका काय  Problem  केलात? आजोबांच्या ऐवजी काका म्हणाला, हे सुदैव पण मी Problem केला आहे हा निष्कर्ष हल्लीच्या स्त्रीप्रधान संस्कृतीला साजेसा. मग त्या दोघी उठल्या आणि एक म्हणाली, चांगले Fit  तर दिसता! दवाखान्यात पोहोचलो तेव्हा आठ वाजताचा पहिला रुग्ण आत आला. पहिल्यांदा नवरा आला, मला बघून चपापला आणि लगेचच बाहेर पडला, तेव्हा बंद होणारे दार बायकोवर आणि तिच्या कडेवरच्या मुलावर आदळायचे जेमतेम चुकले. मग परत आला आणि म्हणाला, तुम्ही आमच्या बसमध्ये होतात. तुम्ही एवढे सीनिअर डॉक्टर मग बस का? बायकोच्या शेजारीच एक मोठा मुलगा होता. त्याला बायको म्हणाली, बघ आजोबा एवढे मोठे तरी बसने जातात आणि तू Taxi Taxi  करतोस. तो पुरुष समोर बसला आणि म्हणाला, तुमचे वय काय? नेहमी लोक म्हणतात तसे तुम्हाला किती वाटते, असा प्रश्न मी टाळला. ९० वगैरे म्हणाला असता तर आफत झाली असती. मी ७५ असे सांगितल्यावर म्हणाला, तुम्ही अजून Operation  करता? मनात आले म्हणावे, मग काय करायला इथे बसलो आहे? असो.
असे हे ज्येष्ठ अनुभव. उद्या काही आधुनिक संकेताबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

वॉर अँड पीस – हृदयरुग्णांचे नेहमीचे उपवास
दिवसेंदिवस सुशिक्षित, अतिसुशिक्षित गरीब-श्रीमंत, अतिश्रीमंत वर्गातील लोक वेगवेगळे उपासतापास करतात. आहाराचे नवनवीन नियम कटाक्षाने आचरणात आणतात.
‘उपवास’ या शब्दाचा खरा अर्थ ‘देवाच्या जवळ जाणे’ असा आहे. उपवास करायला सांगणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगायचे व तरुण मंडळींनी विविध उपवास करायचे असे आपल्या समाजात उपवास संस्कृतीचे वाढते प्राबल्य आहे. रविवार व बुधवार हे दोन वार सोडले तर दर सोमवार श्री शंकराकरिता, मंगळवार श्री गणरायाकरिता, गुरुवार श्री गुरुदेवदत्तांकरिता, शुक्रवार दुर्गा, अंबा, भवानीमाता, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती अशा देवतांकरिता, शनिवार शनिमहाराजांच्या कृपेकरिता विविध उपवासाचे संकल्प सोडले जातात. या उपवासांच्या निमित्ताने संबंधित भक्त मनोनिग्रह करून कटाक्षाने काही पदार्थ वज्र्य व ठरावीक पदार्थच आहारात अशी कडक भूमिका वर्षांनुवर्षे आचरणात आणतात.
सामान्यपणे उपवासाचे पदार्थ म्हणून साबूदाणा, वऱ्याचे तांदूळ, शेंगदाणा, खोबरे, विविध फळे, सुरण, भेंडी, रताळे, बटाटे, शिंगाडा, कोथिंबीर अशांची निवड करतात.
 ‘लोकसत्ता’च्या चोखंदळ वाचकांकरिता मी ‘साबुदाणा, बटाटा, रताळे, शिंगाडा’ या चतुष्काची माफी मागून यांना उपवासाचे दिवशी टाळावे, असा मोलाचा सल्ला देईन. हे चारही पदार्थ पिष्टमय आहेत. याचे व भाताचे गुणधर्म हदयरोगी, मधुमेही माणसांकरिता हितकारक नक्कीच नाहीत.
 राजगिरा भाजून घरी केलेल्या लाह्य़ा, सफरचंद, पोपई, कवठ, ताडगोळे, पांढरे खरबूज अशी फले मधुमेही हृद्रोगी व्यक्तींनी जरूर आपलीशी करावीत. जी मंडळी भरपूर शारीरिक श्रम करतात त्यांनी वऱ्याचे तांदूळ, रताळे, बटाटा यांचा एकच वेळ वापर करावा. एक वेळ ताक, लिंबूसरबत यांचा सहारा घ्यावा. ‘एकादशी दुप्पट खाशी’, जरूर टाळावी. शिवरात्र, महाशिवरात्रीला ‘त्या पारध्याच्या’ उपवासाची आठवण ठेवावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २९ नोव्हेंबर
१८३५> कवी, प्राचीन भारतीय वाङ्मयाचे अभ्यासक, षड्दर्शनज्ञ महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. मराठी साहित्य जगतामध्ये ‘राजा शिवाजी’चे जनक. याशिवाय मन, राजाराम आणि ऋषी ही त्यांची काव्यरचना प्रसिद्ध.
१९०७>  कवी, कादंबरीकार, चरित्रकार, संपादक, बालसाहित्यिक गोपीनाथ गणेश तळवलकर यांचा जन्म. ‘दुर्वाकुर’ संग्रहात रायबा, मातृहृदय, रानपाखरा या लोकप्रिय कविता, तर ‘सारसबाग’ या संग्रहात त्यांची गाजलेली बालगीते समाविष्ट आहेत. आशियाचे धर्मदीप व ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व  ही पुस्तके, चार कादंबऱ्या व बुद्धायन  हे खंडकाव्य त्यांच्या नावावर आहे.
१९३९> राजनीतिशास्त्र या विषयावरील एक सिद्धहस्त लेखक बळवंत गणेश दाभोळकर यांचे निधन. पुण्याच्या दाभोळकर ग्रंथमालेचे ते संस्थापक होत.
१९५९>  ख्यातनाम इतिहास संशोधक गोविंद सखाराम सरदेसाई ऊर्फ रियासतकार यांचे निधन. मुसलमानी रियासत, मराठी रियासत, ब्रिटिश रिसायत हा इ. स. १००० ते १८५८ पर्यंतचा इतिहास लिहिल्याने ते रियासतकार म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९९४> २० कादंबऱ्या (त्यापैकी अनेक चरित्रकादंबऱ्या) लिहिणाऱ्या मृणालिनी प्रभाकर देसाई यांचे निधन.
– संजय वझरेकर