पालघर: पालघर आणि २६ गावाच्या नळ पाणी योजनेतून पडघे आणि १९ गावांची नळपाणी योजना अंतर्गत करण्याच्या आमदार राजेंद्र गावित यांच्या पाठिंबामुळे पालघरचे माजी नगरसेवक व या १९ गावांचे सरपंच अशी लढत निर्माण झाली आहे. शहराला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत असताना व अतिरिक्त पाणी उपलब्ध नसताना आपल्या योजनेतून इतर गावांची तहान कशी बुजवावी याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन होणार असून यामध्ये मोठा वादंग होण्याची शक्यता आहे.

पालघर नगर परिषदेकडे सन २०११ मध्ये हस्तांतरित झालेल्या योजनेची देखभाल दुरुस्ती करताना पालघर नगर परिषदेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत इतर गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्या मधून झालेल्या खर्चापैकी २६.९२ टक्के खर्च मिळणे अपेक्षित असताना या पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुमारे १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत पालघर व २६ गावच्या नळ पाणी योजनेतून शुद्धीकरण केलेले पाणी इतर जलपाणी योजनेला देण्यास पालघरच्या माजी नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.

पालघर नळपाणी योजनेत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभी राहिली असून पूर्वीच्या वाटप सूत्रानुसार गावांना देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे या गृहसंकुलांमधील सदनिका धारकांची तहान भागत नाही. या अनुषंगाने या भागात होणाऱ्या नागरी विकासाच्या दृष्टीने जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने नळपाणी योजना आखण्यात आली. या नळपाणी योजनेला पालघरच्या योजनेशी संलग्न करू नये या आशयाचा ठराव नगर परिषदेने घेऊन याबाबत वारंवार भूमिका स्पष्ट केली होती. मात्र तरी देखील आमदार राजेंद्र गावित यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून नगरपरिषद पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकून या नळ पाणी योजनेची जोडणी करण्यासाठी असफल प्रयत्न करण्यात आले.

पालघर नगर परिषदेच्या कौन्सिलचा कार्यकाळ संपला असून सध्या फक्त आमदार व खासदार असे लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. सत्तेमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींकडून जनहित बाजूला सारून लोकांच्या हिताविरुद्ध काही निर्णय घेतले जात असल्याची टीका शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे व सह संपर्कप्रमुख केदार काळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना केले आहेत. आगामी काळात होऊ पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून पालघर मधील पाणी आगामी काळात प्रश्न उग्ररूप धारण करेल अशी शक्यता आहे. दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उद्या (२९ मे रोजी) आयोजन केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही बैठक मंगळवार ३ जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर व २६ गावच्या नळ पाणी योजनेत पडघे योजनेतील १९ गावांपैकी सात गावांचा समावेश आहे. उर्वरित १२ गावांना शासनाकडून जुन्या योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भात मंजुरी प्राप्त असल्याची माहिती असून सध्या वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणे व अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्यास दोन्ही योजना एकत्र करण्याचा विचार करण्यासाठी बैठकीचे आयोजन आहे. सध्याचा पाण्याचा वापर व उपलब्ध अतिरिक्त पाणी यावर अधिकारी वर्गासोबत विचार विनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल. – राजेश पाध्ये, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर.