विनायक पवार
बोईसर : देशातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीपैकी एक असणारम्य़ा तारापूर औद्योगिक वसाहत व परिसरातील बोईसर-चिल्हार या मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी सोबतच अपघातांचे प्रमाण वाढत असून या प्रश्नाकडे वाहतूक पोलिसांसोबत एमआयडीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पोलाद, अभियांत्रीकी, औषधे, रासायनिक आणि वस्त्रद्योग क्षेत्रातील जवळपास १२०० कारखाने आहेत. येथे दोन लाखांपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. या कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी रोज हजारो ट्रेलर्स, कंटेनर्स, ट्रक्स आणि टँकर सारखी अवजड वाहनांची वाहतूक होत असते.
या वाहनांच्या पार्कींगसाठी वाहनतळ नसल्याने ही अवजड वाहने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच बोईसर, खैरापाडा सरावली या ग्रामपंचायत हद्दीतील नागरी क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर तसेच बोईसर-चिल्हार या मुख्य मार्गावर व बेटेगाव आणि मान या गावांच्या हद्दीत दोन्ही बाजूस बेकायदा पार्कींग केली जातात. सकाळी कारखान्यात कामावर जाण्यासाठी तसेच संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या लाखो कामगारांना त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. बोईसर, सरावली, खैरापाडा या ग्रामपंचायती फक्त ‘नो पार्कींग’ चे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संधाकाळी तसेच रात्रीच्या अंधारात या अवजड वाहनांना मागच्या बाजूने धडकून अनेक चारचाकी आणि दुचाकी चालकांचे अपघात होऊन तीन महिन्यांमध्ये चार दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. त्यातच औद्योगिक वसाहत परिसर आणि बोईसरचे मुख्य चौक, उड्डाणपूल आणि रस्त्यावरती रात्रीच्या सुमारास काही अवजड वाहने बंद अवस्थेत उभी असल्याने रात्रीच्या वेळी वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. बोईसर चिल्हार रस्त्यावरील खैरापाडा उड्डाणपूल उतरल्यानंतर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने धोकादायक रीतीने बेकायदा पार्कींग केलेली उभी असतात.
अनेक ठिकाणी बेकायदा वाहनतळ
बोईसर तारापूर परीसरात रस्त्यांवर अनेक जागी बेकायदा वाहनतळ उभारण्यात आले आहेत. यामध्ये बोईसर चिल्हार रस्त्यावरील विराज प्रोफाईल कंपनी, खैरापाडा, बेटेगाव, मान गावांची हद्द, मधुर हॉटेल ते मुकुट टॅंक पर्यंत रस्त्यावरील संधू ट्रान्सपोर्ट, आशीष लाईफ सायन्स, हयूंदाई, मारुती सुझुकी, टाटा या प्रवासी वाहनांची शोरूम्स, अवधनगर, जेएसडब्लू कंपनी, स्थानिक गुन्हे शाखा परिसर, बोईसर-पालघर रस्त्यावरील यशवंतसृष्टी समोरील परिसर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
वाहन स्थळासाठी पर्याय जागा
औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयान कंपनीसमोर असलेला मोकळा भूखंड पर्यायी वाहनतळासाठी देण्याची केलेली मागणी औद्योगिक विकास महामंडळाकडे अनेक वर्षे धुळखात पडून आहे, असे म्हटले जात आहे.
ट्रक टर्मिनलच्या जागेवर अतिक्रमण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ट्रक टर्मिनलच्या आरक्षित जागेवर अनधिकृत गाळे, टपऱ्या आणि झोपडय़ांनी अतिRमण केल्याने या जागेचा वाहनतळासाठी वापर होत नाही. ही जागा पार्कींगसाठी सोयीची नसल्याने बहुसंख्य अवजड वाहने रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्किंगकरून लावली जातात. बोईसर तारापूर परिसरात रस्त्यावरील अवैध पार्किंगचाप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रस्त्यावर बेकायदा उभ्या वाहनांना धडकून रोज लहान मोठे अपघात होत आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनलला बॉबे रेयॉन कंपनीसमोरील जागा मिळावी म्हणून मी एमआयडीसी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून ही जागा मिळाल्यास पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
-जगदीश धोडी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पालघर