डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थापनेपासूनच फळबागांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये आंब्याच्या रत्ना, सिंधू, सुवर्णा, कोकण राजा; काजूच्या वेंगुर्ला १, ४, ६, ७, ८; नारळाच्या प्रताप, लक्षद्वीप ऑíडनरी, फिलीपाइन्स ऑíडनरी इ. याशिवाय सुपारी, फणस, जांभूळ, करवंद, कोकम, केळी, दालचिनी, जायफळ या फळांच्या सुधारित जातींचा समावेश आहे. हापूस आंब्याची हवामान संवेदनशीलता लक्षात घेऊन रत्नासारखी जात विकसित केली. ती आजच्या बदलत्या हवामानात चांगले उत्पादन देत आहे, तसेच प्रक्रिया उद्योगासही पूरक ठरत आहे. काजूच्या वेंगुर्ला ६ व ७ या आकाराने मोठय़ा बीच्या जाती प्रक्रिया उद्योगाची प्रथम पसंती ठरत आहेत.
विविध पिकांच्या अभिवृद्धी पद्धतीही विद्यापीठाने विकसित केल्या. परिणामी जातिवंत फळपिकांच्या कलम/ रोपे निर्मितीचे काम कोकणामध्ये फार मोठय़ा प्रमाणात होऊ लागले. त्यामुळे कोकणातील फळबागांखालील क्षेत्र ३५ हजार हेक्टरवरून ४ लाख हेक्टर इतके वाढले. विद्यापीठाच्या कलमनिर्मितीच्या सोप्या पद्धतींमुळे व प्रशिक्षण सुविधांमुळे कोकणातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला. या कलम/ रोपांची लागवड फक्त कोकणच नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये होते. विद्यापीठाने फळे व भाजीपाला यांपासून पन्नासपेक्षा जास्त प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. फळप्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण कोकणातील महिला बचत गट, बेरोजगार युवक यांना दिले जाते. परिणामत: ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळाली. विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी हवामानावर आधारित सल्ला, हवामान बदलावर आधारित रोगांचे पूर्वानुमान काढण्याची समीकरणे विकसित केली. याद्वारे शेतकऱ्यांना प्रादुर्भावाची पूर्वसूचना चार दिवस अगोदर देणे शक्य झाले. दापोली व वेंगुर्ला येथून भ्रमणध्वनीद्वारे एस्एम्एस्च्या माध्यमातून या विषयाचे सल्ले दर आठवडय़ाला शेतकऱ्यांना दिले जातात. त्याचप्रमाणे सर्व स्थानिक वर्तमानपत्रांतून हे संदेश प्रसिद्ध केले जातात.
रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ांमध्ये विविध फळबाग शेतीसंबंधित २२ शेतकरी शास्त्रज्ञ मंच विद्यापीठाने पुढाकार घेऊन स्थापन केले. याद्वारे विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधतात व वेळोवेळी बदलत्या हवामानानुसार पिकांची काळजी कशा प्रकारे घ्यावी, याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतात.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..      लढा : अंक  दुसरा- भाग-४ (विधायक)
तो भूखंड तर सुखरूप परत आला खरा पण यावेळी मागच्या वेळसारखे बेसावध रहायचे नाही असे मात्र मी ठरवले. तुम्ही भूखंडाला सुस्वरूप केलेत तर आम्ही कशाला मधे पडू असे एक सूचक विधान शरद काळे यांनी केले खरे. पण या सुस्वरूप करण्यासाठी कोठलाही करार केला जाणार नाही आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या तर आम्ही कारवाई करू असे स्पष्ट विधानही मला ऐकवण्यात आले.
    झाडांना पैसे लागत नाहीत, परंतु झाडे लावायला त्यांना पाणी घालायला आणि शाबूत ठेवण्यासाठी पैसे लागतात हे लगेचच लक्षात आले. एका माळ्याचा पगार २५०० रुपये धरला तरी वर्षांचे तीस हजार होतात. दर महिन्याला थोडेच मागत फिरणार होतो. तेव्हा आमच्या पलीकडच्या सहनिवासातले नाना कुंटे भेटले ते म्हणाले डिपॉझिट घ्या मग त्याच्यावरचे व्याज तुम्हाला वापरता येईल. तसे लोकांना सांगा. पण त्यासाठी संस्था स्थापन करणे गरजेचे होते. अशा धर्मादाय संस्था स्थापन करण्यासाठी जे धर्मादाय आयुक्तांचे कार्यालय आहे ते बघणे आणि इथे कसे काय काम होऊ शकते ह्य़ाचा शोध घेणे हा एक मोठा दारूण अनुभव आहे. असो. तेही काम झाले.
    आम्ही राहतो तो परिसर गरीब नक्कीच नाही. ‘कोणी काही करत असेल तर त्याला थोडेफार दे’ अशा वृत्तीचा हा परिसर आहे. तेव्हा माझ्या आणि माझ्या इतक्याच पेटलेल्या दोन तीन सहकाऱ्यांसह शनिवार रविवार सकाळी अगांतूकपणे सदनिकांच्या दारावरच्या घंटा वाजवायला आम्ही सुरवात केली हा लढा सुरू होऊन आता पंधरा वर्षे झाली होती. ह्य़ा भानगडीच्या मागे एक रविन थत्ते नावाचा थोडासा वेडा माणूस आहे हे लोकांना माहित होते. जवळपासच्या घरटय़ा मधल्या माणसांच्या मी छोटय़ा मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या होत्या. आमच्या हिच्या थोडय़ाफार बोलघेवडय़ा पण सदाआनंदी स्वभावामुळे मैत्रिणीचे जाळेही होते. मी एक नंबरचा लबाड होतो. सुरवातीलाच मला देणगी नको अशी सुरवात मी करत असे. मला महिन्याला तुमच्याकडून पन्नास रुपये हवे आहेत. पण दर महिन्याला कसे मागणार तेव्हा तुम्ही मला ५००० रुपये ऊीस्र्२्र३ म्हणून द्या त्याचे व्याज आदमासे महिना ५० रुपये येईल ते मी वापरीन. आम्ही काम केले नाही तर तुम्ही अनामत रक्कम परत घ्या असा मोठा आकर्षक प्रस्ताव मी मांडत असे.
