पाणी मिळण्याचा नसíगक स्रोत म्हणजे पाऊस. पावसाचे पाणी खाली पडताना हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइड, अमोनिया, इ. वायू शोषून घेते. जमिनीशी संपर्क आल्यावर चुनखडी, मॅग्नेशिअम, लोह, इ. क्षार पाण्यात विरघळतात आणि ते पाणी जड होते. जितका जमिनीशी संपर्क अधिक तेवढे पाण्याचे जडत्व जास्त असे लक्षात येते. म्हणूनच नदीच्या पाण्यापेक्षा साध्या विहिरीचे पाणी जड असते. तर साध्या विहिरीपेक्षा िवधण विहिरीचे (बोअरवेल) पाणी आणखी जड असते. या पाण्याला दुष्फेन पाणी असे संबोधले जाते.
हे पाणी कापडाच्या प्रक्रियेत वापरण्यास सोयीचे नसते. रासायनिक प्रक्रियेसाठी पाण्याची वाफ पुरवणाऱ्या बॉयलरमध्ये अशा पाण्याचा वापर केल्यास बॉयलरच्या टय़ूबवर क्षारांचे थर जमा होतात; त्यामुळे बॉयलरची कार्यक्षमता खूपच घटते. त्यामुळे हे पाणी मृदू करणे आवश्यक असते. त्या पाण्याला सुफेन पाणी असे संबोधले जाते.
जड पाण्याचा वापर करून प्रक्रिया केल्यास कापडावर सौम्य डाग पडतात. रंगाई झाल्यावर ते उठून दिसतात. रंगाईची प्रक्रिया आवश्यक तेवढी परिणामकारक होत नाही. कापडाच्या धुलाईमध्ये कमीपणा राहतो. प्रक्रिया करूनसुद्धा कापड आवश्यक तेवढे पांढरे शुभ्र होत नाही. पाण्याचा जडपणा कॅल्शिअम किंवा मॅग्नेशिअम यांच्या क्लोराइड्स/ सल्फेट/ बायकाबरेनेट यांच्यामुळे असतो.
कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम बायकाबरेनेटमुळे येणारा पाण्याचा जडपणा पाणी नुसते उकळून घालवता येतो. उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे लागते. उकळण्याऐवजी चुन्याची निवळी आणि सोडा अ‍ॅशचा वापर करूनही उपरोक्त जड पाणी हलक्या पाण्यात रूपांतरित करता येते. पाण्याचा जडपणा कायमस्वरूपी घालवण्यासाठी आयन आदान-प्रदानची पद्धत वापरली जाते. पाण्यातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह यांच्याबरोबर सोडिअम झिओलाइटची रासायनिक क्रिया घडवून आणतात. त्यामुळे जे झिओलाइट तयार होते ते पाण्यातून वेगळे काढले जाते. सोडिअमचे क्षार पाण्यात विद्राव्य असतात, त्यामुळे पाणी जड होत नाही.  
अशा आणखीही काही पद्धतींचा वापर केला जातो. पण जड पाणी (दुष्फेन पाणी) हलके (सुफेन पाणी) केले तरच ते कापडावरील रासायनिक प्रक्रियेसाठी योग्य ठरते. असे पाणी मुंबई महानगरपालिकेकडून पूर्वीपासून पुरवले जात आहे. त्यामुळे मुंबईतील गिरण्यांत हा जास्तीचा खर्च येत नव्हता.
 
प्रबोधन पर्व: अशोक दा. रानडे – मर्मज्ञ संगीत समीक्षक
अशोक दा. रानडे (१९३७-२०११) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे संशोधक, वक्ता, लेखक, शिक्षक, प्रशासक असे अनेक पैलू होते. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत, पौर्वात्य-पाश्चात्त्य संगीत, नाटय़संगीत, लोककला या विषयांचा त्यांचा विचक्षण आणि गाढा अभ्यास होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे पहिले संचालक, अर्काईव्हज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर इन एथ्नोम्युझिकॉलजीचे पहिले साहाय्यक संचालकआणि एनसीपीएच्या ‘थिएटर अ‍ॅण्ड एथ्नोम्युझिकॉलजी’चे कार्यकारी म्हणून त्यांनी काम केले. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये संगीताचे अध्यापन केले.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर त्यांच्याविषयी लिहितात – ‘‘रानडय़ांची शिस्त, अभ्यासातील सातत्य, आपल्या संशोधनाविषयी निष्ठा आणि प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्याकडे असलेला त्यांचा कल या गुणांबद्दल त्यांचा हेवाच वाटावा. उगीच चूष म्हणून रानडे कोणताच विषय वाचत नसत. अभ्यासासाठी वाचन, हे त्यांचे उद्दिष्ट असे. दिशाहीन असणे विचारी रानडे यांच्या बाबतीत असंभव होते.’’
