पालघर : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्याने ६० हजार ७०० घरकुलांचे उद्दिष्ट साध्य केले असून या मंजूर झालेल्या घरकुलांच्या पाया व भिंत उभारणीत देखील पालघर जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. लवकर दाखल झालेला पाऊस, वीट, रेती व मजुरीचे चे वाढलेले दर, एकाच वेळी अनेक ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने मनुष्यबळाची मर्यादा बाजूला सारून जिल्ह्यातील नागरिकांनी ही कामगिरी केली आहे.
सन २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या झालेल्या सर्वेक्षण पालघर जिल्ह्याला ६०,७८३ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३० पेक्षा कमी घरकुलांना मंजुरी देण्याचे काम प्रलंबित राहिले आहे. घरकुलाच्या उभारणीसाठी शासन एक लाख २० हजार रुपये अनुदान देत असून त्यापैकी पाया बांधणीपर्यंत १५ हजार, भिंतीच्या उभारणीनंतर ७० हजार, घराचे पत्रे बसवल्यानंतर उर्वरित ३० हजार व संपूर्ण घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अखेरचे ५००० असा निधी दिला जातो.
पालघर जिल्ह्यात मंजूर झालेल्या घरकुलांपैकी ५३,९७० घरांचे (८९ टक्के) पाया उभारणीचे काम पूर्ण झाले असून ४० हजार ९१८ (६८ टक्के) घरांचे भिंत पत्राच्या पातळीपर्यंत (लँटिन पर्यंत) पूर्ण झाले आहे. याच बरोबरीने मंजूर घरांपैकी २८ हजार ३०२ घरकुलांचे पत्रा बसवण्याचे काम पूर्ण झाले असून ५००० पेक्षा अधिक घरांचे काम पूर्ण झाले असून त्याला अखेरचे अनुदान प्राप्त झाले आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. तसेच मे महिन्याच्या अखेरच्या काही दिवसात सलग पाऊस कोसळत राहिल्याने घरकुलांच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे घरकुलांच्या उभारणीसाठी लागणारा विटा, रेती व इतर कच्चा माल महागला असून ग्रामीण भागात मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवल्याने अनेक ठिकाणी घरकुल अपूर्ण अवस्थेत राहिली आहेत.
शासनाने प्रत्येक घरकुलाला एक लाख २० हजार रुपये मंजूर केले असले तरीही आगामी काळात त्यामध्ये वाढ होऊन प्रत्येक घरकुलाला एक लाख ३५ हजार व सोलर दिवे बसवण्यासाठी १५ हजार अशी एकूण दीड लाख रुपये देण्याचे विचाराधीन असून या प्रकरणात शासन निर्णय निर्गमित होणे प्रलंबित राहिले आहे. पावसाच्या तोंडावर अनेक घरकुलांची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असून उशिराने मंजूर झालेल्या घरकुलाला तसेच मनुष्यबळाचा अभाव भेडसावलेल्या ठिकाणी घरकुल मालकांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घरकुल पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी दिला जात असला तरी पावसाळा संपल्यानंतर घरकुल उभारणीच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
घरकुलांची मोठी संख्या
जिल्ह्यात एकाच वेळी ६० हजार घरकुलांचे काम हाती घेण्यात आले असून डहाणू तालुक्यात गंजाड मध्ये ८५०, सायवन येथे ५८५, आंबेसरी येथे ३२९, आगवण येथे २७८ यांच्या सह डहाणू तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींमध्ये २०० पेक्षा अधिक घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. तसेच मोखाडा तालुक्यातील आसे गावी ५५०, मोऱ्हांडा येथे ४८५, बोरीस्ते येथे ४७५, पोशेरी वाडा येथे ३४० घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. गावामध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुलांची उभारणी होत असल्याने उभारणीच्या कामाचे जीपीएस फोटो घेऊन ते संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांची काही प्रमाणात कमतरता भासली होती. मात्र त्यावर मात करून जिल्ह्यातील गरजू कुटुंबांनी श्रमदानाने घरकुल उभारणीमध्ये मुसंडी मारल्याचे दिसून आले आहेत.
आगामी पाच वर्षासाठी एक लाख घरकुल मंजूर
मे २०२५ मध्ये नव्याने झालेल्या सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यात एक लाख एक हजार १७३ कुटुंबांकडे घर नसल्याचे सर्वेक्षण अंती दिसून आले आहे. या कुटुंबीयांना २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही घरकुल मंजूर होणार असून सर्वेक्षणात प्राप्त झालेल्या माहितीची छाननी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी लोकसत्ताला सांगितले.
जिल्ह्यातील नागरिकांनी सर्व अडचणींवर मात करून घरकुलाच्या उभारणीत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलांची उभारणी सुरू असल्याने पाहणी दरम्यान एक सुखद चित्र दिसून आले. जिल्ह्यासाठी १४० ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांची मागणी केली असता सध्या ३४ ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांच्यामार्फत पाहणी व देखरेखेचे काम सुरू असून पालघर जिल्ह्यातील घरकुल उभारणीचे काम समाधानकारक आहे. घरकुल वाटप तसेच टप्पा दोन व तीन मध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. – डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प अधिकारी