   असे अनेक दिवस चालले. काही सहकारी कंटाळत असत पण मी ते चालूच ठेवले. सगळ्यांनी (एकूण एक) पैसे दिले. काहींनी जास्त दिले आणि उद्यानाच्या उभारणीला सुरवात झाली. मी झपाटलो होतो त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते

वॉर अँड पीस   हृद्रोग : भाग ७
सुमारे तेरा वर्षांपूर्वी आनंद मंगल कार्यालय येथे आमच्या संस्थेतर्फे एक व्याख्यानमाला होती. तेथे एक कुटुंब कोल्हापूरहून आपल्या काही महिन्यांच्या मुलीला घेऊन आले. त्या मुलीच्या हृदयाच्या झडपेला भोक होते. त्या आई-वडिलांना पूर्ण कल्पना देऊन नियमितपणे अर्जुनसालसिद्ध दूध व सांबरशिंग उगाळून त्यांचे गंध असे उपचार सुरू केले. अतिशय श्रद्धेने या कुटुंबाने त्या मुलीकरिता चार-पाच वर्षे नियमितपणे हे उपचार केले. आता त्या मुलीला क्वचितच औषधे दिली जातात. ही मुलगी आता पुणे विद्यापीठात संस्कृत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
अर्जुनसाल गुणधर्म : अर्जुनसालीच्या विश्लेषणाबाबत ३-४ ग्रंथांत संदर्भ सापडतात. सर्वात जुना संदर्भ वनौषधिनिदर्शिका मधील १९६९ सालचा आहे. त्यानुसार अर्जुनसालीत अर्जुनाइन व अर्जुनेटिन ही द्रव्ये सुमारे १५.५ टक्के आहेत. त्याचबरोबर मॅग्नेशियमचे सुद्धा क्षार अल्प प्रमाणात आहेत. या सर्वाबरोबर सर्वात अधिक असे कॅल्शियमचे क्षार सुमारे २५ टक्के असतात व रंगद्रव्येही असतात. त्यानंतरच्या संदर्भात फक्त एकूण राख व आम्लात विरघळणारी राख याचा विचार केलेला दिसतो. पाणी, अल्कोहोलमध्ये विद्राव्य द्रव्ये याचासुद्धा तपशील आढळतो. परंतु नवीन संदर्भात आयुर्वेदिक फारमाकोपिआमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशिअम किती याबद्दल विचार केलेला दिसत नाही. औषधीसंग्रह (डॉ. वा. ग. देसाई) यामध्ये सुद्धा कॅल्शियम व टॅनिनबद्दल विचार दिसतो तेव्हा आता आमच्या प्रयोगशाळेतसुद्धा अर्जुनसाल तपासून पाहताना कॅल्शियम किती आहे हे पाहिल्यास त्याची प्रत (क्वालिटी) समजू शकेल असे वाटते. कमी कॅल्शियम असलेली साल औषधाच्या सहा पटीने कमी उपयोगी असावी असे वाटते. त्यासाठी अर्जुनसालीचे प्रयोगशालेय परीक्षण गरजेचे आहे. औषधी गुणधर्म जास्तीत जास्त असलेली व पूर्ण परिणामांना उतरणारीच साल औषधात वापरणे योग्य ठरेल. वेल्थ ऑफ इंडियामध्ये अर्जुनसालीचा संदर्भ फक्त कातडे कमावण्यासाठीच केला आहे. आयुर्वेदात अर्जुनसालीचा, त्यापासून तयार होणाऱ्या औषधांचा वापर होतो असा उल्लेख या ग्रंथात नाही, असो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १५ जुलै
१८९६- ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, लेखक आणि निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे यांचे निधन. ‘वाग्भट’ या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते.  ‘स्त्रीरोगविज्ञान’ या ग्रंथासह ‘ज्ञानेश्वरी’ व ‘अमृतानुभव’ या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.
१८९९- रविकिरण मंडळाच्या आठ कवी सदस्यांपैकी एक दत्तात्रय लक्ष्मण गोखले यांचा जन्म. त्यांच्या ‘किरण’ या प्रातिनिधिक संग्रहात ‘प्रेम कशावर’ ही कविता आहे. ‘भावगीत’ या विषयावर चर्चात्मक निबंध आणि ‘उषा, शलाका, प्रभा’ आदींमध्ये त्यांची सुनीते व गोष्टी प्रकाशित आहेत.
१९०४- लेखक, कवी, चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांचा जन्म. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने लेखनाला सुरुवात. ‘पाटील- प्रताप’, ‘अमृतपाक’ ही दोन सामाजिक खंडकाव्ये. ‘शूद्र पूर्वी कोण होते’, ‘हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती’ घटनेवरील तीन भाषणे अशा भाषांतरित लेखनासह डॉ. आंबेडकर यांचे बृहद्चरित्र हे मौलिक लिखाण.
१९३५- कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म. ‘बासरी’ हा काव्यसंग्रह, तसेच ‘किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर’ मिळून १४ कादंबऱ्या. कादंबऱ्यांतून वास्तवतेचे भीषण चित्रण. ‘धम्मपद’ हा त्यांनी पालीतून मराठीत केलेला अनुवाद.
संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity konkan agrarian univaersity
First published on: 15-07-2013 at 12:01 IST