मत्स्य उत्पादनामध्ये सातत्याने घट होत असताना मच्छीमारांना हा व्यवसाय सुरू ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. वादळी हवामानामुळे १ जून पासून सुरू होणाऱ्या मासेमारी बंदीच्या काळापूर्वीच मच्छीमाराला मे महिन्याच्या मध्यावर मासेमारी बंद करावी लागल्याने मच्छीमारांसमोर नव्याने संकट उभे राहिले आहे.
यंदाच्या हंगामात मासेमारांचे उत्पन्न मर्यादित राहिले होते. मासेमारीसाठी समुद्रात जाताना मनुष्यबळ, इंधन खर्च, बर्फ व इतर बाबींचा विचार करता त्या तुलनेत पकडली जाणारी मासळी कमी प्रमाणात असल्याने एप्रिल नंतर असणाऱ्या मासेमारीच्या अखेरच्या टप्प्यात अधिकतर बोटी किनाऱ्यावर नांगरलेल्या आहेत.
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या आरंभी आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरणाऱ्या पापलेट माशाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र दिवाळीनंतर पापलेटची आवक अचानक कमी झाल्याने मासेमारी बोटीच्या प्रत्येक फेरीला होणारा खर्च निघत नव्हता. तरी देखील डिसेंबर पासून डिंग पाला, मुशी, काटी, घोळ, दाडा सारख्या माशांची आवक उर्वरित मोसमात चांगल्या प्रमाणात झाल्याने मच्छीमारांसाठी यंदाचे हंगाम समाधानकारक ठरले होते. मात्र एप्रिल पासून या माशांची पकड देखील कमी झाली होती.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अधिकतर मासेमारी बोटीना किनाऱ्यावर नांगरून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याने निवडक बोटी मात्र या काळात मोठे उत्पन्न मिळेल या आशेवर होत्या. त्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेल्या वादळी परिस्थिती व अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच डहाणू व इतर काही भागात बोटीची नासधूस देखील झाली होती.
यंदाच्या हंगामात तीन आठवडे शिल्लक असतानाच महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्याच्या किनारपट्टीवर वादळ येणार असल्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे. २३ मे पासून पश्चिम किनारपट्ट्यावर वादळाची शक्यता वर्तविल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून मासेमारी बोटी किनाऱ्यावर आणण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागाने दिल्या होत्या. आता राज्यात मानसून दाखल झाल्यामुळे यंदाचे मासेमारी हंगाम १०-१५ दिवसांपूर्वीच संपले.
बहुतांश मासेमारी बोटींवर सहकारी संस्थेमार्फत कर्ज घेतले असून मासेमारीची आवक कमी झाल्याने हे कर्ज फेडण्याचे बोट मालकांना शक्य होत नाही. सरकारकडून मत्स्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी या पूर्वीच्या तीन वर्षांचे सरासरी उत्पन्न विचाराधीन घेतले जात असल्याची पद्धत अवलंबल्याने दुष्काळाच्या निकषांची पूर्तता होत नसल्याचे दिसून येते. मच्छीमार बांधवांना १० वर्षांपूर्वी होणारी माशांची आवक व सध्याच्या हंगामात मिळणारे मासे यांचा अभ्यास करून मासेमारी करताना जाळी, इंधन, बर्फ व इतर सर्व लागणाऱ्या आवश्यक बाबींच्या खर्चामध्ये झालेली वाढ लक्षात घ्यायला हवी असे मच्छीमारांचे मत आहे. त्याशिवाय तेल साठ्यांचे सर्वेक्षण करताना ठराविक भागात बंद केली जाणारी मासेमारी बंदी व लहरी हवामानामुळे मासेमारीवर होणारा परिणाम यामुळे देखील मच्छीमारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.
मासेमारीसाठी स्थानिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सध्या डोंगरी भागातील आदिवासी बांधवांना खलासी म्हणून पाचरण करण्यात येते. काही भागात परप्रांतीय बांधव देखील या व्यवसायात जोडले गेले आहेत. अशा खलाशांना संपूर्ण हंगामासाठी वेतन निश्चित केले जात असून मासेमारी हंगाम लवकर बंद केल्याने बोट मालकांना आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागले आहे.
मच्छीमारांचे उत्पन्न वाढावे तसेच पारंपारिक मासेमारी शाश्वत पद्धतीने सुरू राहावी या दृष्टीने कमी आकाराचे मासे पकडण्यावर बंदी आणण्याचा कायदा राज्य सरकारने आणला आहे. मात्र या कायद्याची तसेच बंदी असलेल्या पर्ससीन, एलईडी व ट्रॉलर मासेमारी बाबत कठोर अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारमध्ये निरुत्साह आहे. यामुळे लहान माशांची पकड मोठ्या प्रमाणात केली जात असून परिणामी मोठ्या आकाराच्या माशांची आवक कमी होत असून मच्छीमारांना अपेक्षित लाभ होत नाही असे दिसून आले आहे.
१ जून ते ३१ जुलै या काळात वादळी वातावरणाच्या अनुषंगाने मासेमारी बंदी आणली जाते. बहुतांश महत्त्वाच्या माशांचे प्रजनन नोव्हेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान होत असून त्यानंतरच्या काळात लहान माशांची पकड वेगवेगळ्या प्रकारच्या मासेमारी करणाऱ्यांकडून होत असते. अशावेळी अवैद्य पद्धतीची मासेमारी बंद ठेवणे व त्याच बरोबरीने लहान आसाची जाळी घेऊन मासेमारी करण्यावर बंदी आणण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही. याचा देखील परिणाम मत्स्य उत्पादनावर होत असून मच्छीमारांसमोर वातावरणा सोबत लहान माशांच्या पकडीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने आगामी काळात याबाबत गांभीर्याने पावले उचलली नाहीत तर पारंपरिक पद्धतीची मासेमारी व्यवसाय काही काळाने बंद पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे
वादळी हवामान, दाखल झालेला मानसून तसेच मासेमारी करणे किफायतशीर नसल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी यंदाचे मासेमारी हंगाम मुदतपूर्व बंद झाली असून मांसाहार खाणाऱ्या मंडळींना ताजे मासे खाण्यास अडीच पावणेतीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.