छत्रपती संभाजीनगर : वर्ष – सव्वा वर्षापूर्वी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभा घेत आणि नंतर मूळ पक्ष आमचाच असा दावा करीत असत. मग बंडात सहभागी असलेले आमदार मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात आणून शक्तिप्रदर्शन करीत. मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या मागे खूप साऱ्या गाड्या असत. ते कधी कारच्या दरवाज्यातून किंवा चारचाकी वाहनाच्या झरोक्यात उभे राहून जनतेला अभिवादन करीत. जेसीबीला बांधलेल्या पाच क्विंटल फुलांच्या हारासह एकनाथ शिंदे यांचा फोटो घेतला जात असे. गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा सडा पडलेला असे. ‘शिवसेना’ या चार अक्षराभोवती सुरू असणारा राजकीय प्रवास आता ‘राष्ट्रवादी’बरोबर सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छवी त्यात दिसत आहे. सत्ताधारी गटात सहभागी होणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाचा भाग अगदी पहिल्या भागाशी मिळता जुळता दिसून येत आहे. फक्त शिवसेनेत ‘गद्दार- खुद्दार’ शब्दांची रेलचेल होती, त्याऐवजी राष्ट्रवादीतील टीकेला संभ्रमाची किनार आहे.

राज्यातील ४० आमदार शिवसेनेतून फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. सत्तेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना मंत्रीपदे मिळाली. ऐन अधिवेशनात त्यानंतर एक घोषणा राज्यभर पसरली आणि सत्ताधाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली. ती म्हणजे ‘पन्नास खाेके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधाऱ्यांमध्ये प्रतिमाभंजनाचे भय वाढले. अस्वथता वाढली. त्यातच पुढे आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात पैठण, वैजापूरसह विविध तालुक्यांत सभा घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेनेविषयी सहानुभूती वाढत असल्याचे दिसू लागले आणि सत्ताधारी गटाने शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शक्ती प्रदर्शन केले. प्रत्येक गावात एक जेसीबी उभा केला जायचा. त्याला १०० किलो फुलांचा हार बांधलेला असे. समोर ढोल- ताशे वाजत असत. लोक दुतर्फा उभे राहत. मग सभेत सत्ताधारी नेत्यापासून का फुटलो याचे समर्थन करीत. सत्तेच्या माध्यमातून निधीची बरसात करत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विकास कामांच्या निधीच्या मागणीचा अर्ज सादर केला जात असे आणि त्या सर्व मागण्या मान्य असल्याचे ते सांगत असत. मग नवा साखर कारखाना उघडायचा असो किंवा सिंचनाची योजना. राजकीय शक्तीप्रदर्शनाचा हा पहिला टप्पा संपून प्रशासकीय कामांना सुरुवात होईल, अशी शक्यता दिसू लागली आणि शिवसेनेप्रमाणे सर्व पक्ष घेऊन अजित दादा भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. राजकीय घडामोडीतील सुरत, गुवाहटी असे तपशील वगळले तर पक्षाचे आमदार वेगळीकडे आणि नेते दुसऱ्या बाजूला हे चित्र राष्ट्रवादीमध्येही दिसू लागले.

हेही वाचा – ‘आप’शी युती नकोच! पंजाबच्या काँग्रेस नेत्यांचा सूर; विरोधकांच्या ‘इंडिया’त फूट?

शरद पवार यांनी पहिल्यांदा येवला येथे सभा घेतली आणि दुसरी सभा बीड येथे झाली. त्यांच्या सभेनंतर शक्तीप्रर्शनाचा दुसरा टप्पा बीडमध्ये रविवारी पार पडला. खरे ‘पन्नास खोके’ सारखी सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी घोषणा नसतानाही बीडमध्ये अजितदादांनी केलेले शक्तीप्रदर्शन त्यांच्या राजकीय स्वभावाच्या विरोधाभासी म्हणता येईल असेच होते. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँका, विविध शासकीय योजनांचे कंत्राट या माध्यमातून कार्यकर्त्यास आर्थिक ताकद द्यायची त्यातून आमदार घडवायचा. ‘हार- तुरे सत्कार यातून फारसे राजकीय लाभ मिळत नाहीत,’ असे विचार त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. पण बीड जिल्ह्यातील शक्ती प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार पुष्पवृष्टीत खूश दिसत होते. त्यांच्या गाड्यांच्या मागेही शक्ती प्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यात जशा गाड्यांची रांग लागत तशीच रांग बीडमध्ये होती. दुतर्फा गर्दीतून वाट काढणाऱ्या गाडीवर फुलांच्या पाकळ्या होत्या. भाषणातून उणीदुणी काढण्याची जबाबदारी छगन भुजबळ आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होती. त्यातील भुजबळ यांनी शरद पवार हे कसे भाजप धार्जिणे आहेत, हे सांगितले तर शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिले, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. पण अजित पवार यांनी टीका टाळली. मराठवाड्यासाठी नार-पार आणि पश्चिम वाहिन्यातून पाणी आणण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या संयोजकपदावर नितीश कुमार यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीड जिल्ह्यात राजकीय विचारांपेक्षाही ते प्रदर्शित करण्याकडे अधिक कल असतो. दिवंगत गोपीनाथ मुंडेपासून गर्दी जमविण्याचा, त्यातून वातावरणनिर्मितीचा दांडगा अनुभव येथील नेत्यांना आहे. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांनी या प्रदर्शनामध्ये नवा भपका आणला. तो भपका व त्याचे रंग बीडच्याही गर्दीमध्ये दिसून येत होता. या वेळी मंत्री मात्र बदलले एवढेच. दुसरीकडे सत्तेत स्थीरावलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गर्दी गोळा केली ती लाभार्थींची होती. शक्ती प्रदर्शनाचा हा दुसरा टप्पा ज्या भाजपमुळे घडतो आहे त्या पक्षातील कार्यकर्ते मात्र दमलेले दिसून येतात. अजित पवार यांच्या राजकीय मैत्रीनंतर उत्तराची जुळवाजुळव करायला त्यांना शब्द शोधावे लागत आहेेत.