नांदेड: गेल्या सोमवारी नांदेडमध्ये आलेले केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची काही शिष्टमंडळांनी भेट घेतली. सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटले असता, एका मुद्यावर शहा भडकल्याची माहिती बाहेर आली आहे.
वरील शिष्टमंडळात खासदार अशोक चव्हाण, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेन्द्र चव्हाण आणि खाजगी साखर कारखानदार मारोतराव कवळे प्रभृतींचा वरील शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे उपस्थित होते.

केंद्र सरकारने मागील तीन वर्षांत उसाच्या ‘एफआरपी’मध्ये केलेल्या वाढीच्या तुलनेत खुल्या बाजारात विक्री करावयाच्या साखरेच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रातील कारखानदारी अडचणीत आली असून हे धोरण असेच राहिले, तर कारखाने बंद पडतील, याकडे शहा यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांना हा मुद्दा खटकल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले.

दांडेगावकर यांनी चर्चेदरम्यान उसाची एफआरपी आणि बाजारातील साखेचे दर यांतील मोठी तफावत मांडल्यानंतर शहा यांनी कारखानदारांनी आपला हा मुद्दा कागदपत्रांवर व्यवस्थित मांडावा तसेच सनदी लेखापालाकडून जमा खर्चाचा संपूर्ण ताळेबंद तयार करून घ्यावा आणि पुन्हा चर्चेसाठी यावे, असे सांगितले.

राज्यातील साखर कारखान्यांना एक किलो साखर उत्पादनासाठी ४२ रूपये खर्च येतो, पण साखर विक्रीतून प्रतिकिलो ३५ रुपये मिळतात, असे वरील शिष्टमंडळाने शहा यांना सांगितले. इथेनॉलच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणींची माहितीही केंद्रीय सहकारमंत्र्यांना देण्यात आली. सहकारी साखर कारखानदारांचे ऊस दर आणि साखरेचा भाव या बाबतीत जे प्रश्न आहेत, तेच खासगी साखर कारखानदारांचेही असल्याचे मारोतराव कवळे यांनी वरील भेटीनंतर सांगितले. आमच्या अडचणी व प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा केंद्रीय सहकारमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील महिनाभरात नांदेड येथील प्रस्तावित विभागीय महसूल कार्यालयाच्या स्थापनेच्या विषयात आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. आमदार चिखलीकर यांनी याच मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेटून दिले तेव्हा त्या निवेदनावर त्यांनी केवळ स्वाक्षरी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेडमध्ये आलेल्या देवेन्द्र फडणवीस यांना खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ येथे भेटले. या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याशी संबधित आणि पण प्रलंबित असलेल्या वेगवेगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने पूर्वीच घेतलेला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.