पालघर: पालघर नगर परिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी वाहतुकी दरम्यान, पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे तसेच रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटून गेल्या काही दिवसांमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात उन्हाळा सुरू होताच पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत असून तेथे महिला चार-पाच किलोमीटर पर्यंत पायपीट करून कोरड्या विहिरीतून, डबक्यातून अशुद्ध पाणी पिऊन तहान भागवत आहेत. तर काही ठिकाणी टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक व प्रशासनाला पाण्याचे महत्व नसून अधिकारी वर्गांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

पालघर येथील जिल्हा परिषद शाळा पालघर नंबर एक च्या मागील बाजूस कल्पतरू अपार्टमेंटच्या खाली आर्यन शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या दहा ते बारा दिवसापासून एका ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी पाण्याचा कॉक खराब झाला असून त्यातून सतत गळती सुरू आहे. त्यामुळे या भागात दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्पुरता रबरी पाईप गुंडाळून उपाययोजना केली आहे. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे मोठ्या क्षमतेने त्यातून पाण्याची नासाडी सुरू आहे.

जुना मनोर मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून बांधकाम विभागाकडून घोलविरा या भागातील रस्ता खोदण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू आहे. मात्र याकामा दरम्यान पाईपलाईनचा अंदाज न आल्याने पाईप फुटून पाण्याची नासाडी सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामात देखील व्यत्यय आला असून खोदलेल्या भागात चिखल झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना देखील प्रवास करणे कठीण झाले आहे.

यासह नगरपरिषद व ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात पाईप मधून गळती सुरू असून त्यातून गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी वाहत जात आहे. मात्र याबाबत कोणी तक्रार करत नसल्यामुळे नगरपरिषद व पाणीपुरवठा विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

इथे पाण्याची नासाडी तर ग्रामीण भागात पायपीट

पालघर हा शहरी भाग असून या भागात सूर्या नदीतून 26 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या या भागात भासत नाही. मात्र मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड यासारख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असून तिथे उन्हाळा सुरू झाल्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या भागातील नागरिक अर्ध्या रात्री, पहाटे पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन चार ते पाच किलोमीटर व त्याहून अधिक पायपीट करून पाण्याचा शोध घेतात. मिळेल त्या डबक्यातून, कोरड्या तळाला गेलेल्या विहिरीतून तर थेंब थेंब झिरपणाऱ्या पाईप मधून एक दोन तास वाट बघून हंडाभर पाणी घेऊन घराकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अशुद्ध पाणी पिऊन उन्हाळ्याचे दिवस काढावे लागत आहेत. मात्र शहरी भागात ही समस्या जाणवत नसली तरीही दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने पाण्याचे महत्व शहरी भागातील नागरिकांना तसेच प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. तर पाणीपुरवठा विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता असून कंत्राटी पद्धतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून कामे सुरू आहेत.

गेले १०-१२ दिवसापासून पाईपलाईन फुटली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी पाण्याचा कॉक खराब झालेला आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. मात्र नगरपरिषद फक्त हातावर हात ठेवून बसली आहे. फुटलेल्या पाईपला रबर गुंडाळून तात्पुरता उपाय केलाय. हाच का पाणी व्यवस्थापनाच दर्जा?– हिमांशू राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शहर सचिव, पालघर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन दिवसापासून रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे घोलविरा परिसरातील अनेक घरांमध्ये कमी क्षमतेने पाणीपुरवठा होत आहे. कामादरम्यान या घटना वारंवार घडणार असून यावर बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.– आदित्य इंगोले, रहिवासी