पालघर : प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी प्लास्टिक पिशव्या वापर व विक्रीवर जिल्हाधिकारी यांनी पूर्णतः बंदी करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असताना देखील जागतिक पर्यावरण दिन समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेदरम्यान सर्वाधिक कचरा हा प्लास्टिक पिशव्यांचा असल्याचे आढळले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला पर्यटन व स्थानिक व्यापारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमे दरम्यान एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व जनजागृती करण्यात आली होती. या उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांनी शिरगाव येथील स्थानिक दुकानदारांशी संवाद साधून समुद्रकिनारी प्लास्टिकमधील वस्तू विक्री न करण्याचे आवाहन केले. तसेच पर्यटकांनी प्लास्टिक कचरा समुद्रकिनारी न आणावा यासाठी सतत जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले होते. तसेच संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र असे असताना जागतिक पर्यावरण दिनी शालेय विद्यार्थ्यांकडून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या स्वच्छतेदरम्यान कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्याचे आढळून आले. प्रशासनाने दिलेल्या आदेशाला दीड महिन्याचा कालावधी उलटून देखील आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.याबाबत जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्याशी संपर्क साधला असता प्लास्टिक बंदीबाबत पुन्हा आदेश देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.