पालघर: पालघर जिल्ह्याचे क्रीडा संकुल येत्या वर्षभरात पूर्णत्वास येणार असून यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात खेळाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. २०३२ च्या ऑलम्पिक करिता जिल्हा क्रीडा संकुलावर खेळाडू घडणार असा विश्वास जिल्हाप्रशासनाने व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धावणे व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, गिरीश इर्नाक, प्रतिश पाटील, अमृत घाडगे, जयवंती देशमुख, भीमराव गवई, डॉ. संपदा चौधरी, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी आदी उपस्थित होते. सन २०३२ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ऑलम्पिक खेळासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी शासनाच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ६७ हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षी एक लाखाच्या वर खेळाडू आपल्या जिल्ह्यातून विविध वयोगटात विविध खेळ प्रकारात सहभागी होतील असा विश्वास यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केला.
सन २०३२ च्या ऑलम्पिक मध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडू सुद्धा आपल्या देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनी ऑलम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
धावणे व बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी खेळाडू
क्रॉस कंट्री स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक सुशांत सांगळे, द्वितीय क्रमांक चिराग तरे, तृतीय क्रमांक आनंद जाधव यांनी पटकावला.
सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक तनुश्री गाडर, द्वितीय क्रमांक शार्वी मोरे, तृतीय क्रमांक गायत्री भंडारी यांनी पटकावले.
पुरुषांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक शुभम धोडी, द्वितीय क्रमांक सागर चव्हाण, तृतीय क्रमांक प्रवेश जाधव यांनी पटकावले.
महिलांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक श्रद्धा पारधी, द्वितीय क्रमांक अंजली घाटाळ, तृतीय क्रमांक वैदेही कुडू यांनी पटकावला.
१३ वर्षांवरील मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मंथन पांचाळ, द्वितीय क्रमांक सुवन आनंद, तृतीय क्रमांक राधानंद पासवान यांनी पटकावला.
१३ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक कस्तुरी शिंदे, द्वितीय चैतन्य पाटील, तृतीय क्रमांक क्रीतेश शेट्टी यांनी पटकावला, उत्तेजनार्थ पारितोषिक चिन्मय पाटील यांना देऊन गौरविण्यात आले.