पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात सातिवली येथील उड्डाण पुलचे काम अपूर्ण अवस्थेत राहिल्यामुळे गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी सातिवली येथील पुलाच्या सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणे, तातडीने कॉंकटीकरण करण्याबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचबरोबरीने हलक्या वाहनांना पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक करण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
सातिवली येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्याच्या आरंभी सेवा रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊन वाहनांची रांग गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर लागली होती. गुजरात कडे प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालकांनी मुंबईकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेच्या मार्गीकेवरून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याने गेले काही दिवस या पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे विरार (शिरसाड) ते बोईसर (चिल्हार) दरम्यान चे अंतर ओलांडण्यासाठी चार ते सात तासांचा अवधी काल अनेक वाहन चालकांना लागला होता.
या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत काल सायंकाळी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहतुक काही दिवस बंद करून सेवा रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्याच्या प्रस्ताव पुढे आला होता, मात्र अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
दरम्यान जलद देखील परिपक्व होणाऱ्या फास्ट सेटलिंग कॉंक्रीट द्वारे सातिवली पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. हे काम जलद गतीने पूर्ण करावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान पावसाने उघडीप घेतल्याने खडीमिश्रीचा साहित्याच्या च्या साह्याने पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून आजपासूनच सातिवली पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर मार्गीका निहाय काँक्रिटीकरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पुढील पाच ते आठ दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून सेवा रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या निर्वळेल अशी आशा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी लोकसत्ता कडे व्यक्त केली. हे काम जलद गतीने व्हावा यासाठी ठेकेदाराने अपेक्षित मनुष्यबळ पुलाच्या जवळपास निवासासाठी आणले असून दिवस-रात्र काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विरुद्ध दिशेच्या मार्गीके वरून प्रवास करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस, पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कार्यरत असून त्यांच्या मदतीला वाहतूक वॉर्डन यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गीकेवर होणारी वाहतूक कोंडी ही समस्या सुटेल अशी आशा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या सातीवली पुलावर खडी पसरवून त्यावरून हलकी वाहन सोडण्यास पोलिसांनी आरंभ केला आहे. त्यामुळे मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर काही दिवस असणाऱ्या १० ते २० किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा निम्म्यावर येऊन ठेपले आहेत. सद्यस्थितीत दोन्ही मार्गी के वरून धिम्या गतीने वाहतूक सुरू असून मुंबईकडे जाणारी मार्गीका जवळपास मोकळी असल्याचे पालघरच्या वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील काही दिवसात परिस्थितीत व पदावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल असे जिल्हाधिकारी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.