रानडे यांनी ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’, ‘स्टॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र’, ‘लोकसंगीतशास्त्र’, ‘भाषणरंग’, ‘भाषण व नाटय़विषयक विचार’, ‘संगीत विचार’, ‘हिंदी चित्रपटगीत’, ‘मला भावलेले संगीतकार’ आणि ‘संगीत संगती’ या मराठीतील नऊ पुस्तकांसोबत इंग्रजीत चौदा पुस्तकांचे लेखन केले. त्याविषयी प्रसिद्ध हार्मोनियमवादक चैतन्य कुंटे म्हणतात – ‘‘मराठीतल्या आस्वादक संगीतसमीक्षेचा पाया गोविंदराव टेंबे यांनी घातला व त्याला वामनराव देशपांडे यांनी खतपाणी घातले, तर विश्लेषणात्मक संगीतसमीक्षेचे अध्वर्यू होते केशवराव भोळे आणि त्यांचा वारसा डॉ. रानडे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेला.. विश्लेषणाच्या अनेक दिशा त्यांनी मोकळ्या केल्या, विश्लेषणाचे अनेक प्रकार हाताळले.. त्यातून संगीतशास्त्राची आणि समीक्षेची त्यांची अशी वेगळी परिभाषा बनली.’’ रानडे यांनी  ‘शोनार बांगला’, ‘देवाजीने करुणा केली’, ‘एक झुंज वाऱ्याची’ या नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा: पॉवरबाज नेत्याची गोष्ट
मारुतीच्या बेंबीत बोट घालून पाहणाऱ्या गावकरी मुलांची गोष्ट परिचित आहे. पहिला मुलगा थोडा डेअरिंगबाज, तो बोट घालतो आणि तिथे लपलेला विंचू त्याला चावल्यावर ते न सांगता, इतर मुलांना ‘गारगार’ लागलं असं सांगतो. मग बेंबीत बोट घालून तो ‘गारगार’ अनुभव घेणाऱ्या मुलांची तिथे रांग लागते. सगळ्यांना विंचू चावतो, पण ते सत्य न सांगता पहिल्या मित्राच्या तथाकथित सत्यकथनाची ते री ओढतात.
हास्यास्पद म्हणून सांगितलेली ही गोष्ट खरं तर शोकांतिका आहे. हास्यास्पद अशा अर्थानं की, आपली फसवणूक झालीय हे लपवण्याकरता आपण आपलीच आणखी फसवणूक करतो. फसवणुकीच्या जाळ्यात आधी स्वत:ला आणि मग आपल्याबरोबर इतरांना सामील करून घेतो.
गंमत म्हणजे हा फसवणुकीचा खेळ सगळेच सगळ्यांशी खेळत बसतात. ‘आपण मुळी फसलोच नाही’ असं म्हणून इतरांपुढे बढायाही मारतात. हा मानवी स्वभाव खचितच हास्यास्पद आहे. ही शोकांतिका आहे, कारण आपण फसवणुकीच्या या फाशात अडकताना इतके गुंतत जातो की त्यातून स्वत:ची कधी सुटका करून घेऊ शकत नाही. आपण इतरांना फशी पाडलं याचा फार तर आसुरी आनंद घेऊ शकतो.
मारुतीच्या बेंबीत बोटं घालणाऱ्या मुलांची गोष्ट मुलांची नाही तर पोक्त वयातल्या माणसांची कर्मकहाणी आहे. लहानपणच्या या गोष्टीचा प्रौढ वयात विचार करताना एक विचार असा आला की, असं का घडतं? आपण अशी स्वत:ची फसवणूक का करतो? काय साध्य करतो?
 अशा स्वभावातून आपली सुटका होऊ शकते का? सत्य सुंदर असतं की नाही, असाही महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. गोष्टीतलं नागडं सत्य निश्चितच धक्का देतं त्यातल्या कुरूपतेमुळे! कसंही असलं तरी सत्याचं खरं स्वरूप कल्याणकारी शिवम् असतं हे मात्र पटतं.
म्हणजे बोट घालून पाहणाऱ्या पहिल्या मुलानं किंकाळी फोडून सत्य जाहीर केलं असतं, तर पुढची शोकांतिका टळली असती. कधी कधी कल्याण म्हणजे प्रत्यक्ष मदत अथवा विकास असा अर्थ नसला तरी संकटाची पूर्वसूचना असाही होऊ शकतो.
दुसरा मुद्दा असा की, पहिल्या मुलामध्ये काही तरी विनाशकारी नेतृत्वगुण निश्चित आहेत. म्हणजे आपल्या बरोबरच्या मुलांची मानसिकता आणि मठ्ठपणाचे गुण त्याने अचूक हेरले आणि त्यांची दिशाभूल केली, त्यांना तोंडघशी पाडलं. असे नेते फारच धोकादायक, कारण आपण फसलो आहोत हे कळलं तरी त्याविषयी कोणी जाहीर वाच्यता करण्याची हिंमत करीत नाही.
असतात काही असे पुढारी, की जाणूनबुजून समाजाची दिशाभूल करण्याची ‘पॉवर’ त्यांच्याकडे असते. असा ‘पॉवरबाज’ पुढारी आपल्याकडे आहे?
मनमोराचा पिसारा फुलतो त्यासाठी फक्त ‘गुड न्यूज’ नको, समज आली, शहाणपणा आला तरी पिसारा फुलतो..
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity water in cloth process
First published on: 01-12-2014 at 02:54 IST