भानू काळे

सीमावर्ती राज्यांच्या भाषा म्हणजे आपल्या भाषाभगिनीच असतात. सततच्या संपर्कामुळे त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. उदाहरणार्थ, कन्नड भाषा! चालुक्य, राष्ट्रकूट या कन्नडभाषक घराण्यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रावरही राज्य केले. आदिलशाहीमध्ये कर्नाटकच्या जोडीने महाराष्ट्रदेखील होता. पंढरपूरचा विठोबा कर्नाटकतही पूज्य मानला जातो. म्हणूनच त्याला ‘कानडा विठ्ठलू’ म्हणतात. भारतरत्न भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले. धारवाड, बेळगाव, कारवार, गुलबर्गा या शहरांत मराठीबांधव मोठय़ा संख्येने स्थायिक झाले आहेत. ‘मराठी भाषेचा इतिहास’ या पुस्तकात डॉ. गं. ना. जोगळेकर म्हणतात, ‘‘मराठीच्या जन्मापासून विसाव्या शतकापर्यंत कर्नाटकाचा महाराष्ट्राशी निकटचा संबंध आहे. पर्यायाने कन्नड आणि मराठी या एकमेकींच्या भौगोलिक जवळिकीमुळे सहवर्ती भाषा आहेत.’’

Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Discovery of four new species of lizard from Kolhapur and Sangli districts  Nagpur
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

‘अडगुळं मडगुळं, सोन्याचं कडबुळं..’ किंवा ‘अटक मटक चवळी चटक’ यांसारखी शिशुगीते कन्नडमधूनच आली. अनेक कन्नड शब्द आपण स्वीकारले. उदाहरणार्थ- गोंधळ, बोभाटा, भीड, चव, अडकित्ता, मुरकुंडी. अप्पा, अण्णा, अम्मा, ताई, अक्का ही आपलेपणा दाखवणारी संबोधनेही कन्नडमधून आली. अन्य बहुतेक भारतीय भाषांमध्ये तुपासाठी संस्कृत ‘घृत’पासून बनलेला ‘घी’ शब्द वापरतात. मराठीत मात्र आपण ‘तूप’ शब्द वापरतो; जे कन्नड ‘तुप्प’चे रूप आहे.

गुजराती भाषेच्या संदर्भातही हे खरे आहे. उंधियू, ढोकळा, खमण, थेपला, कढी यांच्यासारख्या खाद्यपदार्थाप्रमाणेच खेडूत, चोपडी, लोचा, तेजी, मंदी, वांधा असे अनेक गुजराती शब्द मराठीने स्वीकारले. हिंदीचा प्रभाव तर इतका आहे, की तो मुद्दाम दाखवायची गरजच नसावी. पंतप्रधान या शब्दाऐवजी ‘प्रधानमंत्री’, प्रेक्षकांऐवजी ‘दर्शक’, समारंभ साजरा झाला याऐवजी ‘समारंभ संपन्न झाला’, अवश्य यावे याऐवजी ‘उपस्थिती प्रार्थनीय आहे’ यांसारखे आता आपल्याकडे सर्वत्र रूढ झालेले शब्दप्रयोग हा हिंदीचाच प्रभाव आहे.

भाषाभगिनींचा असा प्रभाव नाकारण्यापेक्षा किंवा त्याच्याशी सतत संघर्ष करत राहण्यापेक्षा तो प्रभाव स्वीकारून पुढे जाणे आणि त्याच्यासह आपली भाषा उत्तमोत्तम साहित्यनिर्मितीतून अधिकाधिक संपन्न करत राहणे, श्रेयस्कर वाटते.

bhanukale@gmail.com