बोईसर: सूर्या कालव्यांवर स्थानिक नागरिकांच्या दळणवळणासाठी बांधण्यात आलेले बहुतांश पूल हे धोकादायक बनले आहेत. कालव्यांवरील पूल कोसळल्यास नागरिकांना ये जा करणे कठीण होणार असून पुलांची दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी उजवा आणि डावा तीर कालवे तयार करण्यात आले आहेत. जवळपास ६५ गावांच्या हद्दीतून उजवा आणि डावा तीर कालवे जात असून गावपाड्यांच्या दोन्ही बाजूला वसलेल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ठीकठिकाणी पूल तयार केले गेले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या पुलांची देखभाल दुरुस्ती अभावी बिकट स्थिती झाली आहे. पुलांच्या बांधकामातील दगड, सिमेंट, लोखंडी सळया निखळत असल्याने ते दळणवळणासाठी धोकादायक बनले आहेत.

आदिवासी गावपाडे कालव्याच्या दोन्ही बाजूंना विभागले गेले आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात कालव्यांमधून पाणी वाहत असल्याने कालव्यांवर बांधलेले पूल हे नागरिकांच्या दळणवळणासाठी एकमेव आधार आहेत. अनेक ठिकाणी कालव्याच्या एका बाजूला माणसांची वस्ती तर दुसऱ्या बाजूला मुख्य रस्ता, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे असून शालेय विद्यार्थी, महिला पुरुष, आजारी रुग्ण यांना जीव धोक्यात घालून धोकादायक पुलावरून ये-जा करावी लागते. कालव्यावर बांधण्यात आलेले पूल हे नागरिकांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर पडत आहेत. मात्र अनेक गावातील पूल हे धोकादायक बनल्याने कधीही कोसळून अपघात घडण्याची आणि दळणवळणाचा एकमेव मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाकडून कालव्यांवरील धोकादायक असलेले पुलांचे संरचनात्मक परीक्षण करून तातडीची दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नवीन पुलांची मागणी

सूर्या प्रकल्पाच्या उजवा तीर कालव्याशेजारी ३५ ते ४० गावे आणि डावा तीर कालव्याजवळ २० ते २५ गावे वसली आहेत. दोन्ही मुख्य कालवे आणि त्याच्या वितरिकांवर स्थानिक नागरिकांच्या दळणवळणासाठी जवळपास ९० ते ९५ लहान पूल बांधण्यात आले आहेत. यातील बहुसंख्य पुलांची बांधकामे धोकादायक झाली असून धोकादायक पुलांच्या जागी नवीन पूल बांधून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पालघर तालुक्यातील शिगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी सूर्या उजवा तीर कालव्यावर दोन पूल बांधण्यात आले आहेत. मात्र दोन्ही पुलांची अवस्था अतिशय जर्जर झाली असून ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. पूल कोसळल्यास कालव्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना ये जा करणे त्रासदायक होणार असून नवीन पूल बांधून देण्याची मागणी नागरिकांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

शिगाव येथील बेलपाड्याची एकूण अंदाजे लोकसंख्या ६०० इतकी आहे. सूर्या कालव्यामुळे पाडा दोन भागात विभागला असून दोन्ही बाजूला ये जा करण्यासाठी बांधलेल्या पुलांची अवस्था बिकट बनली आहे. पूल कोसळल्यास नागरिकांचा संपर्क तुटणार असून पाटबंधारे विभागाने तातडीने नवीन पूल बनवून द्यावेत. – विलास मलावकर, शिगाव ग्रामस्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्या कालव्यांवरील नादुरुस्त पुलांच्या जागी दरवर्षी निधीच्या उपलब्धतेनुसार नवीन पूल बांधण्याचे काम केले जाते. यावर्षी पाच नवीन पुलांची कामे प्रस्तावित असून पावसाळ्यानंतर त्यांची कामे सुरू केली जातील. – योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग