ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी परदेशात पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांमध्ये केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची निवड केली आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांची निवड केल्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे एक नाव आश्चर्यचकित करणारे होते. केंद्राने निवडलेल्या नेत्यांपैकी मात्र काँग्रेसने आपणहून दिलेल्या यादीत समावेश नसलेले पंजाबचे खासदार अमर सिंह यांचे नाव शिष्टमंडळात आहे. अमर सिंह हे फतेहगढ साहिबमधून दोन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत.

मोदी सरकारने डॉक्टर, सरकारी अधिकारी, राजकारणी या उदयोन्मुख दलित नेत्याची निवड केली, जे अमर सिंह यांना जवळून ओळखतात त्यांच्यासाठी ही बाब आश्चर्यकारक नक्कीच नाही. अमर सिंह हे एक अधिकारी म्हणून प्रभावी कारकीर्द असलेले एक उदयोन्मुख दलित नेते आहेत.

अमर सिंह कोण आहेत?

७१ वर्षीय अमर सिंह मध्य प्रदेश केडरचे १९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सिंह हे लुधियाना जिल्ह्यातील बोपाराई कलान गावचे आहेत आणि त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा आणि अन्न सुरक्षा कायदा (एफएसए) हे दोन ऐतिहासिक कायदे घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. काँग्रेस नेते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना दिग्विजय सिंह यांच्या दलित सक्षमीकरण उपक्रमात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. “माझे वडील सहावीपर्यंत शिकले होते आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते”, असे सिंह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. “१९६९ मध्ये मी दहावीत चांगले गुण मिळवले आणि मला १०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. ते माझ्यासाठी खूप मोठे होते आणि त्यामुळेच मी पुढे जात राहिलो. नंतर अमृतसरच्या डीएव्ही कॉलेजमध्ये आणि नंतर अमृतसर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला”, असेही त्यांनी सांगितले.

आयएएसमध्ये शिफ्ट झाल्यानंतर सिंह यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स ही अतिरिक्त पदवी मिळवली. १९९७ पासून ते मध्य प्रदेशचे प्रधान सचिव व मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २००४ ते २०१० दरम्यान त्यांची भारत सरकारमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती झाली. सिंह ‘मुख्यमंत्र्यांच्या कामामागचा ब्रेन’ म्हणून केलेल्या कौतुकाबाबतही सांगतात. “मुख्यमंत्री त्यांचे स्वतःचे निर्णय स्वत: मेंदू घेतात. मी ते श्रेय घेणार नाही. जर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला नाही, तर तो दिवस उजाडणार नाही. प्रधान सचिव हे फक्त एक अत्याधुनिक पोस्टमन आहेत,” असे सिंह यांनी स्वत:बाबत सांगितले.

त्यांचा शेवटचा कार्यकाळ भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा होता. २०१३ मध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या यूपीए सरकारने अन्न सुरक्षा कायदा मंजूर केला तेव्हा ते पद भूषवले. दिवंगत मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या त्यांच्या काळाची आठवण करून देताना सिंह म्हणतात की, माजी पंतप्रधान त्यांना अनेकदा विचारायचे की, सरकार आवश्यकतेनुसार इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पुरवू शकेल का? त्यावर सिंह यांनी त्या संदर्भातला पूर्ण डेटा त्यांना सादर केला होता आणि त्यांना विश्वास दिला होता की, ते शक्य आहे. पुढे मनरेगा व अन्न सुरक्षा अशा योजना दोन्ही प्रत्यक्षात आल्या आणि अजूनही त्या अमलात आणल्या जात आहेत.”

निवृत्तीनंतर लगेचच अमर सिंह २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांना थेट त्यांच्या पंजाब युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. सिंह याच्याआधी या पदाचे नेतृत्व तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केले होते.
तीन वर्षांनंतर अमर सिंह यांनी रायकोट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली. मात्र, आम आदमी पक्षाच्या जगतार सिंग जग्गा हिस्सोवाल यांच्याकडून १०,००० पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी फतेहगड साहिब लोकसभा मतदारसंघ यशस्वीरीत्या लढवला आणि पाच वर्षांनंतरही तो त्यांनी कायम ठेवला.

खासदार म्हणून अमर सिंह रेल्वे, तेल व नैसर्गिक वायू, अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण यांसारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांचा भाग आहेत. सिंह हे अजूनही भाड्याच्या घरात राहतात. तसेच सरकारी नोकरीत ज्याप्रमाणे लोकांसाठी दारं उघडी ठेवली, तशीच आताही आहेत, असेही ते सांगतात. “जेव्हा मी मध्य प्रदेशातील झाबुआचा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होतो, तेव्हा मी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माझ्या क्षेत्रभेटींवरून परत येताना आदिवासी समुदायातील लोक माझ्या घराबाहेर जमिनीवर झोपलेले असायचे. त्या बैठका मला अजूनही आठवतात”, असेही ते म्हणतात.

काँग्रेसच्या यादीत वेगळंच नाव

भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळात सिंह यांचा सहभाग आहे. केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांच्या पॅनेलमध्ये निवड केल्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये काही प्रमाणात मतभेद असले तरी पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड अमर सिंह यांचे कौतुक करीत आहेत. त्यांनी सिंह यांच्याबाबत एक अनुभवी व स्पष्टवक्ता राजकारणी असे म्हटले आहे. “काँग्रेसने पाठविलेल्या यादीत अमरिंदर सिंग राजा वारिंग यांचं नाव होतं. त्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली. अपात्र लोक परदेशी राजदूत आणि प्रतिनिधींशी कसे संवाद साधतील? काँग्रेसला चुकीच्या गोष्टींनी ग्रासले आहे. इतका महत्त्वाचा संदेश देणाऱ्या पॅनेलसाठी अशा नावाची शिफारस करणे एखाद्या राष्ट्रीय पक्षाला शोभत नाही”, अशी टीका सुनील जाखड यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॅनेलचा भाग होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची परवानगी घेतल्याचे यावेळी सिंह यांनी सांगितले. “मी एका सीमावर्ती जिल्ह्यात डॉक्टर आहे आणि मला माहीती आहे की, पाकिस्तानने आपल्या देशातील तरुणांचे काय केले आहे. मी पाकिस्तानचा पर्दाफाश करीन”, असेही सिंह यांनी म्हटले आहे.