पालघर : निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करू तसेच लोकांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांवर काम करताना गैरव्यवहार व गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवू असे काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्ह्याचे निरीक्षक ऍड. विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने निरीक्षक पदी नेमणूक झाल्यानंतर ऍड. विक्रांत चव्हाण यांनी ६ एप्रिल रोजी प्रथम जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी तलासरी, डहाणू, पालघर व वसई या चार तालुक्यात जाऊन तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच पक्षाच्या उभारणीसाठी त्यांच्याकडून प्राप्त होणारा सूचना याबाबत माहिती घेतली. या संदर्भातील अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सादर करणार असल्याचे सांगितले.
भाजपाचे धरसोड धोरणाविषयी टीका करताना बहुजन विकास आघाडीने केलेल्या मदतीची परतफेड कशा पद्धतीने केली याकडे लक्ष वेधले. तर शिवसेनेची सध्या सरकारमध्ये असताना कशी गत झाली आहे याबाबत चर्चा केली.
पालघर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्ह्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांविषयी आवश्यक प्रमाणात आवाज उठवला जात नसल्याचे मान्य करत संघटना बळकट करण्यासाठी उपजत काँग्रेसची तत्व जोपासणारया तसेच पक्ष बांधणीसाठी वेळ देऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या पुनर्बांधणी स्थान दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका होती याकडे लक्ष वेधत काँग्रेस विचारसरणी ग्रामीण भागात अजूनही जिवंत असून पालघरमध्ये पक्ष सक्षम झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले. जिल्ह्यात आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा तसेच स्थलांतर असे अनेक प्रश्न असताना शासनाने या प्रश्नाच्या समस्यांकडे लक्ष देणे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आगामी काळात वेगवेगळ्या विषयांना घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरणार असे ऍड. चव्हाण यांनी पुढे सांगितले.
आघाडी च्या माध्यमातून सत्तास्थानी असताना वेगवेगळ्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या विचारसरणीमुळे आपल्या पक्षाला काहीसा तोटा झाल्याचे मान्य केले. आगामी काळात आघाडी कायम राहत असली तरी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अधिकाधिक ठिकाणी उमेदवारी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान काँग्रेस मधील जुन्या जाणत्या नेतेमंडळीला अडगळीत टाकल्याबद्दल तसेच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्यांबद्दल पक्षीय कार्यकर्त्यांनी निरीक्षक यांच्यासमोर आपली बाजू मांडली. यावेळी पक्षातून सोडून गेलेले कार्यकर्त्यांबद्दल विचार न करता काँग्रेस विचारधारा असणाऱ्या मंडळींना सोबत घेऊन पक्ष संघटना उभारण्याबाबत त्यांनी आश्वासित केले.