कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळील उड्डाणपुलावर ५२ पथदिव्यांपैकी २५ ते ३० दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलावरील अंधारयात्रा कायम आहे. त्यामुळे वाहनचालक आणि सेवा रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारोटी उड्डाणपूल तसेच नजीकच्या भागात सर्वाधिक अपघात घडले आहेत. मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर अपघाती वळण असल्याने दिवसाही या ठिकाणी वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
पथदिव्यांमुळे वाहनचालकांना उड्डाणपुलावरील खड्डय़ांचा अदमास घेता येत होता; परंतु सद्य:स्थितीत पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना पुलावरील अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय, पुलाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही अंधारामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पाहणाऱ्या आयआरबी कंपनीने तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
लोकसत्ता टीम
टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला चारोटी पुलाजवळ मर्सिडिज बेंझ कारला भीषण अपघात झाला होता. कारच्या चालकाने अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक लावला होता, असा अहवाल तपास पथकाने दिला होता. त्यात चारोटीजवळील अरुंद आणि तीव्र उतार असलेल्या जागेचा अंदाज चालकाला आला नव्हता. चारोटी हे महामार्गावरील सर्वाधिक धोकादायक ठिकाण म्हणून आजवरच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. तरीही आजवर महामार्ग प्राधिकरणाने येथील धोका दूर केलेला नाही.