तेलवाहू जहाजांमधून एकेका वेळी तीन ते चार लाख टन खनिज तेल नेलं जातं. या तेलाचं अचूक मोजमाप करता येणं आवश्यक असतं. मोठय़ा जहाजाची एकेक टाकी दहा ते पंधरा हजार किंवा त्याहूनही जास्त घनमीटर क्षमतेची असते. अशा परिस्थितीत टाकीत भरलेल्या द्रव पदार्थाचे घनफळ किती आहे, ते मोजण्यासाठी आधी त्याची पातळी किंवा खोली मोजावी लागते. टाकीतला द्रवपदार्थ विषारी आणि ज्वालाग्राही असल्यामुळे हे मोजमाप टाकी न उघडताच करावे लागते. यासाठी हल्ली रेडार गेज या उपकरणाचा वापर केला जातो. या पातळीवरून टाकीतल्या द्रवाचे घनफळ काढण्याची कोष्टके असतात. त्यामध्ये बघून टाकीतील द्रवाचे घनफळ काढता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच वेळी त्या द्रवाचे तापमान आणि त्याची घनतासुद्धा मोजावी लागते. हे तापमान आणि घनता मोजण्यासाठी तेलाचे तीन पातळ्यांवरचे (उदा. ५ मीटर, १० मीटर, १५ मीटर) नमुने घेतले जातात आणि त्यांची सरासरी घेतली जाते. द्रवाची घनता तापमानाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असल्यामुळे त्याचे घनफळसुद्धा बदलत राहते. त्यामुळे केवळ घनफळावरून किती तेल आपण घेतले, हा अंदाज करणे योग्य होणार नाही.

या मोजमापात सुसूत्रता आणण्यासाठी जगभर काही तापमाने प्रमाण मानली आहेत. जे देश मेट्रिक प्रमाणपद्धती वापरतात ते बहुधा १५अंश सेल्सियस हे तापमान प्रमाण मानतात. याच्याच जवळचे ६० अंश फॅरनहाइट हे तापमान अमेरिकेत प्रमाण मानले जाते. तेलाचं घनफळ कोणत्याही तापमानाला मोजलं असलं तरी ते या प्रमाण तापमानाला किती झालं असतं; याचा हिशेब केला जातो.

त्याशिवाय या तेलाचं वस्तुमान काढण्यासाठी त्या तेलाची, त्या तापमानाला असलेली घनता विचारात घेतली जाते आणि त्याचं वजन ठरवलं जातं. याशिवाय तेल भरल्यामुळे जहाजाचा आकार थोडासा फुगीर होतो. आणि त्यामुळे घनफळात थोडा बदल होतो. याचे अचूक मोजमाप करणे अशक्य असते. अशा वेळी experience factor म्हणजेच आजवरच्या अनुभवाने लक्षात आलेला फरक (सुमारे २-३ टक्के) त्यात लावला जातो. अशा प्रकारे खनिज तेलाचं मोजमाप अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. त्यात चूक झाल्यास लक्षावधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.

कॅ. सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सच्चिदानंद राउतराय-  सन्मान

राउतराय हे काव्य लेखनाइतकेच आपल्या गद्य लेखनासाठीही वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. कादंबरी, कथा, निबंध असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांची एकमेव कादंबरी ‘चित्रगीवा’ १९३६ मध्ये प्रकाशित झाली, तेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते. या कादंबरीपासून उडिया साहित्यात मार्क्‍सवाद आणि मनोविश्लेषणात्मक लेखनाला सुरुवात झाली.

पौराणिक व लोककथांचा आपल्या साहित्यात वापर करीत असतानाच ते त्यांना आधुनिकतेचा पेहराव चढवतात. त्यांचे एकूण चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘एक उत्तीर्ण श्रावण’ या कथेत येणारा पावसाळा सूचित करताना, त्यांनी एका स्थानिक अविवाहित तरुणीचे चित्र रेखाटले आहे. पारंपरिक पद्धतीने ती तरुणी पाण्याने भरलेली मातीची घागर घेऊन निघालेली असते. रस्त्यावरील लाल सिग्नल बदलण्याअगोदर रस्ता पार करावा म्हणून ती घाईघाईने चालते. तेव्हा घागरीतील पाणी अंगावर सांडते व तिचे अंग भिजते. या भिजलेल्या कपडय़ांमुळे तिचे तारुण्य अधिक उठून दिसते. असे चित्र या कथेत त्यांनी रंगविले आहे. ‘प्रतिमा नाईक’ या कथेत स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यासाठी खस्ता खाणाऱ्या नायिकेचे वर्णन आहे. ‘हट’ ही त्यांची दीर्घकथा तर सामाजिक उपहासात्मक लेखनाचे उत्तम प्रतीक आहे. ढोंगी व बढाईखोर व्यक्तींकडून अंधश्रद्धा, ताईत, गंडादोरा यासारख्या गोष्टींना भुलून जाऊन आशा-निराशेच्या गर्तेत बळी पडलेल्या व्यक्तींचे यात प्रभावी वर्णन केलेले आहे.

आपल्या अनेक कथांमधून तसेच आपल्या कादंबरी लेखनातून राउतराय यांनी सिग्मंड फ्राईड व जुंग यांच्या मनोविश्लेषणात्मक विचारांचा आधार घेऊन आपल्या पात्रांचे मनोविश्लेषण केलेले आहे.

राउतराय यांनी उडिया साहित्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असे शोध कार्य केलेले आहे. भारतीय साहित्यातील मूल्य आणि आदर्शाचा विकास यासंबंधातील त्यांचे शोधकार्य १९७२ मध्ये प्रकाशित झाले. त्यात त्यांनी पूर्व वैदिक युगापासून सतराव्या शतकापर्यंत चर्चा केलेली आहे. साहित्यांचा उगम आणि विकास यावर नवा प्रकाश टाकला आहे.

कविता, कथा, समीक्षा, संशोधन कार्य अशा विविध प्रकारे लेखनाची साधना करून राउतराय यांनी साहित्याच्या सर्व लेखनप्रकारांवर आपल्या रचना कौशल्याचा ठसा उमटवलेला आहे. अमूल्य असे योगदान दिले आहे. सत्य, न्याय, संघर्षमय जीवन, मानवता यांच्या बाजूने त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.

भारत सरकारने १९६२ मध्ये ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला. १९६२ साली साहित्य अकादमी पुरस्कार, १९६५ मध्ये सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार त्यांना मिळाले. ऑल इंडिया पोएट्स कॉन्फरन्स, कलकत्ताचे १९६८ मध्ये ते अध्यक्ष होते. ओडिसा साहित्य अकादमीचे १९७८ ते १९८१ मध्ये अध्यक्ष होते. वेळोवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय साहित्यिक परिषदांमधून सक्रिय भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

फिल्म सेन्सार बोर्डाचेही ते सदस्य होते. उडिया कला- संस्कृती संग्रहालयाची स्थापना त्यांनी केली. त्यांचे बरेच साहित्य रशियन भाषेत अनुवादित झाले आहे. आंध्र विश्वविद्यालय व बऱ्हाणपूर विद्यापीठाने अनुक्रमे १९७७ ते १९७८ मध्ये डी.लिट्. देऊन राउतराय यांना सन्मानित केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय साहित्यातील अमूल्य योगदानासाठी १९८६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measurements of mineral oil
First published on: 15-06-2017 at 02:52 IST