जीवाश्म इंधन मानवासाठी ऊर्जेचा एक अपरिहार्य स्रोत म्हणून वापरात आले. कोटय़वधी वर्षांपूर्वी सागराच्या तळाशी गाडल्या गेलेल्या सजीवांच्या मृत शरीरांच्या जीवाश्मांपासून बनलेल्या खनिज तेलाच्या स्वरूपात जीवाश्म इंधन मिळते. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवाश्म इंधन साठय़ांचे उत्खनन करून अशुद्ध तेल (क्रूड ऑइल) काढतात. शुद्धीकरण प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांपर्यंत ते पोहोचवणे, त्यातून तयार झालेली गॅसोलिन (पेट्रोल), डिझेल, वंगण तेल, नाप्था, डांबर अशी उत्पादने बाजारपेठांमध्ये वितरित करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी वाहतूक यंत्रणा जगभरात कार्यरत आहे. यात सागरी मार्गाने करण्यात येणारी वाहतूक आर्थिकदृष्टय़ा सगळय़ात जास्त किफायतशीर असल्याने क्रूड ऑइल तसेच इतर तत्सम पदार्थाची वाहतूक प्रामुख्याने सागरी मार्गाने खास तयार केलेल्या तेलवाहू जहाजांद्वारे करण्यात येते. जगभरात या वाहतुकीदरम्यान झालेले अपघात, मानवी निष्काळजीपणा, जहाजांच्या तेल साठवण्याच्या टाक्या समुद्राच्याच पाण्याने धुऊन ते पाणी समुद्रातच सोडणे, अशा कृतींमुळे समुद्र प्रदूषित होतो. १९८९ मधील ‘एक्झोन व्हाल्देझ’ जहाजाचा अलास्काच्या समुद्रात झालेला अपघात, १९९१ मधील आखाती युद्ध, २०१० मध्ये मुंबईच्या किनाऱ्यालगत खलीज आणि चित्रा या दोन जहाजांची झालेली टक्कर, २०१६ मध्ये चेन्नई बंदरालगत दोन जहाजांची झालेली टक्कर, अशा दुर्घटनांनी सागरी पर्यावरणाची हानी होते. पर्यावरणीय दहशत निर्माण करायला आखाती युद्धामध्ये इराकने अब्जावधी टन तेल जाणूनबुजून समुद्रात सोडले होते. क्रूड तेलाची समुद्रात घुसळण होऊन अॅरोमॅटिक व पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, पॅराफिन यांसारखे अनेक रासायनिक घटक बाहेर पडतात. अविद्राव्य भागापासून टारबॉल्स तयार होतात. तेलाचे तवंग आणि टारबॉल्स मैलोनमैल पाण्याच्या पृष्ठभागावर पसरून लाटांबरोबर किनारपट्टीवर ढकलले जातात. तेलतवंगामुळे सूर्यकिरण अडले जाऊन हरित प्लवकांसारख्या प्राथमिक उत्पादकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अन्नसाखळी विस्कटते. मोठय़ा प्रमाणात सागरी जीव मृत्युमुखी पडतात. माशांच्या कल्ल्यांवर तेलाचे थर जमा होऊन त्यांची श्वसनक्रिया मंदावते. तेलाचे अंश शरीरात जाऊन फुप्फुसे, यकृत, हृदय अशा अवयवांत त्यांचा संचय होतो. काही माशांच्या मांसाला रॉकेलसारखा वास येतो. समुद्रपक्ष्यांचे पंख या तेलाने माखल्याने उड्डाण आणि अन्नभक्षण न जमल्याने ते मृत्युमुखी पडतात. समुद्रकिनारे प्रदूषित होऊन त्याचा पर्यटनावर परिणाम होतो. म्हणूनच सागरी तेल प्रदूषणाला आळा घातला पाहिजे. डॉ. संजय जोशी, मराठी विज्ञान परिषद