रबर हा एक असा पदार्थ आहे, जो शाळेतील विद्यार्थ्यांच्या कंपास पेटीत हमखास आढळतो. शिवाय पायपुसणीत, तर कधी कधी पादत्राणांमध्ये असतो. एकूण काय, आपण रोजच्या जीवनात रबराचा वापर खूप करतो. रबरापासून तयार केलेली जगातील पहिली वस्तू म्हणजे ‘चेंडू’. हा काळ साधारणपणे १५ व्या शतकाचा असेल. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोकांनी झाडाच्या चिकापासून चेंडू तयार केला. सुरुवातीला या चिकाचा वापर बाटल्या, चप्पल तयार करण्यासाठी होत असे. अठराव्या शतकात झाडाच्या चिकापासून तयार केलेल्या घट्ट पदार्थाचा एक वेगळाच गुणधर्म जोसेफ प्रिस्टले या रसायनशास्त्रज्ञाच्या लक्षात आला. शिसपेन्सिलने लिहिलेल्या अक्षरावर हा पदार्थ घासला तर शिसपेन्सिलचे अक्षर खोडले जाते. ‘रब’ म्हणजे घासणे. प्रिस्टलेंनी या चिकट पदार्थाला रबर असे नाव दिले. रबर हा पदार्थ म्हणजे काही विशिष्ट झाडाचा चीक. झाडावरून काढल्यावर चीक काही वेळ द्रव रूपात असतो. हळूहळू घट्ट होत जातो, नंतर एकदम कडक होतो. एखादी वस्तू तयार करायची असेल तर अशा कडक रबराचा काहीच उपयोग होत नाही. १७६१ मध्ये हेरिसॉ आणि मॅक्यूर या शास्त्रज्ञांनी रबरामध्ये टर्पेटाइन टाकले. टर्पेटाइनमध्ये रबर विरघळले, त्यामुळे कडक झालेल्या रबराचा वापर करणे शक्य झाले. परंतु या मिश्रणापासून तयार केलेल्या वस्तू काही दिवसांत चिकट होतात असे लक्षात आले. चॅफी यानी टर्पेटाइन आणि काजळीचा वापर केला. काजळीमुळे वस्तूंना वेगळीच चकाकी आली. कडकपणा नाहीसा होण्यासाठी रबर खूप रगडले. मुळातच चिवट असलेल्या रबराने त्याचा चिवटपणा काही सोडला नाही. चाल्रेस गोडएयर याने झाडाच्या चिकात गंधक मिसळले. गंधक आणि झाडाचा चीक यामध्ये एक अभिक्रिया होते, त्या अभिक्रियेला ‘व्हल्कनीकरण’ म्हणतात. या अभिक्रियेत कार्बन आणि हायड्रोजनची साखळी तुटून गंधकाच्या अणूंची साखळी जोडली जाते. एक नवीन लांबलचक साखळी तयार होते. या साखळीतील गंधक, कार्बन आणि हायड्रोजन यांच्या विशिष्ट रचनेमुळे साखळी ताणली जाते आणि पुन्हा मागे येऊ शकते. रबरामध्ये असलेला स्थितिस्थापकत्व या गुणधर्माचे हेच रहस्य आहे.
सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  
चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मुंगी उडाली आकाशी..
संतानी सर्वसामान्यांसाठी सोप्या भाषेत काव्यरचना केली. त्यामधून भक्तीमार्ग दाखवला आणि प्रबोधन केलं. घरगुती जीवनातल्या साध्या गोष्टी, प्रचलित शब्द, दाखले नि दृष्टांत वापरून साधारण व्यक्तीच्या नित्य परिचयाच्या अनुभवांमधून हरिभक्तीचा, विठ्ठलाच्या नामरूपाशी नातं जोडलं. ज्या गावकुसातलं आणि गावगाडय़ातलं जीवन ते जगले. त्या संदर्भातल्या उदाहरणावरून लोकांच्या मनाशी नाळ जोडली.
काही वेळा मात्र संतानी काही अभंग रूपकात्मक लिहिले. शब्द नेहमीच्या भाषेतले पण त्यांची अशी काही गुंफण केली की वाचणारा गुंग होतो. अशी रूपकं वापरली की त्यांचा वरकरणी अर्थ सरळ किंवा अनुरंजनात्मक पण गूढअर्थ अथवा लक्ष्यार्थ मात्र थेट पारलौकिकाशी गाठ मारणारा.
मुक्ताईंच्या या काव्यरचनेचं गारूड असंच मनावर अनेक वर्ष आहे. आशाताईनी मुंगी उडाली आकाशी ही रचना कित्येक र्वष ऐकतो आहोत. क्षणभर थांबून त्याची गोडी चाखली. भजनाच्या थाटातली ही रचना मनाला गुंगवते.
मुंगी उडाली आकाशीं।
तिने गिळिले सूर्याशीं ।। १।।
थोर नवलाय जांला।
वांझे पुत्र प्रसवला ।। २।।
विंचु पाताळाशी जाय।
शेष माथां वंदी पाय ।। ३।।
माशी व्याली घार झाली।
देखोनी मुक्ताई हांसली।। ४।।
इथे मुक्ताईनी त्यांच्या जीवनातले श्रेयस आणि प्रेयस खुबीने काव्यबद्ध केलं आहे. देखोनी मुक्ताई हांसली म्हणजे प्रत्यक्ष पाहून, अनुभव घेऊन मुक्ताई आनंदित झाली आहे. मुक्ताईने एक अननूभत सत्य डोळ्यादेखत उलगडताना पाहिलं आणि तिच्या मनातलं दु:ख आणि निराशा मावळली.
