पालघर: पालघर, केळवे, माहीम भागाला उसरणी, एडवण, दातिवरे भागाची जोडणारा दांडा खटाळी या महत्वपूर्ण पुलाच्या आधार खांबाजवळ बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या बेकायदा उत्खननाकडे महसूल कर्मचारम्य़ांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
पालघर, माहीम, केळवे भागातून सफाळ्याच्या पश्चिम भागात जाण्यासाठी सुमारे १०-१२ किलोमीटरचा वळसा घालावा लागत असे. पालघर तालुक्यातील खाडीने विभागलेल्या या दोन भागांमधील संपर्क सुलभ व्हावा व दळणवळण सुलभ व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रयत्नने केळवे ते दांडाखटाळी दरम्यान पुलाची सन २००३ उभारणी करण्यात आली.
या पुलाच्या आधारखांबा लगत गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन केले जात आहे. बैलगाडीच्या माध्यमातून रात्री पासून सकाळ पर्यंत ओहटी —भरती दरम्यान सोयीच्या वेळेत रेती काढली जात असून त्यामुळे पुलाचा आधारस्तंभांना तसेच पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या बेकायदा उत्खनाविरुद्ध महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
‘वैतरणा नदीच्या धर्तीवर बंदी आणा’
वैतरणा नदीवर उभारण्यात आलेल्या रेल्वे पुलाच्या लगत मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन करण्यात आल्यामुळे पुलाच्या आधार खांबाचा भाग मातीच्या आवरणातून बाहेर पडून खाडीतील लाटांना अनाच्छादन झाल्याचे रेल्वे पुल सुरक्षा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर वैतरणा नदीच्या दुतर्फा ५०० मीटर परिसरात रेती उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वैतरणा पुलाच्या धर्तीवर जिल्ह्यतील नद्यंवरील पुलावर याच पद्धतीने उत्खनन बंदी आणून दक्षता घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.