पालघरमधील समुद्रकिनारे, गड-किल्ले पर्यटन विकासाकडे मात्र दुर्लक्ष

पालघर: पालघर जिल्ह्यातील पूर्व पट्टय़ातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून सहा कोटीहून अधिकचा निधी प्राप्त झाला आहे. कामे मंजूर झालेल्या निधीतून पर्यटन स्थळे व तेथील भौतिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. पश्चिम भागातील तालुक्यांना मोठा निधी मिळत असला तरी या निधीमध्ये समुद्रकिनारा, गड-किल्ले पर्यटनासाठी तरतूद नाही. पर्यटन विकास योजनेतून पालघर, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यात २९ कामांचा विकास व विस्तार होणार आहे. यासाठी सहा कोटी ८१ लाख ७० हजाराचा निधी मंजूर झाला आहे. पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण, तिथे जाणारे रस्ते, पेव्हर ब्लॉक्स, वाहनतळ शेड, मूलभूत सुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर सोयींचा यात समावेश आहे. तसेच सुरक्षा भिंत, कुंपणासाठीही निधी वापरला जाणार आहे. चार तालुक्यातील कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहेत तर तीन तालुक्यात जव्हार विभागाकडे कामे आहेत.

पूर्वेकडील भागामध्ये विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळाला तरी पश्चिम भागातील किनारपट्टी क्षेत्रांच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. बोर्डी, चिंचणी, शिरगाव, केळवे, अर्नाळा, भुईगाव अशा प्रसिद्ध समुद्रपर्यटन स्थळांच्या विकासासाठी या योजनेत निधी नाही. शिवाय जिल्ह्यातील नोंदणीकृत गड किल्ले, कृषी पर्यटन विकासाकडेही दुर्लक्ष झालेले आहे. जिल्ह्यातील पर्यटन मॉडेल समजल्या जाणाऱ्या केळव्याकडे जाणारे रस्ते अतिशय वाईट अवस्थेत आहेत, पण त्यासाठी निधीत कोणतीच तरतूद नाही. पर्यटन स्थळावरील विकास कामे आणि सुधारणा यासाठी पहिल्यांदा एवढा भरघोस निधी मिळाला आहे, मात्र त्याचा विनीयोग योग्य प्रकारे केला जाण्याची गरज आहे. अलीकडेच काही पर्यटनस्थळांच्या विकासकामांमध्ये खर्चाच्या तुलनेत अत्यंत तकलादू कामे झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निधीच्या उपयोजनावर प्रशासनाचे करडे लक्ष असणे आवश्यक आहे.

निधीअंतर्गत करण्यात येणारी कामे

  • पालघर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेतर्फे सातिवली मंदिराजवळ वाहनतळ साफसफाई, गरम पाण्याच्या कुंडाजवळ सपाटीकरण व रस्ता तयार करणे, तांदुळवाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधणे आदीसाठी निधी मंजूर आहे.
  • मोखाडा तालुक्यात वॉलब्रिज पर्यटन स्थळाला वाहनतळ पायऱ्या, रेिलग, संरक्षण भिंत, मुतारी बांधकाम करणे, देवबांध पर्यटन स्थळ रस्त्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे व आवश्यक तेथे रस्त्याची सुधारणा करणे. खोडाळायेथील रस्त्यावर खोल बाजूस सुरक्षा वलय बसविणे, जाळीचा पाडा व घोडीचा पाडा ते ओसरविरा पर्यटन स्थळाच्या रस्त्याची सुधारणा, वाशाळा पांडवलेणी काँक्रीट रस्ता, परिसर सुधारणा, ओसरविरा पर्यटन स्थळ येथे, स्वागत कमान, परिसर सुधारणा, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधणे आदी कामे जव्हार बांधकाम विभाग करेल.
  • जव्हार तालुक्यात दाभोसा धबधब्याला पायऱ्या व रेिलग करणे, जव्हार ते बाळकापरा शिवमंदिर रस्त्यावर धोकादायक वळणावर संरक्षक भिंत बांधणे, सनसेट पॉईटला वाहनतळ व काँक्रीट रस्ता, जामसर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, काळमांडवी पर्यटन स्थळ येथील रस्त्याचे काम, संरक्षण भिंत पायऱ्या व रेिलग बांधणे, डेंगाची मेट मातेरा डोंगर वळण रस्त्याला संरक्षण भिंतीचे बांधकाम, खरवंद ते खडखड रस्त्याला संरक्षण भिंत आदी कामे केली जाणार आहेत.
  • वाडा तालुक्यातील सांगे शिवाचा पाडा मुख्य रस्ता ते कोहोज किल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक, सुशोभीकरण, वाहनतळ आदी कामे प्रस्तावित आहेत.
  • विक्रमगड तालुक्यातील हातोबा पीक पर्यटन स्थळाच्या रस्त्याची सुधारणा, पर्यटन स्थळास संरक्षण भिंत आदी कामे करण्यात येतील.
  • तलासरी तालुक्यातील झाई पर्यटन स्थळाच्या रस्ते आणि इतर सोयीसुविधांसाठी निधी देण्यात आला आहे.

पर्यटन विकास योजनेतून पालघर जिल्ह्याला मिळालेल्या भरघोस निधीचे नियोजन करण्यात येणार असून यात्रा स्थळ व पर्यटन स्थळे यांचा विकास जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.

-डॉ. माणिक गुरसळ, पालघर जिल्हाधिकारी

किनारे हे जिल्ह्याचे वैभव आहेत. पर्यटन विकास योजनेतून समुद्रकिनाऱ्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने दुजाभाव केला आहे.  तरी त्याकडे लक्ष द्यावे.

-आशीष पाटील, माजी अध्यक्ष, केळवे किनारा पर्यटन उद्योग विकास संघ