अविश्वनीय वाटाव्या अशा घटना घडल्या. त्या प्रत्यक्ष पाहिल्या याची मुक्ताई साक्षीदार आहे. कोणत्या अजब गोष्टी मुक्ताईने पाहिल्या.
इथेच काव्यरचनेतलं रूपक अतिशय मोहकपणे आपल्यासमोर साकारतं.
मुंगी उडाली आकाशात गेली काय आणि तिने सूर्यालाही गिळले. निपुत्रिकेला पुत्र झाला. विंचु पाताळात गेला, शेषाने माथा टेकला माशी व्यायली आणि तिला घार झाली!
अर्थात या रुपकातील पहिली ओळ सारं रहस्य कथन करते. मुंगी म्हणजे इवलाशी जीव, त्याकाळी सूक्ष्मातला सूक्ष्म पण त्या अल्पस्वल्प जिवामध्ये किती प्रचंड सामथ्र्य आहे पाहा. केवळ आत्मप्रेरणेच्या जोरावर मुंगीने ज्ञानरूपी आकाशात उड्डाण केले आणि प्रत्यक्ष स्वयंप्रकाशी चैतन्य (सूर्य)ला आत्मसात केले. मुंगीतले ते अंशरूपी चैतन्य आणि  अवकाशात भरून राहिलेलं विश्वचैतन्य यांचा मिलाफ झाला. मुंगी म्हणजे माणूस आणि या चिमुकल्या माणसाच्या अंगी केवढी शक्ती सामावली आहे, आणि स्वयंस्फूर्तीने अवगाहन केले तर ती शक्ती एका अमोघ चैतन्यात रुपांतरित होते.
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – भाषा अपुरी पडणे, हा सांस्कृतिक आळस!
‘‘पूर्णत: शब्दरूप करू गेल्यास संगीतव्यवहार जिरवतो, हे खरे आहे. पण तसे पाहता कोणत्या व्यवहाराचे भाषेने पूर्णत: स्पष्टीकरण देता येते?.. संपूर्ण अभिप्राय व्यक्त करण्यास शब्द/ भाषा अपुरी पडणे काही फक्त संगीताबाबतच घडते असे नाही.. संगीतवस्तू, संगीतप्रक्रिया आणि संगीतानुभवांना शब्दबद्ध करण्याची कसोशीची धडपड केल्यानंतर, पुरेशा अंशी शब्दरूप दिल्यानंतर बोलावयाची वाक्ये फार आधी बोलून कसे भागेल? लढाई सुरू होण्याआधीच धनुष्य खाली ठेवणे कितपत योग्य?.. गेल्या काही पिढय़ांत असे ‘रणछोडदास’ बरेच निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या पळपुटेपणाचे तत्त्वज्ञान बनवण्याचा यत्न केला! अनेक कारणांनी काही विचारवंत, सौंदर्यमीमांसक वगैरेही संज्ञा, त्यांचे व्यूह वा त्यांची संकुले आणि सर्वाचे व्यवस्थितीकरण न करता गूढवादाचा खास बळी म्हणून संगाताकडे प्रेमाने पाहू लागले!’’ अशोक दा. रानडे ‘संगीत संगती’ (ऑक्टोबर २०१४) या पुस्तकात ‘काम चालू, संज्ञा बंद’ या लेखात संगीतकारांच्या लेखन आळसाविषयी म्हणतात – ‘‘.. ‘वह तो पंडत है’ या शिवीसमान शेऱ्यांना कलाकार जवळ करतात; तेव्हा त्यांच्या दोन गंडांना वाचा फुटते. शास्त्राचा उगम ठरणाऱ्या प्रश्नांचा प्रत्यक्ष क्रियेशी काय संबंध, असा गैरसमज उराशी बाळगून कलाकार शास्त्री व शास्त्र यांच्याविषयीचा एक तुच्छतागंड प्रकट करतात. दुसरे म्हणजे, जी व्यक्ती वा संस्था शास्त्रप्रश्नांना उत्तरे देऊ पाहते, तिच्याविषयीचा भयंगड! विद्वतपरंपरेविषयी वाटणारी तुच्छता व विद्वानांविषयी भीती यांनी भारतीय संगीतकार निदान चार-एक शतके पछाडलेला असावा! आपण संगीतकार म्हणून काय, कसे वा का करतो ते शब्दबद्ध करण्याची कसोशी, ही कसोटीच आहे. आपल्या सूक्ष्मतेची, अभ्यासाची आणि सुजाणपणाची पातळी वाढवण्याकरिता संगीतकाराने केलीच पाहिजे अशी ती साधना आहे. .. पूर्वी या देशात संगीतकाराने शास्त्रकार बनण्याची परंपरा होती आणि म्हणून शास्त्रग्रंथांतल्या अनेक संज्ञा सार्थ आणि आजही प्रेरक वाटतात. व्यवहार होत असूनही संज्ञा नसणे सांस्कृतिक आळसच म्हणायला हवा!’’