उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात संघटनाटमक बांधणीबाबत अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक प्रमुख निर्णय म्हणजे प्रमुख राजकीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आठ सदस्यांचा ‘राजकीय सल्लागार समिती’ स्थापन करणे. या समितीत राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मल्लिकार्जुन खरगे या प्रमुख काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त सोनिया गांधी यांनी पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र सिंह यांचा समावेश केला आहे. ५० वर्षीय जितेंद्र सिंह हे या समितीमधील सर्वात तरुण नेते आहेत.

कोण आहेत जितेंद्र सिंह?

काँग्रेसच्या या गटात स्थान मिळाल्यामुळे जितेंद्र सिंह यांचे राजकीय वजन वाढले तर यात नवल वाटण्याची गरज नाही. कारण ते नेहमीच टीम राहुलचे महत्त्वाचे सदस्य राहिले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सी.पी. जोशी आणि सचिन पायलट यांच्यासारख्या दिल्लीत संपर्क असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

जिंतेंद्र सिंह हे राजस्थानमधील ‘अलवर’च्या जुन्या राजघराण्यातील आहेत. २ वेळा आमदार झालेले जितेंद्र सिंह हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आणि प्रथमच खासदार झाले. २०११ मध्ये युपीए सरकारमध्ये गृहराज्य मंत्री म्हणून नियुक्त झाले. जितेंद्र सिंह यांच्या नियुक्तीच्या १५ महिन्यांनंतर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले तेव्हा जितेंद्र सिंह यांच्यावर संरक्षण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला. सिंह हे काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीचे (एआयसीसी) सरचिटणीस आणि आसामचे प्रभारीसुद्धा आहेत.

राजघराण्याचे वंशज

जितेंद्र सिंह यांचे वडील प्रताप सिंह हे अलवरच्या तत्कालीन सत्ताधारी घराण्यातील वंशज होते तर त्यांच्या आई महेंद्र कुमारी, बुंदीचे शेवटचे राजे महाराजा बहादूर सिंह यांच्या कन्या होत्या. कुत्रे आणि पाळीव सिंह पाळणे हे त्यांचे छंद होते. त्या भाजपामध्ये सामील झाल्या होत्या आणि १९९१ मध्ये अलवरमधून खासदार झाल्या होत्या.

त्यांनी स्वतःला नेहमी राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवले आहे. सिंह यांना राजस्थानच्या राजकीय वर्तुळात ‘अलवर के मालिक’ म्हणून ओळखले जाते. काँग्रेसच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार अलवरमध्ये काँग्रेसकडे काही मजबूत स्थानिक नेते असले तरी आमदारकीचे तिकीट कोणाला मिळणार आणि कोण मंत्री होणार याबबत सिंह मत महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ अलवर ग्रामीणचे आमदार टिकाराम जुली हे सध्या राजस्थानचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. ते सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांच्यावर फसवणुकीचा आणि काकांची खोटी स्वाक्षरी केल्याचा आरोप देखील झाला होता.