‘कॉपी आणि पेस्ट करायला काहीच अक्कल लागत नाही’, असं आपण नेहमीच म्हणतो. सोशल मीडियावर जेव्हा मजकूर कॉपी-पेस्ट केला जातो, तेव्हा खरोखर अर्ध्या सेकंदाच्या आत, विनाकष्ट हे काम होतं. कधी मुलं स्वत: अभ्यास न करता नुसतं पुस्तकातल्या आखून दिलेल्या कंसातल्या ओळी पुन्हा लिहून काढत असतात किंवा स्वत: अभ्यास न करता दुसऱ्याची वही घेऊन जसंच्या तसं लिहून काढत असतात आणि त्यालाच ‘अभ्यास करणं’ असं म्हणतात, तर इथे याला नक्कीच अभ्यास म्हणत नाहीत. तेही फक्त ‘कॉपी-पेस्ट’ आहे. मेंदू केवळ शब्द वाचणं आणि लिहून काढणं याशिवाय वाचून, समजून लिहिण्याचं काम करत असेल, स्वत: उत्तर शोधून त्यात काही बदल करून लिहीत असेल तर आकलन क्षेत्र काम करत असतं. पण तेही होत नसेल तर अशा प्रकारच्या अभ्यासातून आकलन, स्मरण घडून येत नाही. काही जण सर्रास दुसऱ्यांची उत्तरं, गणितं, निबंध हेसुद्धा जसंच्या तसं लिहीत असतात. अशा प्रकारच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. कारण मेंदू त्या कामांमध्ये पूर्णाशाने कार्यरत नसतो. एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं, त्यासाठी प्रश्न काढणं, एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नांना स्वत:हून उत्तरं देणं, विशिष्ट विषयावरची उत्तरं देणं, काही अभ्यासपूर्ण उत्तरं देणं, उत्स्फूर्त उत्तर देणं, पत्र लिहिणं, गोष्टी सांगणं, गोष्टी लिहिणं हे सर्व प्रकार मेंदूपूरक आहेत असं समजायला हरकत नाही. मर्सयिा टेट या संशोधक लेखिकेने असं दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारे आपण जेव्हा कॉपी करतो, एखादी गोष्ट जशीच्या तशी लिहून काढतो, त्या वेळेला आपल्या मेंदूमध्ये नवीन डेन्ड्राइट्स तयार होत नसतात. न्यूरॉन्सची जुळणी होत नसते. त्यापेक्षा इतरांशी विशिष्ट विषयावर मुद्देसूद बोलणं, विशिष्ट विषयावर उत्स्फूर्त लेखन करणं, काही पुस्तकं वाचून केलेलं लेखन- अशा प्रकारे मेंदूला चालना दिली, तर त्यामधून मात्र नक्कीच न्यूरॉन्सच्या नवीन जुळण्या तयार होतील. कविता वाचणं, कवितेचा अर्थ समजून घेणं, अर्थ दुसऱ्या कोणाला सांगणं, स्वत: कविता लिहिणं, संवाद लिहिणं या पद्धतीने मेंदूला कामाला लावता येऊ शकतं. - डॉ. श्रुती पानसे - contact@shrutipanse.com